गोपाळ गणेश आगरकर मराठी निबंध | gopal ganesh agarkar marathi nibandh

गोपाळ गणेश आगरकर मराठी निबंध | gopal ganesh agarkar marathi nibandh

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गोपाळ गणेश आगरकर  मराठी निबंध बघणार आहोत. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १८५६ मध्ये सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला, त्यांचे आजोळ क-हाड येथे होते. पांचवीस पूजलेल्या गरिबीशी टक्कर देत देत त्यांनी क-हाड येथे इंग्रजी तिसरीपर्यंत शिक्षण पूर्ण केले व तेराव्या वर्षी त्यांना नोकरी धरावी लागली. परंतु विद्याप्रेमी गोपाळ नोकरीत रमू शकला नाही. रत्नागिरी, पुणे, अकोला येथे वणवण करत हालअपेष्टा सोसत त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.


पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पूर्ण केले. शिष्यवृत्ती, स्वावलंबन यांच्या साहाय्याने ते पदवीधर झाले. तरीही विद्येच्या जोरावर पैसा मिळविण्याची इच्छा त्यांना झाली नाही. 'विशेष संपत्तीची हाव न धरता, मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून, सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार,' असा आपला निश्चय गरीबीत आकंठ रुतून बसलेल्या, व मुलाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या आईला त्यांनी कळवून टाकला.



त्यांच्यासारख्याच प्रवृत्तीचे लो. टिळक, चिपळूणकर हे सहकारी त्यांना भेटले व १ जानेवारी १८८० साली 'न्यू इंग्लिश स्कूल'सारख्या राष्ट्रीय शिक्षणसंस्थेची स्थापना झाली. १८८५ साली फर्ग्युसन कॉलेज निघाले व आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य झाले. या प्राचार्यांच्या जवळ मृत्युसमयी २० रु. पुडी करून उशीखाली ठेवलेले मिळाले. सर्व आयुष्यभराची मिळकत होती ती! मृत्यूनंतरचे संस्कार करण्यासाठी ठेवलेली !

आगरकर सुरुवातीला केसरीचे संपादक होते. नंतर त्यांनी स्वत:चे 'सुधारक' वर्तमानपत्र काढले. टिळकांना राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटले, तर आपल्या समाजातील दुष्ट रुढी व वेडगळ कल्पना नष्ट करण्याकरता आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा प्रश्न हातात घेतला.


 लोकमतातील दोष-स्थळे दाखविण्याचे, अप्रिय परंतु पथ्यकारक विचार मांडण्याचे कठीण व्रत आगरकरांनी स्वीकारले. स्त्री-शिक्षण, प्रौढविवाह, अस्पृश्यता निवारण वगैरे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.  आगरकरांचे सर्व जीवन म्हणजे एक उदात्त संघर्ष होता. 


लहानपणी गरिबीशी, तरुणपणी सहकाऱ्यांशी,  समाजातील अनिष्ट रुढींशी ते झगडत होते व शरीर दम्याशी झगडत होते. शेवटी शरीर थकले व १७ जून १८९५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज स्त्रिया सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करत आहेत. परंतु त्यांच्या मुक्तीसाठी आयुष्यभर सरळ व कोमल हृदयाचा महात्मा झुंजला होता, याची त्यांना जाणीव आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

गोपाळ गणेश आगरकर मराठी निबंध 

जीवन किती वर्षे जगता येते यापेक्षा ते कसे जगता येईल, या तत्त्वाला समाजमूल्यात फार महत्त्वाचे स्थान आहे, त्याला कमालीचे महत्त्व आहे. या तत्त्वामध्ये बसणारे एक श्रेष्ठ नाव म्हणजे गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारकाबरोबरच एक असामान्य कर्तृत्ववान व्यक्ती असेही त्यांना आदराने म्हटले जाते.
आगरकरांचे जीवन म्हणजे एका क्रांतिकारकाचे होते. 

धाडस दृढनिश्चय आणि स्वार्थत्याग या तीन गुणांनी आगरकरांचे जीवन परिपूर्ण असलेले दिसून येते. या ध्येयवादी सुधारकाचा जन्म कराडजवळील 'टेंभू' या गावी १८५६ मध्ये ब्राह्मण कुटुंबात झाला. पिता गणेश आणि माता सरस्वती. घरी मात्र अठराविश्वे दारिद्रय. घरचे वातावरण अतिशय सच्छील आणि सरळमार्गी, गोपाळरावांनी घरच्या परिस्थितीमुळे नोकरी पत्करली. त्यातही मन रमत नव्हते. ते थेट पुण्याला आले आणि काही मदत आणि स्कॉलरशिपवर पदवीधर बनले. त्यांनी 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.' या उक्तीनुसार मातोश्रींना स्पष्ट सांगून टाकले. 'मला अधिक संपत्तीची हाव नाही. मी पोटापुरते मिळविणार आणि माझा सर्व वेळ लोकांसाठी-देशासाठी घालवणार.'


१८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाल्यानंतर मोठ्या पगाराची अपेक्षा न धरता तिथेच शिक्षकाची नाकरा त्यानी स्वीकारली. पुढे फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक आणि थोड्याच काळात प्राचार्य म्हणून नावारूपाला आले. अतिशय कष्टात... हलाखीच्या काळात शिक्षण-नोकरी आणि समाजसेवा यामुळे त्यांची प्रकृती नाजूक बनली होती.
आगरकरांनी शुद्ध बुद्धिवादावर आधारीत सामाजिक-सुधारणेचा पुरस्कार केला होता. समाजातील अनेक अनिष्ट बाबींवर टीका करून बुद्धीच्या कसावर घासून बघण्यास शिकवावे, असे त्यांनी ठरवले. 


अंधश्रद्धेने कोणतीही गोष्ट स्वीकारू नये डोळसपणेच स्वीकारावी असा त्यांचा अट्टहास होता. 'व्यक्तिस्वातंत्र्य' तर त्यांच्या कार्याचा अविभाज्य भाग बनला होता व्यक्तीसाठी समाज आहे. व्यक्ती हे एक स्वतंत्र महत्त्वाचे मूल्य आहे, असे सांगून व्यक्तीच्या हितासाठीच सामाजिक नित असावेत असे ते सांगत. बदलत्या परिस्थितीनुसार समाजात आवश्यक परिवर्तन घडावे याच विचारानी नव्या नव्या सुधारणांचा त्यांनी आग्रह धरला होता.


सामाजिक सुधारणांमध्ये 'स्त्री' शिक्षण आग्रह त्यांनी धरला होता. स्त्रियांचे हक्क-पुनर्विवाह, घटस्फोट, जुनी कुटंबरचना या बाबतीतही अनिष्ट ते काढून बदल घडविण्यासाठी त्यांनी आपले विचार मांडले. लोकांमध्ये विचारजागृती, स्वराज्याची आकांक्षा आणि 'स्वराज्य' प्राप्तीसाठी प्रयत्नही त्यांचे 'केसरी' आणि 'सुधारक' या वृत्तपत्रांतून सुरू ठेवले. 'डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस' आणि शेक्सपियरच्या 'हॅम्लेट' नाटकाचे मराठीत 'विकारविलसित' असे भाषांतरित पुस्तके अधिक लोकप्रिय ठरली.

अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात आगरकरांनी दाखवलेली समाजसेवेची दिव्यता आणि भव्यता ही पुढील अनेक वर्षांपर्यंत लोकांना आजही दीपवून टाकीत आहे. 'शिक्षण' ही तर माणसाची चौथी मूलभूत गरज, त्यासाठी ही पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आज मोठ्या दिमाखात कार्यरत आहेत.


'केसरी'मधून त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवाद, त्यांचे समाजसुधारणेविषयीचे जाज्वल्य विचार हे अग्निहोम सुरू होतेच. साप्ताहिक 'सुधारक'मधूनही त्यांचे परखड विचार, लोकशिक्षण, सतीची चाल, केशवपन इ. अमानुष चालींविरुद्ध आवाज उठविला जात होता.


बुद्धिवादाची एकांडी पताका खांद्यावरून. मिरविणारे आगरकर, प्रसंगी कटू पण समाजाला पथ्य कर असेच विचार माडत आले. इष्ट तेच बोलणार आणि शक्य तेच करणार हा आगरकरांचा बाणा होता. त्यांच्या 'स्त्री विवाह' विषयक सुधारलेल्या त्यांच्या विचारामुळे सनातनी आणि पराकोटीचे धर्मपण जपणाऱ्या लोकांना आगरकर विद्रोही वाटले. त्यामुळे त्या लोकांनी आगरकरांची 'याचि देही याची डोळा' जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती.


आगरकरांचे प्रखर विचार, स्त्री शिक्षण, सहशिक्षण, बहुजन समाजाबद्दलची सहानुभूती, धाडसी वृत्ती यांची त्याकाळात कदर झाली नाही. त्या सर्वांची आज किती गरज आहे. आणि बदल कसा होत गेला आहे. हे इतिहासातील व आजची माणसे चांगल्याप्रकारे सांगू शकतील. त्यांचे 'द्रष्टे पण आत्ताच पटते.


'इष्ट तेच बोलणारा अन् साध्य तेच करणारा हा महामानव ३९ वर्षांचे अत्यंत धगधगते आयुष्य जगला, किती वर्ष जगला पेक्षा कसा जगला हेच महत्त्वाचे नाही का ? अखेरीस १८९५ मध्ये अतिशय दगदगीमुळे उद्भवलेल्या दम्याच्या विकारातच त्यांचा अंत झाला.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद