शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | shalecha nirop ghetana nibandh marathi

शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | shalecha nirop ghetana nibandh marathi

 निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण शाळेचा निरोप घेताना  शीर्षक असलेले  6 निबंध  बघणार आहोत आज दहा वर्षापूर्वीच्या काळात मी डोकावतो  तेव्हा डोळ्यासमोर येते माझी बालमूर्ती ! खांद्यावर दप्तर, हातात वॉटरबॅग, डबा अशा थाटात  शाळेत प्रवेश केला होता. शिकण्यापेक्षा डब्यातील खाऊच्या आशेने शाळेत यायचं ते वय ! अनोळखी विश्वात पाऊल टाकताना मनात होती भीती, असुरक्षिततेची भावना ! आणि गंमतच झाली. 


चष्मा लावलेल्या बाई पाहिल्या आणि 'त्या रागीट असणार' असा (गैर) समज करून घेऊन मी रडून गोंधळ घातला. चष्मा आणि रागीटपणा यांचं समीकरण मांडणाऱ्या माझ्या त्या अजाणपणाचं मला आजही हसू येतं ! मनाची कोरी करकरीत पाटी घेऊन आले. 'श्री गणेशा' ने आरंभ केला. आज तिच्यावर बरंच काही कोरलं गेलं आहे. मातीच्या ओबडधोबड गोळ्याला आकार मिळाला.  सुरवंटाचं फुलपाखरू झालं. शाळेचा परीसस्पर्श लाभल्यावर लोखंडाचं सोनं झालं नाही तरच नवल ! 



याचं श्रेय या विद्यामंदिराला आहे, येथील पुजाऱ्यांना आहे. या शाळेनी आम्हाला काय दिलं नाही ? ज्ञानाचं अमृत दिलं, प्रेमाचं खतपाणी घातलं, मायेची ऊब दिली, प्रोत्साहन दिलं, चुकांची शिक्षा केली, यशाबद्दल शाबासकी दिली. संस्कारांचे पैलू पाडले, महत्त्वाकाक्षांचे पंख दिले. इथेच झाला भावनांचा परिपोष ! मिळाला दुर्दम्य आत्मविश्वास ! कलागुणांना वाव मिळाला. सद्गुणांची संपत्ती आणि अनुभवांची शिदोरी दिली या ज्ञानमाऊलीने ! इथे काय आम्ही चार बुकं शिकायला आलो? छे, छे ! परमेश्वरानी लिहिलेलं जगाचं भलं मोठं पुस्तक कसं वाचायचं ते इथे समजलं.



गणितं सोडविता सोडविता जीवनाचं गणित मांडायला शिकलो. यशवंतांच्या 'आई'ने महान मंगलत्वाचा साक्षात्कार घडविला तर स्वातंत्र्यवीरांचे ‘स्वतंत्रतेचे स्तोत्र' ऐकून कान धन्य झाले. 'गर्जा जयजयकार' ने देशभक्तीची ज्योत पेटवली. 'Jolly Miller' ने आनंदी, सुखी जीवनाचा मंत्र सांगितला. भूगोलाने जगातील अनेक आश्चर्यांशी तोंडओळख करून दिली. संस्कृत सुभाषितांनी विचारांची समृद्धता प्रदान केली. तर संतवाङ्मयाने मनात भक्तीचा झरा झुळझुळ वाढू लागला. विज्ञानाने अंधश्रद्धांना मूठमाती मिळाली. 



गुरुजनांचे आचरण म्हणजे नीतिमूल्यांचे चालते बोलते पाठ होते.आम्ही घडलो, वाढलो, उमललो, सुसंस्कृत झालो या शाळेच्या साक्षीने ! आमच्या बालविश्वातील चिमुकल्या वादळांची, आनंद व दुःखाच्या क्षणांची साक्षीदार ही वास्तू आहे. तिच्याच साक्षीने 'चिमणीच्या दातांनी' खाऊची वाटणी झाली. रुसवे फुगवे झाले, भांडणे झाली, कट्टीची दोस्ती झाली, एकमेकींच्या खोड्या केल्या, प्रसंगी चहाड्याही केल्या. पण मनं निष्पाप होती म्हणून ती कायमची दुभंगली नाहीत. कट्टीनंतर होणाऱ्या दोस्तीचा आनंद काही आगळाच असायचा. मैत्री अधिक दृढ व्हायची.



माझ्या जीवश्चकंठश्च मित्र व  मैत्रिणींनो, तुमचा निरोप कोणत्या शब्दात घेऊ? आज ना उद्या प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटेने जाणार ! आयुष्याच्या एखाद्या वळणावर, सुदैवाने कोणाची भेट झाली तर तो माझ्या जीवनातील ‘सोनियाचा दिनु' असेल. त्यांनी भरभरून दिलेलं प्रेम माझ्या दृष्टीने एक मोलाचा ठेवा आहे.



 येथील गुरुजन ! त्यांच्या कृपेने अक्षराबरोबर मनाला वळण लागले. शब्दभांडार समृद्ध झाले. अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली. पाठांतराची सवय लागली. ज्ञान आणि व्यवहाराची सांगड कशी घालायची ते कळले. गुरुजनांचे ऋणही फेडणे अशक्य आहे. पण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे अगत्याचे आहे.  शाळा आवडते म्हणून इथेच कायमचे थांबता येणार नाही. मात्र जीवनाच्या प्रवासात इथल्या ज्ञानाची शिदोरी आमच्या बरोबर राहणार आहे.


 'Come to learn and go to serve' ही मोलाची शिकवण आम्हाला पदोपदी कर्तव्याचे स्मरण देत राहील. शाळेच्या पहिल्या दिवशी डोळ्यात अश्रू होते. आजही डोळ्यात अश्रू आहेत. जणू ते खंत व्यक्त करताहेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  धन्‍यवाद

 निबंध 2


मी शाळेचा निरोप घेताना

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शाळेतील कालावधी
  • शिक्षक-मुख्याध्यापक
  • इतर सांस्कृतिक कार्यक्रम
  • पुढील आयुष्यास असणाऱ्या गुणांची शिदोरी

आज शाळेत निरोप समारंभ होता. रोज शाळेकडे धाव घेणारी पावले मंद झाली होती. तब्बल बारा वर्षे, एक तप या शाळेत मी काढलं होतं. इयत्ता पहिलीत बावरलेल्या अवस्थेतच मी आईचे बोट धरून या शाळेत प्रवेश केला. इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतची शाळा असल्यामुळे एवढी मोठी शाळा, इतकी प्रचंड विद्यार्थ्यांची संख्या पाहून मी भांबावूनच गेलो होतो. काय करावं काही न सुचत नव्हते  परंतु शाळेतल्या बाईंनी जवळ घेतलं. डोळे पुसले. आणि मनातली भीती पार पळाली. शाळेबद्दल विश्वास वाटू लागला.


तेव्हापासूनची शाळेतील बारा वर्षे कशी उडून गेली समजलं नाही. त्या वेळचा भित्रा, परंतु खोडकर, हुशार परंतु आळशी मुलगा जबाबदार नागरिक झाला होता.



बहुढंगी व विविध रंगी व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक लाभले. सर्वांनी जातीनं लक्ष दिलं. प्रत्येक शिक्षकाचं काही ना काही वैशिष्ट्य होतं. नकळत शिक्षकांशी दोस्ती झाली. शाळा मित्र बनली. शाळेचे मुख्याध्यापक फारसे भेटले नाहीत. त्यांचा दबदबाच फार होता.


 एकदा दंगा केला म्हणून त्यांच्याकडे नेलं होतं. त्यांना बघून लगेच भीतीनं रडायला सुरुवात केली. चूक कबूल केली. त्यांनी मी केलेल्या खोड्यांच्या परिणामांची कल्पना दिली. परत तशी चूक माझ्या पुढील आयुष्यात घडली नाही, घडणार नाही, असा बदल माझ्यात झाला. त्यांचे भाषण मनापासून आवडायचे. पण त्यांच्याबद्दल मनात आदरयुक्त भीतीच घर करून बसली.



याच शाळेत मला चांगले मित्र भेटले. एकत्र बसून अभ्यास केला.  एकमेकांना भेटल्याशिवाय चैनच पडायची नाही. शाळेची सुट्टीही नकोशी वाटायची. आता प्रत्येकजण दशदिशांना जातील, परत केव्हा भेटतील कोण जाणे, या विचाराने मन अस्वस्थ झालं. मित्रांबरोबर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आठवले, अटीतटीचे सामने आठवले. मन सगळ्या आठवणींनी भरून गेले.


शाळेनं आपल्याला काय काय आणि किती किती दिलं यांची मनातल्या मनात यादी तयार झाली. ज्ञान, संस्कार यांचे धन या शाळेत गवसलं होतं. समाजातील चुकीच्या मार्गावर पावले पडणार नाहीत, याची जबाबदारी उचलली होती. भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुणांची शिदोरी दिली होती.



शाळेत निरोपसमारंभ चालू होता. पण माझे लक्ष तिकडे नव्हतेच. माझे मन भूतकाळात गिरक्या मारत होते. भूतकाळातील रम्य-रम्य आठवणी वेचून आणत होते. नेहमीचा गडबड्या - बडबड्या मी आज मूक झालो होतो. माझ्या शाळेविषयी, शिक्षकांविषयी वाटणाऱ्या आपुलकीनं, कृतज्ञतेनं मन भरून गेलं होतं. मित्रांच्या होणाऱ्या ताटातुटीमुळे अस्वस्थ झालो होतो. पण भविष्यकाळात झेप घेण्यासाठी पंखात बळ आलं होतं.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

प्रिय  गुरुजनहो.आज आम्ही शाळेचा निरोप घेत आहोत. याच्यापुढे आम्ही आयुष्यात कधीही या बाकांवर विद्यार्थी म्हणून बसणार नाही, हा विचार मनाला कुरतडतोय. ज्या वास्तूत आम्ही जवळ - जवळ  दहा वर्ष हुंदडलो, खिदळलो आणि रडलोही, ज्या वास्तूत आमच्या पाठीवर शाबासकीची, कौतुकाची थाप बसली, तशी गालावर शिक्षेची थापट बसली, त्या वास्तूला सोडून जाताना, आमचं हृदय एखाद्या भिंगाप्रमाणे तडकून गेलंय. त्या शाळेला आज आम्ही सोडून चाललोय. पण अनेक कारणांमुळे ही शाळा आमच्या मनात घर करून राहिली आहे. आम्ही शाळेला विसरणार नाही.


हे गुरुवर्य, तुम्ही आम्हाला ज्ञान दिलंत, आमच्या मनावर सुसंस्कार केलेत, आमच्यामध्ये सामाजिक, राष्ट्रीय बांधिलकीची जाण निर्माण केलीत. एखादा कुंभार जशी मडकी घडवतो, तसं तुम्ही आम्हांला घडवलंत. तुम्ही जे दिलंत, ती आमची शिदोरी आहे.


 शाळेच्या संकुचित क्षेत्रातून जगाच्या व्यापक आणि विस्तीर्ण अशा क्षेत्रात आम्ही पदार्पण करणार आहोत. तिथे आमची जी वाटचाल होईल, ती तुम्ही दिलेल्या शिदोरीच्या जोरावरच. त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी रहाणार आहोत.


तुमचे हे आजचे विद्यार्थी, उद्या निरनिराळ्या क्षेत्रात गरुडझेप घेणार आहेत. अशी उंच उंच झेप घेताना त्यांच्या मनात, एक जाणीव सतत जागृत रहाणार आहे. असं झेपावताना, आपल्या पंखात जे बळ आलंय ना ते, गुरुजनहो, तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला ज्ञानामृत पाजलंत. तुम्हीच आमच्यात चैतन्य फुकलंत आणि तुम्हीच आम्हाला ध्येयपथावर धावायला शिकवलंत. 


विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी आपल्या गुरूपेक्षा तो लहान असतो. माडाचा शेंडा उंच आकाशात डौलाने डोलत असतो. त्याला माहीत असतं की माझा हा डौल मला धरणीशी घट्ट बांधन ठेवणाऱ्या मुळामुळे आहे. तसंच आम्हांला ठाऊक आहे की आमच्या भावी आयुष्याची बीजं इथे रुजली आहेत. इथेच दृढ झाली आहेत.


जाताना आम्ही तुम्हाला काही आश्वासन देत आहोत. ज्या - ज्या वेळी शाळा आम्हाला मदतीसाठी हाक मारील त्या त्या वेळी आम्ही तिला ओ देऊ. तुम्हीच आमच्यात एक सुबुद्ध नागरिक निर्मिलात. समाजातील दुर्बल घटकांना आपलं मानून भुकेलेल्याला अन्न, निराधाराला आधार, बेघराला आश्रय देणे हे आमचे कर्तव्य असेल आणि ते कर्तव्य आम्ही नेटाने पार पाडू.


आंधळ्याची काठी होऊन जगायला तुम्हीच शिकवलंत. तसेच जगू आणि शेवटी, आमच्या कुळाला, शाळेला, राष्ट्राला अपमानित करील, लाजेने मान खाली घालायला लावेल, असं एकही कृत्य आमच्या हातून घडणार नाही. कधीही घडणार नाही.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 4

शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | shalecha nirop ghetana nibandh marathi


सभागृह गच्च भरलं होतं. प्राचार्य बोलत होते- “आज आम्ही तुम्हाला निरोप देत आहोत. खरंतर भेटीच्या पोटीच असतात ताटातुटी..." नकळत अधूंनी पडदा धरला. पावसात गाडीच्या पुढच्या काचेतून काही दिसू नये तसं झालं. पण तिथे निदान वायपर तरी असतात, इथे भरून आलेल्या मनाच्या आकाशातून पाऊस डोळ्यांत उतरला होता. 


तर वायपर कुठून आणणार? ... कान बधिर झाले होते... हातापायांना कंप सुटला होता... मन सैरभर होतं. काय गंमत आहे! या शाळेत पहिलीत पाऊल ठेवताना हीच अवस्था होती. आज निरोप घेतानाही! पण फरक केवढा होता! येताना भीती होती, जाताना भक्ती. 


येताना माझी पाटी कोरी होती, जाताना ज्ञानभांडारातील अमोल रत्नाने शिगोशीग भरली होती.  येताना होता मातीचा गोळा, जाताना झालं त्याचं सुंदर शिल्प. सुरवंटाचं फुलपाखरू, ही किमया घडवली शाळेनं, माझ्या गुरूंनी!


ही इमारत म्हणजे नुसत्या चुना-विटांच्या खोल्या कसं म्हणू मी? हे तर आहे साक्षात् मंदिर- शारदादेवीचं! मंदिरात असते म्हणून का असते शाळेत ही घंटा! या मंदिराच्या गाभाऱ्यात केलेत आम्ही कविता पठणांचे घोष, संस्कृत शब्दांचे पठण, पाढ्यांची आवर्तनं... आठवते, 


रोजची राष्ट्रगीताची व शारदेची प्रार्थना, जणू 'अपवित्रं पवित्रं भवेत्।' 'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणतच संस्काराचे पाठ सुरू व्हायचे. हीच जागा  जिथे माझी ज्ञानेश्वरांची, चोखा मेळ्याची, कबीर, इंदिरा संत, यशवंत, पाडगावकरांची ओळख झाली. 


इथेच मला कालिदास, शिवाजी महाराज, पं. नेहरू भेटले. इथेच माझी एडिसन, न्यूटन यांची मैत्री झाली. मानवी रचना समजली इथेच. हिशेब शिकले इथेच. इथेच मी चार भिंतीत बसून जगाची सफर केली. माझी जिज्ञासा चेतवली, फुलवली. काही शमवली गेली ती इथेच! सहजीवन मी इथे अनुभवले. 


डबेच काय सुख आणि दु:खही वाटून घेतले. रुसवे-फुगवे, भांडणतंटे, कट्टीबट्टी यांनी चविष्ट केलं इथलं जीवन... आठवतात ती स्नेहसंमेलनं. ते नाटिका बसवणं, गाण्यांच्या तालमी, प्रदर्शनाचे तक्ते, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा... ते जिंकणं... ते हरणं! 


व्यक्तिमत्त्वाला पैलू पडले ते असे आणि इथेच! काहींचं घडणं, काहींचं बिघडणं... सारे आठवते... त्या खोड्या, सरांना दिलेला त्रास, मारलेल्या थापा, किती निरुपद्रवी!  आता हे सारं संपलं. क्षितिजे विस्तारली, पण त्या क्षितिजापर्यंत पाह शकणारी नजर दिली ती शाळेनं. 


सरोवरामधल्या माशाला सागरात गेल्यावर काय वाटेल ते आज अनुभवलं... पण त्यातही पोहण्याचा आत्मविश्वास दिला याच शाळेनं! आता आम्ही कोणी इंजिनियर, डॉक्टर होऊ, देशाचे नेते होऊन राज्यकारभार करू, शोध लावू, मानवजातीचं कल्याण करू, कलावंत होऊ, क्रीडापटू होऊन मैदान गाजवू... आणि मुलाखतीमधून अभिमानानं सांगू, .... हे सारं आम्ही या शाळेतून घेऊन आलो...


टाळ्यांचा हलकासा आवाज झाला. कुणीतरी हलवून भावनांचा सरच हिसकावून घेतला. वास्तवाचं भान आलं. “कसला विचार चाललाय? निरोप समारंभ संपला...” कुणीतरी म्हणालं. निरोप घ्यायचा? या शाळेचा मी निरोप घ्यायचा? नाही, मी रोप' घेणार या शाळेतून. माझ्या व्यक्तिमत्त्वाचं! छोट्या कुंड्यातून- मोठ्या जमिनीत लावण्यासाठी! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 5

शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | shalecha nirop ghetana nibandh marathi


स्मृतींची चाळता पाने, बाष्पांध होती लोचने ! शालेय जीवनातल्या स्मृती पाण्यातल्या कासवाप्रमाणे जेव्हा मानस सरोवराच्या पृष्ठभागावर येतात तेव्हा माझे अंतःकरण भरून येते. तसं पाहिलं तर तीनच वर्षे मी पनवेलच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये होतो पण सर्व शाळासोबती व शिक्षक यांच्याशी मी समरस झालो होतो. 


कोणाशी टोकाचे भांडण नाही तर कोणाबरोबर गळ्यात गळा घालण्याइतकी गळेपडूं दोस्ती नाही. संस्कृतचे ‘ग.भि.' सर, मराठीचे 'ब.वा. काळे' इतिहासाचे 'मन्नूर' 'शास्त्राचे' 'हिंगे' सर, गणिताच्या. 'महाजन' बाई या साऱ्यांबद्दल माझ्या मनात फार आदर ! अजूनसुद्धा ते सर शिकवताहेत व त्यांच्या तासाला मी बसलोय असा मला भास होतो.


ते शिकवताना मी कधी दुसरे चाळे केले नाहीत. भूगोलाचे. भाऊ गोगटे गप्पा मारत शिकवायचे, ते बदलले. त्यावेळी आमचे सुपरिंटेडेंट (हा शब्द सुद्धा उच्चारायला मला तेव्हा फार आवडत असे.) होते श्री. टकले. मोठे हरहुन्नरी व कडक शिस्तीचे भोक्ते.


माझा योगायोगावर विश्वास आहे. सर्व चांगले शिक्षक मला एस.एस.सी. च्या वर्गाला शिकवायला आले हा एक प्रकारचा योगायोगच. चांगली शाळा व चांगले शिक्षक लाभणे हे जीवनातले केवढे मोठे समाधान आहे ते सुरुवातीला समजत नाही. अर्धे आयुष्य सरल्यावर उमजते.


म्हणूनच शाळेचा निरोप घेताना मला फार गहिवरून आले. हल्लीसारखे मुलांचे फोटो घेणे, सभागृहात त्यांना उपदेश करणे हे प्रकार तेव्हा नव्हते. वर्गातच मुलांना निरोप दिला जात होता.


"आजचा हा माझा शेवटचा तास. शाळेच्या चार भिंतीच्या वाडयातून तुम्ही आता उघड्या जगात वावरणार आहात, ही शालान्त परीक्षा म्हणजे पुढच्या परीक्षांची रंगीत तालीमच. तुम्ही शाळेत असताना मी तुमच्यापैकी कोणावर रागावलो असेन, क्वचित मी मारलेही असेल कुणाला. 


पण त्या मागे भावना एकच होती, तुमचे भले व्हावे. माझ्या त्या वागण्याबद्दल मनात आकस ठेवू नका. ओळख ठेवा, माझी व मुख्यतः तुमच्या शाळेची !' सर्व शिक्षकांच्या मुखातून हीच अमृतवाणी स्रवत होती. शब्द वेगळे, वाक्ये निराळी. पण भावार्थ हाच. शेवटचा तास संपला. 


आता पुन्हा इकडे यायचे नाही या भावनेने मन कातर झाले । फळ्यासमोर पहिल्या बाकावर मी बसत असे. त्या बाकाकडे मी पाहिले. तो बाकसुद्धा वासराच्या पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहात आहे असा मला भास झाला. 


वर्गाच्या भिंती, दारे, खिडक्या, फळा, टेबल, खुर्ची या साऱ्यांना इंद्रासारखे सहस्रनेत्र फुटले आहेत व त्या नेत्रांनी ही सारी माझ्याकडे भावुकतेने पाहत आहेत असे मला वाटले. माझ्या डोळ्यांत चटकन पाणी आले... तेवढ्यात माझ्या बाकातून 'वाक, वाक' असे शब्द उमटले असे मला जाणवले. 'शिक्षकांच्या पायांवर वाक', असा संदेशच जणू तो बाक देत होता. मी शिक्षकांच्या खोलीकडे वळलो.


पण तेथे कोणी नव्हते. बहुतेक सारे शाळेसमोरच्या रस्त्यावर उभे होते. तिथे रस्त्यात त्यांच्यासमोर मान वाकवायला मला लाज वाटली. हे लिहिताना आताही लाज वाटते पण ती वस्तुस्थिती आहे. लोक काय म्हणतील ? ते हसतील...अशा शंकेने मी माझ्या आयुष्यातील ते सोन्याचे क्षण वाया दवडले आहेत.


कधी कधी वाटते - अजून धाव घ्यावी. त्या बाकांची क्षमा मागावी आणि आपल्या शिक्षकांच्या पायांवर मस्तक ठेवावे. लगेच कवी गोविंदाग्रज कानात सांगतात 'सुकले फूल न वास देत जरि अधूंनी भिजले !'  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद




निबंध 4


शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | shalecha nirop ghetana nibandh marathi

“आता ह्यावर्षी काय पुण्याच्या कॉलेजमध्ये नं? कुठे घेणार अॅडमिशन? एकटा हॉस्टेलवर राहणार की आजीकडे?' अशा अनेक प्रश्नांचा भडिमार पाहणे मंडळी ९ वी पास झाल्यापासूनच माझ्यावर करीत होती! यंदाचं १० वीचं वर्ष, अभ्यासाचं वर्ष! तसंच माझ्या शाळेतलंही शेवटचंच वर्ष! 


ही जाणीव तेव्हा मला सर्वांनी करून दिली नि मी एकदम गडबडलो. खरंच, मला ह्या वर्षी जावं लागणार शाळा सोडून! ज्या ज्ञानमंदिरात गेले १२ वर्षे मी रमलो, ते सत्यशिवाहून सुंदर मंदिर मला पारखं होणार! मला कल्पनाच करवत नव्हती. चित्रपटातला फ्लॅश बॅक पहावा...तसा आईने बोट धरून मला शाळेत नेलेला पहिला दिवस आठवला! पहिले ८-१० दिवस तीही बसायची बालवाडीत! नवीन छोटंस दप्तर, नवा डबा, डब्यात पोळी-भाजी, खाऊ, नवा ड्रेस, नवीन बूट काय थाट होता!


शाळा म्हणजे गंमत, शाळा म्हणजे मस्ती, दंगा, लाडके दोस्त! अशी तेव्हा माझी शाळेबद्दल भावना होती. इथेच मला पहिल्यांदा वर्णमालेची, अर्थात मातृभाषेची खरी ओळख झाली. मी डब्यातली भाजीपोळी चाटूनपुसून खाऊ लागलो. निरनिराळे खेळ खेळू लागलो. भांडणं झाली, रडारडी झाली...तरी शाळेतून घरी जाताना, हसतमुखच परतायचं असतं, हेही शिकलो!


काही दिवसांतच शाळेची भीती नाहिशी झाली. शाळा ‘आपली'शी झाली. तिथल्या बाईंचे वाक्य म्हणजे जणू 'ब्रह्मवाक्य'च वाटू लागले. । दंगामस्तीत पूर्वप्राथमिक शाळा संपवून मी प्राथमिक शाळेत केव्हा आलो याचा पत्ताच लागला नाही! प्राथमिक शाळेत काही निराधार मुलांसाठी शाळेतर्फे मोफत वसतिगृह चालवले जाते. 


तेथील मोठ्या मुलांचे छोट्यांशी असलेले प्रेमाचे, बंधुत्वाचे तसेच जबाबदारीचे वर्तन पाहून लहान भावाशी एवढ्या तेवढ्यावरून भांडणारा 'मी' नेहमीच खजिल व्हायचो! लहानांना कसं सांभाळून घ्यायचं हेही मला या शाळेतच उमगलं!


आमची शाळा संत गाडगेमहाराज विद्यालय! ‘गाडगेबाबा...' नाव उच्चारताच करुणा, दया, माया, शिक्षण, गरीबांबद्दलची कळवळ, गांजलेल्यांची सेवा, स्वच्छता याची नितांत आठवण आली नाही तर नवलच! वर्ग झाडायचा असो, मैदानाची सफाई करायची असो, गॅदरींगची पूर्वतयारी असो किंवा एखाद्या वर्गमित्राला दवाखान्यात नेणे असो,


सर्व कामे प्रामाणिकपणे, हलकी न मानता, त्याची लाज न बाळगता' करण्याची सवय मला या शाळेतच लागली. समोर संत गाडगेबाबांचं नाव असल्याने शाळेला गालबोट लागेल, असे कृत्य मी कधी केले नाही. माझ्या इवल्याशा १५ वर्षांच्या आयुष्यातली १०-१२ वर्षे मी ह्या वास्तूत राहिलो, मोठा झालो. 


नुसताच शरीराने नव्हे, तर मनानेही! मला शाळेने मोठे केले. कूपमंडूक वृत्ती न ठेवता मला विशाल दृष्टिकोन लाभला तो येथेच! जीवनात यशस्वी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, पराभव पचविण्याची खिलाडूवृत्ती, उत्तुंग शिखरे, पादाक्रांत करण्यासाठी लागणारी ईर्ष्या, स्वत:च्या पायावर उभे राहण्याची इच्छा, दुर्दम्य शक्ती व बोचरी शिस्त या शाळेनेच मला दिली.


सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू । नवे जग नवी आशा, शोध घेण्याची जबर मनीषा । याच शाळेने लावले वळण, त्यावर चढुया यशाची चढण । असा संकल्प रथाचा रथ मनात घोडदौड करीतच होता. पण, आता ही इमारत, मैदान, चित्रकला, हॉल, प्रयोगशाळा, वाचनालय, व्यायामशाळा...सर्व सोडून द्यायचं! just unbearable!


माझ्या मते, शाळा म्हणजे...नुसत्या शाळेच्या भिंती नव्हेत, तर तिथला शैक्षणिक परिसर, अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी झटणारे अनेक मार्गदर्शक, शिक्षणसागरात विद्यार्थ्यांचं तारु व्यवस्थित किनाऱ्याला लावून देणारे गुरुजन दीपस्तंभासारखे अचल. शाळा म्हणजे... तिथले उच्च संस्कार, जातीधर्म सर्व काही विसरून हातचं राखून न ठेवता ज्ञानदान करणारी निर्मळ, मनाची, क्षमाशील माऊली. म्हणूनच तिच्या बाबतीत म्हटले जाते,


ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे, त्या ज्ञानाचे मंदिर हे ।। तिला सोडून जायचा दिवस जसाजसा जवळ येतोय, तशी माझ्या मनाची खूपच घालमेल होऊ लागली आहे. वर्गातले सगळे सखे-सवंगडी अनेक दिशांना विखुरणार! कुणी डॉक्टर, कुणी इंजिनीयर, कुणी तंत्रज्ञ तर कुणी आदर्श शेतकरी होतील. 


त्यांच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील भरीव कामगिरीचे मोठे श्रेय अर्थातच असणार आहे - शाळेला! शाळेचा निरोप घ्यायचा? छे! छे! शरीराने जरी मी शाळेचा निरोप घेतला, तरी तरी मनाने मी तेथेच असेन. 'Our ways may change but not our hearts, our life may lead us apart but our memories will link us together.'


शाळा सोडायला तर अजून थोड्या दिवसांचा अवधी आहे, पण त्या कल्पनेनं सरांचेही डोळे पाणावले. ते परवाच म्हणाले, आज तू सज्ञान होणार नव्या जगाला माहीत हो गरुड भरारी उंच मार तू अन दो धृवांना माहित हो! गुरुजनांचा हा आशीर्वाद पाठीशी असेल, तर निश्चितच मी भरीव कामगिरी करीन!


शिक्षणासाठी शहरात गेलो, तरी माझ्या गावातल्या शाळेला मी कसा विसरेन जिने माझ्यावर मातृवत प्रेम केले. शाळेच्या स्मृती सतत माझ्या अंत:करणात राहतील. कधीतरी खेड्यामधली दिसू लागता जुनी शाळा घरट्याकडे पाखरे, तशा आठवणी होतील गोळा। मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद