छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | chhatrapati shivaji maharaj nibandh in marathi

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | chhatrapati shivaji maharaj nibandh in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज  मराठी निबंध बघणार आहोत. साडेतिनशे वर्षाच्‍या गुलामगीरीच्‍या बंधनातुन मुक्‍त करून हिंदवि स्‍वराज्यात सुख आणि शांतीने जगण्‍याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परीश्रम करून जनतेला दिला . अश्‍या या महान योध्‍याला नमन करूया आणी सुरूवात करूया निबंधाला. 


सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनताशिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब  बहाल केला.


महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या, सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले.शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली. 


सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.



स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकारण धुरंदर, दूरदृष्टीचे होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. सागरात आरमार जय्यत तयारीत होते. अनेक शूर, लढवय्ये, पराक्रमी वीर स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला.


शत्रूचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात, न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते. शेतकऱ्यांची गा-हाणी दूर होत होती. 


प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या. स्वराज्याचा विस्तार झाला होता. अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' याचा प्रत्यय आणून दिला होता.



त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली.  अनेक मोहीमा काढून शिवरायांनी शत्रूला नामोहरम केले. प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे, राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले.


प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले.


अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. तरीही त्याची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अखेर इ. स. १६८० मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध मराठी 2

shivaji maharaj jayanti nibandh

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  •  शिवाजी महाराजांचा आगळेपणा
  • स्वराज्यस्थापनेचा उद्देश
  • त्यात आलेल्या अडचणी
  • स्वराज्याची व्यवस्था
  • व्यक्तिमत्वाचे विविध पैलू


प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या मते प्राचीन काळापासून जे जे श्रेष्ठ राजे भारतवर्षात होऊन गेले त्या सर्वांमध्ये श्री शिवाजी महाराज एक आगळे वेगळे होते. कारण त्या राजांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य नष्ट झाले. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राज्याच्या रक्षणासाठी मराठे लढले. त्यांनी राज्याचे रक्षण केले. 


प्रतिकूल राजकीय परिस्थितीत कोणीही नेता नसताना मराठी फौज लढत राहिली. कारण त्यांना ते 'शिवाजी महाराजांचे राज्य' असे कधीच वाटले नाही. त्यांनी ते राज्य स्वतःचे मानले. अशी घटनाच देशाच्या इतिहासात अनोखी व एकमेव होती. 


जनतेच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षेचे शिवाजीमहाराज प्रतिनिधी होते.  'लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही.'एका सामान्य जहागिरदाराच्या मुलाने मोगल बादशाहीला आव्हान देणे म्हणजे सामान्य बाब नव्हे.


 खरोखर ‘स्वत:च्या हिंमतीवर, समोर कोणी मार्गदर्शक नसताना मध्ययुगीन भारतात नवीन रस्ता बांधून दाखवणारे ते कल्पक पुरुष होते,' स्वराज्य स्थापन करताना जीवाला जीव देणारे साथी-सोबती त्यांनी निर्माण केले. स्वराज्य स्थापन करताना त्यांच्यापुढे कठीण अडचणी आल्या. संकटांचे महापूर आले. परंतु ते हरहुन्नरी, निधड्या छातीचे, गंभीर, योजक, प्रसंगावधानी लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो, की शाहिस्तेखानावर छापा असो, किंवा आग्ऱ्याची नजरकैद असो, ते सर्व प्रसंगांतून सहीसलामत सुटले.



शिवाजीमहाराजांचे राज्य स्वत:चे राज्य नव्हते. प्रजेचे राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. 'श्रीमान योगी' होते. आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या, मृतप्राय समाजाला शुद्धीवर आणायचे, वर मान करून आपल्या हीनदीनतेस कारणीभूत झालेल्या परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध दंड थोपटून राहण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केले.



शिवाजीमहाराज व्यवहारी होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच राज्य त्यांनी वाढवले. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला, समाजाला व राज्यसंस्थेला 'शाप' ठरलेली वतनदारी पद्धत त्यांनी बंद केली. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, उच्च महत्त्वाकांक्षी, कर्तबगार. स्वाभिमानी व स्वराज्यनिष्ठ बनविण्यासाठी महाराज कष्ट घेत  होते. 


महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला, ठेकेदारी, सावकारी, दलाली हे तिन्ही व्यवसाय त्यांनी बंद केले. ते धर्मरक्षक होते व क्रांतिकारकही होते. त्यांचा धर्माभिमान औरंगजेबासारखा नव्हता. ते परधर्मसहिष्णु होते. उदारमतवादी होते. 


सर्व धर्मांना, मतांना, आचारांना त्यांचे सादर व सप्रेम संरक्षण होते. आग्ऱ्याच्या नजरकैदेत असताना त्यांचा अंगरक्षक 'मदारी मेहतर' होता. तो महाराजांचा विश्वासू सेवक होता. प्रजेला अत्यंत शुद्ध समतोल, स्वस्त व जलद न्याय मिळण्याची सर्व व्यवस्था महाराजांनी केली. 


रोख आर्थिक व्यवहार अमलात आणून सरंजामशाही मोडून काढणारा हा पहिलाच राजा. लष्करी कारभाराची व्यवस्था त्यांनी तशीच डोळसपणे आखली.

 स्वत:चे त्यांचे चारित्र्य निष्कलंक, स्वच्छ होते. शुद्ध मन, सद्भावना व सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. प्रजेच्या सुखाचा विचार करणारा व दुःखाचा नाश करणारा हा लोक-नायक होता. खऱ्या अर्थाने हा रयतेचा राजा होता. त्यांच्या सद्गुणांचा वारसा मराठी मनाला व मराठी लोकांना लाभला आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 3 

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | chhatrapati shivaji maharaj nibandh in marathi



आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या तेजोवलयाने अखिल भारताला दीवपून टाकणारे शिवराय एक अस्सल 'युगप्रर्वतक युवानेता' होते. शिवरायांच्या कार्यरूपी शलाकेने दशदिशा उजळून टाकल्या. या प्राचीन देशाचे देशपण कायम राखले. भावी पिढ्यांसाठी एक चिरंतन आदर्श निर्माण करून ठेवले. 


त्यांनी व्यक्ती म्हणून स्वतःसाठी न जगता, विलास न भोगता हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजीराजे वर्तनाने सद्गुणी, धर्माचरणी व संयमशील होते. मुत्सद्दीपणा, शौर्य, शुध्दाचरण यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या ठायी होता.




लहानपणापासून त्यांनी फार अनमोल माणसे जमविली होती. आपल्या प्रेमाने सर्वांना जिंकले. हृदय अर्पण करून एक एक शेलका दागिना उचलला. कशाच्या जोरावर? हृदयातील स्नेहाच्या जोरावर! त्या सर्वांचे कुशल नेतृत्व केले.


प्रतिकूल परिस्थितीत , गुलामी परंपरेत मोगलासारखा बलाढ्य शत्रूसमोर असतांना शिवरायांचा दुढ दरारा , स्वालंबन वाखाणण्यासारखे आहे. मनुष्यगुणांची उत्तम पारख व कदर त्यांना होती म्हणूनच बाजीप्रभू, तानाजी , येसाजी, मुरारबाजी , जिवा यांच्यासारखे निष्ठावंत व स्वामीभक्त त्यांना लाभले..




आदर्श राजा , शूर नेता कसा असावा तर शिवरायांसारखा ! 'न भूतो न भविष्यति' असा हा राजा! दूरदृष्टी, प्रसंगावधान , योजनाबध्दता, जागरूकता, कार्यकुशलता, न्यायप्रियता, कर्तव्यकठोरता, शौर्य, धैर्य, द्रष्टेपणा हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. 



ज्वलंत राष्ट्रभक्ती, सर्वधर्म सहिष्णूता त्यांच्या रक्तात भिनली होती. चाणाक्ष बुध्दी. विश्वासू, दयार्द्र , श्रध्दाळू, निर्व्यसनी असे शिवराय मुत्सद्दी होते. 'धर्मासाठी लढा नाही , देशासाठी आहे' हे त्यांचे विचार होते. प्रजाजन आणि स्वकीय यांच्यावर त्यांचे प्रेम होते. 'पर स्त्री मातेसमान' या विचाराचे त्यांचे चरित्र्य उज्ज्वल होते. 



ते मातृभक्त , गुरूभक्त आणि ईश्वरभक्त होते. संकटावर मात करण्यासाठी त्यांनी ठेवलेले धोरण, जनकल्याणाची इच्छा, शत्रूशी वागण्याची नीती यामुळे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले. व्यावहारिक तारतम्य बुध्दी व मानवता प्रेम त्यांच्या चरित्रात आढळते. त्यांचे यशस्वी , तेजस्वी आणि ओजस्वी नेतृत्व भारताला लाभले हे अहोभाग्य होय.



'शिवनेरी किल्ल्यावर शिवबा जन्माला आले. 'जिजाऊ' सारखी माता आणि दादोजी कोंडदेवसारखे गुरू त्यांना लाभले. महाराष्ट्रावरचे संकटाचे सावज दूर करण्यासाठी जिजाऊंनी शिवबाला घडविले. मावळे सहकारी निवडून बालपणापासून स्वराज्याच्या ध्यास त्यांनी घेतला. 


स्वराज्य स्थापना हे अंतिम ध्येय पूर्णत्वास जावे म्हणून अखंडपणे तीस वर्षे राजांनी कामगिरी केली. स्वातंत्र्याचे बीज पेरून मराठ्यातील पराक्रमाला त्यांनी जिवंत केले. बलाढ्य शत्रूला शक्तीने प्रसंगी युक्तीने तोंड दिले. सैन्य थोडे असूनही मोठ्या निष्ठेने त्यांनी हा लढा दिला. 



तोरणा किल्ला जिकंणे, पुरंदरचा तह, अफजलखानाचा वध, आग्याहून मिठाईच्या पेठाऱ्यातून सुटका असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात आले. पण स्वतःसाठी न जगणारा हा राजा त्याच्या कार्याशी इतका काही एकरूप झाला होता की , शिवराय आणि त्याचे कार्य या दोन गोष्टी अभिन्न आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.




सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया 

सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्चिद दुःखमाप्नुयात। 


सर्व लोक सुखी असोत, सर्व लोक निरोगी असोत, सर्व सुखकारक गोष्टी पाहोत आणि कोणीही दुःखी नसावेत ही शिवरायांची इच्छा होती. शिवराय दलितांचे मुक्तिदाते, रक्षणकर्ते होते. स्वातंत्र्योत्तर काळातही ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली, तेंव्हा तेंव्हा या नेत्याचे स्मरण भारतवासीयांना झाल्याशिवाय राहिले नाही. आ सेतू-हिमाचल राष्ट्राला




हृदयाच्या श्रीमंतीने जिकंणारा हा राजा!

“झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा !" 

असा आमचा लाडका राजा! त्यांच्या गुणांचे दर्शन घडविताना रामदास स्वामी म्हणतात “निश्चयाचा महामेरू बहुतजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी!"मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद .