वाढती लोकसंख्या शाप की वरदान | Essay on Population Explosion

 वाढती लोकसंख्या शाप की वरदान | Essay on Population Explosion 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  वाढती लोकसंख्या शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत.  कोणतीही गोष्ट एका मर्यादे पलीकडे गेली तर समस्या निर्माण होतात.  हि बाब लोकसंख्येसोबत पण लागू होते.  या निबंधात लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम व ते नियंत्रित ठेवण्याचे फायदे सांगितले  आहेत. या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला   

 


 वाढती लोकसंख्या शाप की वरदान? नुकतीच जनगणना झाली. भारताच्या लोकसंख्येचा आकडा पाहून, उद्गार आले - 'बापरे!' जगात सर्वाधिक लोकसंख्येमध्ये चीनखालोखाल आपलाच क्रमांक लागतो. भारत हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिला, तरी मोठाच आहे. लोकसंख्या वाढणे चांगले की वाईट ? लोकांचे सरासरी आयुर्मान वाढणे, ही गोष्ट चांगली की वाईट? असे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात.   यावरून  हे लक्षात येते कि भारताला लोकसंख्या वाढ या समस्याला सामोरे जावे लागेल. 




लोकसंख्या ही गणिती संख्येने वाढते; पण जमीन मात्र तेवढीच राहते. जसे घराचे क्षेत्रफळ कमी आणि त्या मानाने घरातील लोकांची संख्या अधिक, अशा वेळी त्या घरातील लोकांची गैरसोय होणारच. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे क्षेत्रफळ मात्र तेवढेच राहिले आणि लोकसंख्या मात्र भरमसाठ वाढत गेली. महानगरे फुगली, बकाल वस्ती वाढली आणि अन्नधान्य, पाणी, निवारा या सगळ्यांचीच चणचण भासू लागली. रोगराई वाढली. आरोग्य धोक्यात आले. प्रदूषण वाढले



धरतीवर अतिरिक्त भार वाढतो, तेव्हा निसर्गच तो भार कमी करतो. महापूर, वादळ, भूकंप, त्सुनामी यासारख्या संकटात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात आणि लोकसंख्येला मर्यादा पडते. असे असूनही लोकसंख्या आटोक्यात आलेली नाही. लोकसंख्या जास्त म्हणून लोकशक्ती जास्त, असे मात्र असत नाही. प्रत्येकाच्या मूलभूत गरजा भागविण्याची जबाबदारी सरकारवर असते. पण जमीन कशी वाढवणार, हा प्रश्न आहेच. जमीन तितकीच राहिल्याने अन्नधान्यातही वाढ होत नाही.




लोकसंख्या आटोक्यात आणली नाही, तर बेकारीची समस्या वाढते. शिक्षणासाठी शिक्षणसंस्था अपुऱ्या पडतात. अन्नधान्य, पाणी सगळ्याचीच टंचाई. याचाच अर्थ, लोकसंख्या वाढेल, तशी टंचाईदेखील वाढते. यासाठी कुटुंब कल्याण संस्थेमार्फत लोकप्रबोधन सुरू होते. ‘कुटुंब लहान, सुख महान', हे घोषवाक्य लोकांच्या मनावर ठसविले जाते. अनेक प्रलोभने, सुविधा देण्याचे आश्वासन देऊन लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खेडोपाडी जोरदार प्रचार सुरू आहे.




निरक्षर जनता मात्र कुटुंब-नियोजनाबाबत उदासीनच असते. त्याउलट सुशिक्षित तरुण जोडपी ‘हम दो, हमारा एक' याप्रमाणे आपले कुटुंब त्रिकोणी ठेवतात. पण अशिक्षित, गरीब कुटुंबांत मात्र खूप मुले जन्माला येतात. मग भीक मागणे, चोऱ्या करणे, अशा मार्गाने ते पोट भरतात. भौतिक सुखसोईंच्या अभावातून सूडभावना जन्म घेते. त्यातूनच गुन्हेगारी वाढत जाते. याचा काही फायदा न होता समाजाला तोटेच सहन करावे लागतात. समाज असुरक्षित बनतो. देशाचा विकास होण्याऐवजी अधोगतीच होते. हे एवढे सारे अनर्थ लोकसंख्या-वाढीमुळे होतात.




तेव्हा वाढती लोकसंख्या देशासाठी शापच ठरतो. मर्यादीत लोकसंख्या हेच वरदान. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . व हा  निबंध तुमच्या मित्रमंडळी सोबत व  व्हाट्सअँप ग्रुपवर  शेयर करून लोकसंख्या बद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हातभार लावावा  हि नम्र  विनंती. धन्‍यवाद