पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त मनोगत | popatache manogat in marathi essay

पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त मनोगत | popatache manogat in marathi essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त मनोगत  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत गेल्या हिवाळ्यातली गोष्ट आम्ही हैद्राबाद येथे पशु - पक्षी संग्रहालय बघायला गेलो होतो. मला पक्षी - निरीक्षण फार आवडते . एक एक पक्षी न्याहळत मी पुढे पुढे सरकत होतो. एका पिंजऱ्यात एक खूप सुंदर पोपट होता. मी त्याला 'मिठू ऽ ऽ मिठू' हाक मारली उत्तर म्हणून तोही ‘‘मिठू S S ' म्हणेल अशा प्रतीक्षेत असतांनाच अचानक तो बोलू लागला,

"हरवले गगन, हरवली स्वच्छंद भरारी

नको सोन्याचा पिंजरा सोडूनि द्या, मज बोलाविती मुक्तदिशा चारी..."

 

“मित्रा काय करू रे अशा जगण्याला? गोड फळे , हिरवी मिरची सार खायला मिळतं पण स्वातंत्र्याचे वारे नाही , पायात गुलामीच्या शृंखला , काय करू? सारे येतात , गोड गोड बोलतात . माझं मोहक रूप बघून आनंदित होतात . पण माझी व्यथा तुमच्या नजरेस पडत नाही. माझ्या पिंजऱ्याचे दार उघडून मला स्वच्छंद आकाशात कोणीही नाही. 


मी पराधीन झालो आहे. चाकोरीबध्द या पिंजऱ्यात मी तडफडतो आहे . मुक्त गगन , स्वच्छंद भरारी , मनसोक्त झाडावरचे झोके , मित्रांची मैफिल , सायंकाळचे थव्यासह आकाशातला विहार...... मला खूप आठवतं हे सारं...''


मला माझे ते आनंदी क्षण आठवतात . निसर्गाच्या कुशीत मी जन्मलो, वाढलो. सूर्य-चंद्राच्या किरणात बागडलो. वृक्ष , लता, वेली , चांदणे, झरे यांच्या अंगा-खांदयावर खेळलो. त्याच्या सहवासातले ते आनंदी क्षण का लुप्त झालेत? उंच टेकड्या, मोठे पर्वत , दाट वनराई , निळेशार आकाश, हिरवीगार धरती अशा पार्श्वभूमीवर मुक्तपणे पंखानी भरारी घेत मी विहरत होतो. 


माझ्या मित्रांच्या संगतीने आकाशातला गवसणी घालत होतो. फळांचा येथेच्छ आस्वाद घेत होतो. ती तांबुस संध्याकाळ , तो सूर्यास्त , मंदावलेले झोके, घरट्याकडे परतणारे इतर पक्षी, त्यांचा किलबिलाट हे सारं इथ दिसत नाही. माझं 'मी' पण हरवल म्हणून मी आक्रोश करतो.


"३१ मे तुम्ही जागतिक पोपटदिन म्हणून साजरा करता. ब्रिटनमध्ये पोपटांसाठी विश्वस्त संस्था स्थापन होणार आहे. पोपटांचे जीवनमान सुधारण्याचा हा प्रयत्न पाहून मन सुखावते, पण प्रत्येक पक्षी मुक्त हवा. बंदी नको. माझ्या मित्रांची गगनातली सोबत मला हवी आहे."


माझे सोबती मला भेटतील का? मला मुक्त करणारे कोणी भेटेल का? येथे बरेच जण येतात, प्रेमाने न्याहाळतात , मला खायला देतात. पण माझ्या मनाची भूक भागत नाही. मला बंधनातून मुक्त कोणीच करीत नाही. फासेपारध्याने ज्या दिवशी मला पकडले तो दुर्दिन माझ्या आयुष्यात उगवलाच नसता तर किती बरे झाले असते! गुलामीसारखे दुर्भाग्य नाही! 


मित्रा, माझं मन रडतं रे! पंख असूनही पंख छाटलेला पक्ष्याचा करूण टाहों माझ्या अंतरंगात खळबळत आहे. मित्रा, तुला जर एक खोलीत बंद ठेवले कुणी तर? कल्पनाच सहन होत नाही ना! मग माझे काय हाल असतील? खरा स्वातंत्र्याचा उपासक कुणाला बंदिस्त ठेवूच शकत नाही. असा स्वातंत्र्याचा पुजारी माझ्या दुनियेत कधी बरे अवतरेल? माझ्या मोहक रूपातल्या खिन्न डोळ्यांचा विसर तुम्हाला का पडतो? 


माझी उदासीनता तुम्हाला बोचत कशी नाही? चिरंतन नावीन्य मला आवडते . येथे तर नवीनता नाहीच मुळी! माझ्या नशिबाने माझी थट्टा केली आहे. इथे सगळे ऋतू सारखेच झाले आहेत.''तो पुढे म्हणला, “मी प्रतिक्षेत आहे मुक्ततेच्या ..... स्वातंत्र्याच्या पहाटेची मी वाट बघत आहे.''


बोलण्याचा आवाज बंद झाला. मी भानावर आलो. पोपट गप्प गप्प झाला होता. त्याचे डोळे बोलत होते. नकळत माझा हात पिंजऱ्याचे दार उघडण्यासाठी पुढे सरसावला........ मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 2


पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवृत्त मनोगत | popatache manogat in marathi essay






'हे डाळिंबाचे दाणे वेड्या घात तुझा करिती
' शेजारच्या बंगल्यातील वैभव जोरजोरात कविता वाचत होता. ते शब्द कानावर आले. जिव्हारी झोंबले. मनाला असंख्य इंगळ्या डसाव्यात इतक्या वेदना झाल्या. जखमेवरची खपली निघून ती भळभळा वाहू लागली. मला पारतंत्र्याच्या खाईत लोटणारा, वीतभर पिंजऱ्यात डांबणारा तो काळाकुट्ट क्षण आठवला.


या झाडावरून त्या झाडावर स्वच्छंद
विहार करीत मी एका डाळिंबाच्या झाडावर येऊन बसलो. झाड फळांनी लदबदलेलं होतं. हव्या त्या फळाचा आस्वाद घेण्याच्या कल्पनेने मनोमन सुखावलो होतो. तेवढ्यात एका सोनेरी, कुरळ्या केसांच्या लोभस मुलाकडे माझे लक्ष गेले. 'राघव' त्याचं नाव. वाटीतील डाळिंबाचा एक एक दाणा तोंडात टाकीत तो माझ्याकडेच पाहत होता. मला 'ये, ये' म्हणून खुणावीत होता. 


ते लालबुंद रसरशीत दाणे पाहिले. तोंडाला पाणी सुटलं. मोह आवरता आला नाही. बालकाचा भावही निरागस होता. धोक्याची पुसटशी शंकाही आली नाही. मी भुर्रकन उडून वाटीतील दाणे टिपू लागलो. भानावर आलो तेव्हा समजलं आपण एका पिंजऱ्यात बंदिस्त झालो आहे. माझ्या डोळ्यासपोर काजवे चमकले. - म्हणजे? मला आता माझ्या रानातल्या घरट्यात जाता येणार नाही? 


आई, बाबा, भाऊ यांना भेटता येणार नाही? उभं आयुष्य या टीचभर जागेत काढायचं? अरेरे! कसलं हे जिणं माझ्या कपाळी आलं? विचारांचा ताण असह्य झाला. मला रडू कोसळलं. आजवर किती किती सुखात गेलं माझं बालपण! उडता येत नव्हतं तोवर माझी प्रेमळ आई माझ्यासाठी, माझ्या लहान भावासाठी गोड गोड फळे, रानमेवा आणायची. 


रानातल्या गमतीजमती सांगायची. मधूनमधून धोक्याचे इषारे ही द्यायची. त्याकडे मात्र मी काणाडोळा करीत असे. सुखदुःखाच्या प्रसंगी जातभाई एकत्र जमायचे, गुजगोष्टी करायचे. खूप मजा यायची तेव्हा. माझ्या पंखात बळ आलं तसं आईनी मला उडायला शिकविलं. 



मासळीला पोहायला शिकवावं लागत नाही तसंच आम्हा पक्ष्यांना उडणं शिकायला, शिकवायला फारसं अवघड जात नाही. ती कला आम्हाला उपजतच असते. मी उडायला शिकलो. माझ्या लहानग्या भावासाठी फळे, मेवा नेऊ लागलो. मी केव्हा येतो याची तो आतुरतेने वाट पाहायचा. मी घरट्यात परतलो की आनंदाने उड्या मारायचा. आज मात्र मी प्रेमळ कुटुंबियांच्या सहवासाला कायमचा पारखा झालो. 


समोरच्या वाटीत माझी आवडती मिर्ची, डाळ, फळे, मेवा होता पण एकाही वस्तूला तोंड (चोच) लावायची इच्छा होत नव्हती. रात्र झाली. सारे निद्रादेवीच्या कुशीत पहुडलो. माझा मात्र डोळ्याला डोळा लागणे शक्य नव्हते. आई, बाबा यांच्या अवस्थेचा विचार करीत, अक्षरशः तळमळत ती रात्र काढली.


माझ्या ओढीने राघव सकाळी लौकर उठला. पिंजऱ्याजवळ आला. खाद्यपदार्थांच्या वाट्या तशाच भरलेल्या पाहून त्याला आश्चर्य वाटलं. थोडं वाईटही वाटलं असावं. दिवसभर तो माझ्या पिंजऱ्याजवळ घुटमळत होता. 'मिठ्ठ' अशी लाडिक साद घालीत होता. 'डाळ खा, मिर्ची खा' म्हणून माझी मनधरणी करीत होता. पण मी माझ्याच दुःखात चूर होतो. त्याच्याशी संवाद साधण्याच्या मनःस्थितीत नव्हतो.


काही दिवस लोटले. आता मी थोडा
सावरलो. का कुणास ठाऊक, मनात कुठेतरी आशेला अंकुर फुटला. 'आईबाबांची केव्हातरी भेट होईल' असं वाटू लागलं. त्या आशेवर, त्या सुवर्णक्षणाची प्रतीक्षा करीत दिवस कंठ
 लागलो. पण त्यासाठी देह टिकविणे भाग आहे' मनाची समजूत घातली, 


पुढ्यातील दाणे, फळे खायला सुरुवात केली. राघवला आनंद झाला. त्याचं निरागस प्रेम मला कळत होतं. पण माझ्या मूक भावना त्याला समजू शकत नव्हत्या. - एका सुप्रभाती श्रीरामाची भूपाळी कानावर आली. 'श्रीराम, श्रीराम' असा जपही ऐकू आला. 'राघवचे आजी आजोबा आले असावेत' मी तर्क बांधला. 


माझ्या अंदाज खरा होता. थोड्या वेळाने आजोबा रामायण वाचायला बसले. रामरायाने सीतामाईची रावणाच्या बंदिवासातून सुटका केली. मी तल्लीन होऊन रामकथेचे श्रवण केले. मनाला दिलासा मिळाला. आजोबांचं अनुकरण करीत ‘राम, राम' म्हणू लागलो. तो रामरायाच मला या कारावासातून. सोडवेल अशी श्रद्धा उराशी बाळगून होतो. माझं 'राम, राम' म्हणणं साऱ्या मोहल्ल्यात कौतुकाचा विषय होऊन बसला.


आता राघव मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. आणि एक दिवस चमत्कार घडला. माझी तपश्चर्या फळाला आली जणू! राघव शाळेतून धावत धावत आला. फाटकातून शिरता शिरताच ओरडला, "बाबा, आपण आपल्या मिठ्ठला पिंजऱ्यातून सोडून देऊ या" "अरे पण तुझाच हट्ट होता ना पोपट पाळायचा?" बाबा म्हणाले. 



“हो, हट्ट होता. पण यापुढे मी कधीच असा वेडा हट्ट करणार नाही. आज आमच्या बाईंनी एक कविता शिकवली. त्यांनी सांगितलं की पिंजऱ्यात कोंडलेले पक्षी रात्रंदिवस दुःखाने झुरत असतात. आपला मिठ्ठ काही दिवस जेवत नव्हता, बोलत नव्हता याचं कारण मला आज समजलं. माझ्या लाडक्या मिठ्ठला मी यापुढे दुःख देणार नाही. 


मिट्ट, मला क्षमा कर. माझ्या मूर्खपणामुळे तुला पिंजऱ्यात राहावं लागलं. करशील ना मला माफ?" बोलता बोलता त्याला हुंदका अनावर झाला. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. माझ्याही अधूंचा बांध फुटला. राघवच्या बाबांनी पिंजऱ्याचं दार उघडलं. मी मुक्त झालो. आता मी माझ्या घरी जाईन. स्वजनांना भेटेन. साऱ्यांना रामनामाचा चमत्कार सांगेन. राघवा, दोस्ता, उशिरा का होईना, तुला माझ्या भावना समजल्या. मी तुझे



उपकार जन्मभर विसरणार नाही.
सच्च्या दोस्ताच्या निर्व्याज प्रेमाची ठेव जीवनभर चिमुकल्या हृदयात जतन करेन. माझ्या दूर जाण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तुझी आठवण झाली की मी तुला भेटायला नक्की नक्की येईन. डोळे पूस आणि हास बघू एकदा. येतो मी. 'राम,राम' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद