परीक्षा नसती तर मराठी निबंध | pariksha nastya tar essay in marathi

 परीक्षा नसती तर मराठी निबंध | pariksha nastya tar essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परीक्षा नसतील तर मराठी निबंध बघणार आहोत. सोसायटीतील 'ऑर्केस्ट्रा'च्या कार्यक्रमाला संजूला जायचे होते, पण आई कडाडली, 'वेड्या, चार दिवसांवर परीक्षा आली अन् तू काय वेळ घालवणार ? काही जायचं नाही.' झाले! संजूने हातपाय आपटले अन् म्हटले  या परीक्षाच नसत्या तर बरं झालं असतं.'


खरेच! परीक्षा नसत्या तर मुलांना सतत अभ्यासात बुडून जावे लागले नसते. आज काय आठवड्याची परीक्षा, मग मासिक परीक्षा, मग चाचणी, मग सहामाही, नंतर नऊमाही व शेवटी वार्षिक. अशा सतत परीक्षा चालू असतात. अन् मुलांना सतत मान मोडून अभ्यासात गर्क राहावे लागते. कारण परीक्षेत कमी गुण मिळाले तरी सरासरी गुण कमी होणार. अन् हल्ली तर एकाएका मार्काने नंबर मागे जात असतो. या अशा अतिशय स्पर्धेचा, मुलांच्या मनावर भयंकर ताण येतो. शिवाय मुले मग परीक्षार्थीच बनतात.




परीक्षेत कोणते प्रश्न येतील, परीक्षेसाठी काय विचारतील तेवढेच शिकायचे अशी त्यांची वृत्ती बनते आणि विषय खरोखर समजून घेणे, खोलात जाऊन अभ्यास करणे हे घडतच नाही. तसेच फक्त परीक्षेला महत्त्व असल्याने मुले नुसते पाठ करून येतात व परीक्षेत लिहितात, म्हणजे तो विषय त्यांना नीट कळला व मग ती मुले तसे लिहिणार असे होत नाही. जाऊ दे झाले! 


परीक्षा म्हटले की मुलांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. रात्री जागा! पहाटे उठा! एवढे करूनही काही वेळा शेवटी डोक्यात कोंबलेल्या साऱ्या अभ्यासातील परीक्षेच्या वेळी काहीच आठवत नाही. आजकाल १० वी, १२ वी च्या परीक्षांना इतके महत्त्व प्राप्त झाले आहे की विद्यार्थी बिचारे वर्षभर मान मोडून, दिवसरात्र मेहनत घेऊन अभ्यास करीत राहतात. त्या वर्षात मुलाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करता येत नाही. सतत अभ्यास! अभ्यास! अभ्यास! बरे, एवढे करूनही अपेक्षित मार्कस् मिळतीलच असे नाही. 



परीक्षकांच्या मर्जीवर तर मार्कस् अवलंबून असतात , शिवाय कुठे संगणकाच्या चुका होतात अन् मग मार्कस कमी मिळाले म्हणून विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होते. त्याला हव्या त्या अभ्यासाच्या शाखेत प्रवेश मिळत नाही, मग काही मुले निराश होतात, आपला आत्मविश्वास गमावून बसतात अन् मग त्यांच्या आयुष्याचे नुकसान होते. यातूनच कॉपी करणे, पेपर मिळवणे, परीक्षकांशी दोस्ती करणे अशा गैरमार्गाचा अवलंब चालू होतो. बघा! एवढी सगळी अनिष्टांची मालिका या परीक्षांमुळे होते. त्यापेक्षा परीक्षाच नसतील तर...!



आणखी एक असा विचार आहे की वर्षभर विद्यार्थी जो प्रचंड अभ्यास करतो, त्याची केवळ तीन तासात चाचणी घेणे, हे योग्य आहे का ? १०वी ची परीक्षा या एकाच तणावाखाली विद्यार्थी वर्षभर वावरत असतो.



विद्यार्थीदशेतील मुलांचे हे वय खेळण्याबागडण्याचे असते. पण त्याचा विचारसुद्धा मुलांना मनात आणता येत नाही. आपला एखादा आवडीचा छंद जोपासायचा म्हटले तरी वेळ नाही अशी स्थिती असते. त्यामुळे या 'जीवघेण्या' परीक्षांमुळे मुलांचे बालपण  हरवून जाते. तेव्हा परीक्षा नकोतच! 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2 

परीक्षा नसत्या तर मराठी निबंध |  pariksha nastya tar marathi nibandh

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  1. परीक्षेसाठी करावा लागणारा अभ्यास
  2. मनावर येणारा ताण
  3. अपेक्षेनुसार यश न मिळाल्याने होणारी निराशा
  4. इ. १० वी / १२ वीच्या परीक्षेला आलेलं अवास्तव महत्त्व
  5. परिणाम



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परीक्षा नसत्या तर मराठी निबंध बघणार आहोत.  'अगं अगं, दिपा, उठ नं. सहा वाजून गेले. उद्या तुझी परीक्षा आहे ना? झोपतेस काय?' आई सारखी दिपाला उठवत होती. आज रविवार असूनही लवकर उठण्याची कटकट. दिपा वैतागली. या दहावीत तर परीक्षेचा सारखा ससेमिराच पाठीमागे लागलेला. या परीक्षाच नसत्या तर....


खरंच या परीक्षा नसत्या तर कित्ती छान झालं असतं. परीक्षेसाठी सारखा सारखा अभ्यास करावा लागला नसता. रात्री जागा' किंवा 'पहाटे उठा' हा त्रासच नाहीसा झाला असता.


नाहीतर काय? परीक्षा म्हटली, की 'भीतीचा गोळाच' पोटात उठतो. काय वाचावं? काय काय लक्षात ठेवावं? काही काही समजत नाही. सुचत नाही. सर्व विषयांचा सर्व अभ्यास डोक्यात कोंबण्याचा प्रयत्न केला तरी डोक्यात राहात नाही.


बरं, आपल्या समजुतीप्रमाणे अभ्यास करून गेले तर पेपर नेमका अनपेक्षित येतो. पेपर काढणारा त्याला आवडणारे, त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे वाटणारे असेच घटक परीक्षेसाठी निवडतो. परीक्षकांची आवड-निवड आपल्याला कशी कळणार? काही काही लोक तर अवघडात अवघड प्रश्न काढून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासच नष्ट करतात, त्यात त्यांना कोणतं समाधान मिळतं, कोण जाणे?



बरं, पेपर सोपा गेला, अपेक्षित प्रश्न आले, तरी अपेक्षित मार्क मिळतील याची खात्री नाही. परीक्षकांच्या मूडवर सर्व अवलंबून. काही परीक्षक फार सढळ हाताने गुण देतात, तर काही एकदम कंजूष! म्हणजे दिवसरात्र इतका अभ्यास करून परीक्षकाने फेकलेले गुण घेऊन गप्प बसण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही.


मग काहीजण पेपर मिळवण्याच्या किंवा परीक्षकांशी 'दोस्ती' करण्याच्या गैरमार्गाचा वापर करतात. परीक्षेत अनेकजणं सर्रास 'कॉपी' करतात. मग प्रामाणिकपणे पेपर लिहिणारा व झटून अभ्यास करणारा विद्यार्थी मात्र मागे पडतो. त्याचा अक्षरशः बळी दिला जातो.


इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षांना आलेलं अवास्तव महत्त्व पाहून अक्षरश: जीव दडपून जातो. इ. १० वीचे व इयत्ता १२ वीचे विद्यार्थी व त्यांचे पालक एका तणावाखालीच जगत असतात, वावरत असतात, कारण त्या परीक्षेतील यशावरच त्यांच्या मुलांचे 'भवितव्य' ठरायचे असते. वर्षभर केलेल्या अभ्यासाची केवळ 'दोन-तीन' तासात ‘चाचणी' घेतली जाते.



मुलांचे हे दिवस ‘फुलायचे' असतात. पण या ‘जीवघेण्या' परीक्षा त्यांचे बालपण  हरवून टाकतात, त्यांचे यौवन कोमेजून टाकतात. मुलांमधली स्वच्छंदी वृत्तीच नाहीशी होते. रविवारीसुद्धा आपल्या छंदासाठी त्यांना वेळ देता येत नाही.


पण परीक्षा नसल्यावर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे, आकलनाचे, कौशल्याचे मापन कसे करायचे? सर्व विद्यार्थ्यांना काय एकाच छापाचे गणपती' बनवायचे नसते. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांना समाजात स्थान द्यायला नको का? विकासाची संधी नको का द्यायला? त्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा आवश्यक होऊन बसल्या आहेत. नाहीतर समाजातील रत्नांची' पारखच करता येणार नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

परीक्षा नसती तर मराठी निबंध | pariksha nastya tar essay in marathi


परीक्षांची आवश्यक । परीक्षा नसत्या तर!' वा, काय मजेशीर कल्पना आहे ही. परीक्षा नसत्या तर विदयार्थ्यांच्या जीवनात किती मजा असती! कधी साप्ताहिक परीक्षा, तर कधी त्रैमासिक परीक्षा, कधी सत्र परीक्षा, तर कधी वार्षिक परीक्षा अशा विविध रूपांत या परीक्षांना आम्हांला तोंड दयावे लागते. 


या साऱ्या परीक्षा आम्हां विदयार्थ्यांच्या जीवनातील सर्व आनंद खुडून टाकतात. आईबाबा आणि घरातील इतर मोठी माणसे वेळोवेळी आठवण देत असतात, 'अरे, वेळ का फुकट घालवतोस? अभ्यास कर. परीक्षा जवळ आली आहे ना!' दहावीचे वर्ष म्हणजे तर क्षणाक्षणाला परीक्षेची आठवण ! मग अस्सा राग येतो या परीक्षांचा!!


परीक्षा जवळ आल्या म्हणजे आम्हां विदयार्थ्यांवर वेगवेगळी बंधने घातली जातात आणि परीक्षा तर वर्षभर चालू असतात. त्यामुळे बंधनेही वर्षभर ! ' सारखा टी. व्ही. पाहू नकोस', 'पुरे झाली हं मित्रांबरोबरची भटकंती', 'आता परीक्षा आली, चित्रपट नाही पाहायचे', 'थंड पेये नाही प्यायची', 'आइस्क्रीम नाही खायचे' अशी कितीतरी बंधने !
म्हणून या परीक्षा नकोशा वाटतात.


परीक्षेपाठोपाठ येणारा रिझल्ट, तो तर फारच भयंकर! आपण कितीही अभ्यास केलेला असला, तरी अपेक्षित गुण मिळत नाहीत. टक्केवारी नेहमी कमीच. मग नाही म्हटले तरी आईची बोलणी ऐकावीच लागणार. बाबा म्हणतात, "पुढच्या वेळी जास्त मेहनत करा."


अशा या परीक्षा नसत्या, तर खूप खेळायला मिळाले असते आणि भरपूर टी. व्ही. पाहायला मिळाला असता. पण परीक्षा संपली की, जो आनंदोत्सव साजरा करायला मिळतो, तो कसा मिळाला असता? कधी परीक्षेत चांगले गुण मिळाले, तर आईबाबांकडून जी शाबासकी व बक्षिसे मिळतात, ती परीक्षा नसत्या तर कशी मिळणार? 


आपली अभ्यासाची किती तयारी झाली, हे परीक्षा नसेल तर कसे कळणार? शाळेतील परीक्षा टाळल्या तर पुढील आयुष्यातील परीक्षा कशा देणार? परीक्षा नसत्या तर गुणवत्ताधारकांचा शोध कसा लागला असता? परीक्षा नसत्या तर आपण अभ्यास तरी केला असता का? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद




[शब्दार्थ : खुरडून टाकणे-to kill; to destroy. भारी नावो, ना ४२वो. समाप्त कर देना। भटकंती-roaming. २५वानु. घूमना-फिरना। टक्केवारी- percentage. टवारी. प्रतिशत। गुणवत्ताधारक-person of merits. गुएरावत्ता वाणा. गुणवान, गुणी।]