माझे आवडते फळ आंबा निबंध | essay on amba in marathi

 माझे आवडते फळ आंबा निबंध | essay on amba in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध बघणार आहोत.  भारतात द्राक्षे, सफरचंद, केळी, संत्री, पेरू, डाळिंब आदी अनेक प्रकारची मिळतात. ती खाल्ल्यास आपल्या शरीरातील जीवनसत्त्वांची उणीव भरून निघते. सर्वच फळे शरीरासाठी आवश्यक असतात. पण माझे आवडते फळ 'आंबा' हे आहे. 


आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात.  भारतीय आंबे आपल्या चवीसाठी,लज्जतीसाठी, रंगांसाठी साऱ्या जगात प्रसिद्ध आहेत. आंबा उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे. संपूर्ण जगातील आंबा उत्पादनाच्या ६४% आंबे भारतात उत्पादित होतात. अनेक प्रकारचे आणि चवीचे आंबे मिळतात. उदा. दसरा, लंगडा, अल्फान्सो, आम्रपाली, नीलम,तोतापुरी, इ. भारताखेरीज मेक्सिको,व्हेनेझुएला, मलेशिया, जमैका, माली या देशांतही आंब्याचे उत्पादन होते. 


टॉर्मा, एटकिल, केंट, वॉटर, लिली या विदेशी आंब्यांच्या जाती आहेत. केंट आंब्याचा आकार अगदी डाळिंबासारखा असतो. आंब्याचा रंग हिरवा, पिवळा, केशरी, सोनेरी, लालसुद्धा असतो.  उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा, बिहार, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि आसामात आंब्याचे उत्पादन होते. आंब्यामुळे भारताला भरपूर परकीय चलन मिळते. अरब राष्ट्रे आणि युरोपमध्ये आंब्यांना खूप मागणी आहे.


उन्हाळा आला की, आंबा आपणास आनंदी करतो. रसाळ आंबे उन्हाळ्याच्या उष्णतेत शांती प्रदान करतात. आंबा केवळ फळ नसून ते एक घरगुती औषध पण आहे, कच्चे, पिकलेले आंबे, त्याची साल, कोय, पाने, फूल या सर्वांचा औषध बनविण्यासाठी उपयोग होतो. मी तर उन्हाळयाची वाट आतुरतेने पहातो. रस खाल्ल्याशिवाय या दिवसात जेवण अपुरे वाटते.


आंब्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनतात. उदाहरणार्थ कच्च्या कैऱ्या वाळवून केलेला आमचूर, रस, आंब्याच्या पोळ्या, लोणचे, चटणी, पन्हे, इ. आंब्यात केरोटिन नावाचा घटक असतो, जो शरीरातील जीवनसत्त्वाची कमी पूर्ण करतो. .


दिल्लीला दरवर्षी आंब्याचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरते. त्यात उत्तमोत्तम आंबे व आंब्यांचे खाद्यपदार्थ असतात. यात आंब्यांचे ५०० प्रकार असतात. त्यांची विक्रीही करण्यात येते. सोबतच करमणुकीचे कार्यक्रमही असतात. आंबा खाण्याची मनोरंजक स्पर्धा पण असते. मला या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे वर्षातील तीन महिनेच मिळणारे हे राजसी फळ माझ्याच काय सर्वांच्याच आवडीचे आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद