सर्कशीतील हत्तीचे मनोगत मराठी निबंध | circustil hattiche manogat essay marathi

सर्कशीतील हत्तीचे मनोगत  मराठी निबंध | circustil hattiche manogat essay marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सर्कशीतील हत्तीचे मनोगत  मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्ये एक दुःखी हत्ती स्वतःचे मनोगत व्यक्त करीत आहे. वर वर पाहता  आपल्याला सर्कसमध्ये चोहीकडे आनंदच दिसतो .पण वास्तविक परिस्थिती वेगळी असते हे निबंध वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल.चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

   

कोण ? डॉक्टर काका? मला वाटलंच होतं आज तुम्ही येणार ! काल खेळ करताना माझ्या पायाला जखम झाली याची बातमी  मिळालीच असणार तुम्हाला ! बाकी आमच्या दामूकाकांचं आम्हा सर्वांवर फारच प्रेम ! आणि डॉक्टर, तुम्ही सुद्धा किती हळुवारपणे मलमपट्टी करता ! एक विचारू ? मनाच्या जखमेवर मलमपट्टी करता येते का हो? दचकलात माझा प्रश्न ऐकून ? तुम्हाला काय कल्पना येणार म्हणा ! ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हेच खरं !


वरवर पाहिलं तर मी खूप सुखात आहे. कशाची ददात नाही. आस्थेने काळजी घेणारे मालक, सोबतीला जिवलग मित्र, मनापासून दाद देणारे चाहते, प्रेक्षक यांची तर गणतीच नाही. सुरक्षित जीवन आहे. सुख सुख म्हणतात ते आणखी काय हो ! 

बंदिस्त पोपटासारखा मीही झुरतो आहे. कोणाला सांगू माझी कथा नि व्यथा ?  'देवो दुर्बलघातकः' असं मी ऐकलं आहे. मी तर महाकाय, बलवंत, बुद्धिवंत. माझा देवाने, दैवाने असा घात का केला असेल? ' या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नाही.


आमच्या कुळाचा बडिवार काय वर्णावा? समुद्रमंथनातून जी चौदा रत्नं निघाली त्यातील ऐरावत हा आमचा मूळ पुरुष. देवराज इंद्राच्या ऐश्वर्यमंदिरावरील कळसच म्हणा ना ! विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धिदाता अशा गणपतीला आमच्याच एका पूर्वजाचे मस्तक जोडले होते असे ऐकिवात आहे. राजे, महाराजे, संस्थानिक व श्रीमंत देवस्थाने पदरी हत्ती बाळगतात कारण दाराशी हत्ती झुलणे हे वैभवाचे लक्षण.


पण पूर्वजांचे गोडवे गाऊन काय साधणार म्हणा! माझे भोग मला भोगावेच लागणार, रिंगमास्टरच्या तालावर नाचावे लागणार, आळस केल्यास फटकेही खावे लागणार ! जाऊ द्या- 'आलिया भोगासी असावे सादर' याशिवाय आपल्या हातात आहे तरी काय?


राहून राहून आठवतं माझं ते स्वच्छंद जीवन ! आईबाबांचा मी अतिशय लाडका. रानावनात मस्त हिंडावं, तळ्यात मनसोक्त डुंबावं, भूक लागली की खावं, झोप आली की झोपावं असं मुक्त जीवन होतं. कोणाची गुलामगिरी नाही की चाकरी नाही. पण नियतीला माझं सुख पाहावलं नाही. एक दिवस फिरता फिरता मी मित्रांपसून दूर निघून गेलो. वाट चुकली आणि सर्कसवाल्यांच्या तावडीत सापडलो. 


माझ्या वियोगाने व्याकुळ झालेल्या आईबाबांनी किती शोक केला असेल, मित्र माझ्या आठवणीने किती बेचैन असतील या विचारांनी मी कित्येक दिवस अन्नपाणी वर्ण्य केलं. कितीतरी रात्री डोळ्याला डोळा लागला नाही. 'नको हे जिणं' असं वाटायला लागलं.


परंतु सर्व दुःखांवर रामबाण औषण आहे काळ ! हळूहळू दुःखाची तीव्रता कमी झाली. सर्कशीतलं जिणं पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. नवनवीन खेळ, करामती शिकलो. प्रेक्षकांचे मनोरंजन करू लागलो. टाळ्यांच्या कडकडाटात, बँडच्या निनादात दुःख विसरायचा प्रयत्न चालू होता.


नाही म्हणायला या दुःखात काही आनंदाचे क्षण येतात. समोर बसलेली निरागस मुले चिमुकल्या हातांनी टाळ्या पिटतात तेव्हा धन्यता वाटते. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' या कल्पनेने थोडाफार सुखावतो.


माझ्या माणसाबद्दलच्या भावना तुम्हाला नक्कीच रुचणार नाहीत. मानवतेच्या गप्पा मारणारा माणूस अत्यंत, स्वार्थी, अन्यायी आहे. सर्व जग आपल्या सुखासाठी निर्माण केले आहे असे त्याला वाटते. जंगलतोड करुन तो आम्हाला बेघर करतो आणि स्वतःचं घर बांधतो. अभयारण्याला ‘अभयारण्य' म्हणण्याची सोय राहिली नाही. खरंच सांगा, माणसाला आमच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा, आम्हाला असं दुःखाच्या खाईत लोटण्याचा अधिकार कोणी दिला ?


एकनाथ महाराजांना तृषार्त गाढवाची दया आली आणि त्यांनी त्याची तहान शमविली. माझी ही प्रेमाची तहान भागविणारा एकनाथ पुन्हा केव्हातरी अवतरेल आणि आम्हाला बंधमुक्त करेल या आशेवर आम्ही जगतो आहोत. गजेंद्राचा धावा ऐकून देवाने संकटकाळी त्याचे रक्षण केले. 


त्याला मगरमिठीतून सोडविले. पारतंत्र्याच्या मगरमिठीतून सुटून आम्हालाही मोक्ष मिळावा हेच त्या दयाघनाजवळ मागणे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद


 निबंध 2

सर्कशीतील हत्तीचे मनोगत  मराठी निबंध | circustil hattiche manogat essay marathi


तेजस व मुग्धा यांच्या आग्रहाने आम्ही सर्कस बघायला गेलो. त्या दोघांनाही हत्तीचे काम फार आवडले. त्यातल्या त्यात क्रिकेट खेळणारा 'राम' हत्ती फारच छान होता. सर्कस संपल्यावर परत एकदा हत्ती बघण्याचा त्यांनी हट्ट केला. बालहट्टच तो! मी त्यांना हत्तीच्या पिंजऱ्याकडे घेऊन गेले. हत्तीनं आमच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे बोलत असल्याचा भास झाला.


"काय राव, आवडला का माझा खेळ. तुमची करमणक होते. परंतु तेच तेच खेळ करून दाखवायचा मला फार कंटाळा येतो. पण करणार काय? केला नाही तर चाबकाचे फटके ठरलेले आहेतच. अजूनही बालपणाचा रम्य काळ आठवून मन व्यथित होतं.


"काय मजा होती लहानपणी. आमच्या नेत्याच्या पाठोपाठ कर्नाटकातील जंगलात आम्ही मनसोक्त फिरत असू. श्वेत कमळे असलेल्या सरोवरात मनसोक्त इंबत असू. आम्हाला पकडायचा माणसांनी खूप प्रयत्न केला. परंतु त्यांच्या जाळ्यात आम्ही सापडलोच नाही. परंतु एका संध्याकाळी दैवानं धावा साधला.


“संध्याकाळी आम्ही सर्व बांधव नदीवर पाणी प्यायला गेलो होतो. तेवढ्यात २५-३० जणांचा घोळका मोठे ढोल, डबे बडवत आला. आम्हाला आवाज मुळीच सहन होत नाही. त्यामुळे आम्ही गडबडून गेलो. बाकी सर्वजण आल्या वाटेनं धावत गेले पण माझी वाट चुकली व एका कठड्याच्या दिशेने मी धावू लागलो. सुरक्षित वाटल्याने कठड्यात प्रवेश केला, तोच कठड्याचे दार बंद झाले व मी पुरा जेरबंद झालो.


“मग त्या माणसांनी मला सर्कसच्या मालकाला विकलं. मला त्या सर्कशीतल्या जनावरांमध्ये जावे लागले. मी संतापलो, खूप प्रतिकार केला. परंतु मला इतक्या भल्या भक्कम पिंजऱ्यात ठेवलं होतं की, माझी शक्ती कमी पडली. माझे इतरही बांधव माझ्या शेजारच्या पिंजऱ्यात होते व 'शांत हो', 'शांत हो' अशी माझी समजूत काढत होते.


"दुसऱ्या दिवसापासूनच मला शिकवायला एक 'ट्रेनर' आला. त्याला पाहून मी इतक्या जोरानं ओरडलो की, बिचाऱ्याला पळता भुई थोडी झाली. मग तसेच आठ दिवस गेले. माझ्याकरता खास प्रसिद्ध ट्रेनर केरुनानांना' आणणार अशी चर्चा चालू होती. 


नवव्या दिवशी केरुनाना येऊन हजर झाले. त्यांना पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. पण पारतंत्र्याची खंत मनाला बोचत होती. मी असहकार करण्याचा निश्चय केला. केरुनाना आत आले. त्यांनी माझ्या सोंडेवरून प्रेमानं हात फिरवला. 


परंतु मी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करण्याऐवजी झटकन त्यांना सोंडेत धरलं आणि माझ्या पिंजऱ्याच्या कठड्याच्या भिंतीवर सर्वशक्तीनिशी आपटलं. त्यांना बराच मार लागला तरीही त्यांनी चपळाईनं माझ्यापासून स्वत:ची सुटका करून घेतली. 


“केरुनानांच्या पाठीचे दोन-तीन मणके दुखावले. त्यांना प्लॅस्टर घातलं आहे अशी कुजबूज ऐकू येऊ लागली. दिलेलं अन्न खाणं व पिंजऱ्यात बसून राहणं कंटाळवाणं वाटू लागलं. असे तीन महिने गेले. नंतर परत एका सकाळी केरुनाना आले. 


त्यांनी स्वत: सुरक्षित ठिकाणी राहून मला यथेच्छ मारलं. गंडस्थळावर अंकुशाचा मार दिला. पाठीवर सपासप विजेचा प्रवाह असणारे चाबूक पडत होते. पायांवर काठ्यांचे तडाखे बसत होते. मला काय करावं समजेना. मी गप्प राहिलो. मग मार थांबला.


“दुसऱ्या दिवसांपासून कणिकेचा मलिदा माझ्यासाठी घेऊन केरुनाना येऊ लागले. फार हुशार माणूस. त्यांनी मला बँडच्या तालावर कवायत करायला शिकवली. क्रिकेट खेळायला शिकवलं. तसंच गणपतीची नाचत नाचत पूजा करायलाही शिकवलं.


"मग माझे कार्यक्रम सर्कशीत होऊ लागले. सर्वजण माझ्या कामावर खूष झाले. माझे फटके कमी झाले. परंतु या सर्व गोष्टींचा गला फार कंटाळा येतो. बालपणातील दाट जंगलात घालवलेले दिवस आठवतात. माणूस स्वत:च्या स्वातंत्र्याकरता धडपडतो परंतु दुसऱ्याला मात्र डांबून ठेवतो.


“सर्वांना वाटतं आता मी फार शहाणा झालो आहे. पण एकदा केव्हा तरी रखवालदार बेसावध असताना मी पळून जाणार आहे- आजादीकी ओर! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद