माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi

 माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माणसाची स्मृती नष्ट झाली तर  मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण  माणसाची स्मृती नष्ट झाली तर असलेले 3 निबंध बघणार आहोत “स्मृतीशिवाय नाही गती अन् गतीशिवाय नाही प्रगती....." अशी ही स्मृती माणसाला सोडून गेली तर? क्षणापूर्वीचे किंवा कालचे वा भूतकाळातले काहीच माणसाला आठवले नाही तर....? अचानक एकदा असा विचार मनात डोकवला.


छे ऽ छे! काय भलताच विचार! असा विचार येण्यामागेही एक पार्श्वभूमीही होतीच.आम्ही नवीन जागी रहायला आलो होतो. एकदा सकाळीच दारावरची बेल वाजली.शेजारचे काका दारात उभे होते.मी दार उघडताच त्यांनी विचारले “ए, तू मला सांगशील का? की मी कोण आहे? माझं घर कोठे आहे? मला काहीच आठवत नाही' '


स्मृतिभ्रंश' झालेल्या त्या काकांची अवस्था पाहून मनाने मला विचारले, 'माणसाची स्मृती नष्ट झाली तर काय होईल?''सुरुवातीला वाटले वा! छानच! मग कोणी रागावलेले,मारलेले लक्षात राहणार नाही.दुःखी प्रसंग आठवणार नाहीत. वर्तमानातला एक एक क्षण नव्याने जगता येईल. 


भूतकाळाचा कोणताही परिणाम त्यावर नसणार. कोणाची ओळख नाही, कोणाचा संबंध नाही, काय झाले होत माहीत नाही.फक्त आपणच आपले मालक.आनंदी आनंद "झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे , जीवनगाणे गातच राहावे....."


दुसऱ्याच क्षणी माझ्या मनाने पवित्रा बदलला.छे, भलतंच विपरित घडेल हो! सावध हो! “स्मृती' हे मनुष्याला लाभलेलं वरदान आहे. ज्यायोगे इतर प्राणिमांत्रापेक्षा मानव अधिक प्रगत आहे.भूत , वर्तमान व भवितष्य या तीन काळांना जोडण्याचे सामर्थ्य केवळ स्मृती मुळे माणसाच्या अंगी आलेले आहे. 


विश्वाचा कण न कण या स्मृतीमुळेच जोडला गेलेला आहे. बाळ व आई यांच नातं या स्मृतीमुळेच अमर झाले आहे. नाते' मग ते कोणतेही असो या स्मृतीमुळेच जपले गेले आहे. भोगलेले सुखी क्षण, त्यांची माधुरी आयुष्यभर स्मृतीत रेंगाळत राहते.मनुष्य जगतो तोच मुळी स्मृतीमुळे ! 


तो कुणाचा, कोणीतरी आहे म्हणून तो धडपडतो, काम करतो व जागतो ही. त्याला जगण्याचे पाश आहेत. बाल्य, तारूण्य , वार्धक्य या तिन्ही अवस्था तो अनुभवतो. शिक्षण, ज्ञान, कौशल्य व सर्वांगीण प्रगती यासाठीही स्मृतीचंच बळ लागतं. 


नाहीतर पुस्तके, ज्ञान, शोध , नवीन उपकरणे या साऱ्यांचा विसर पडून फक्त खाणे व झोपणे या दोनच क्रिया उरल्या असत्या. शत्रू की मित्र? योग्य की अयोग्य? आपला की परका? न्याय की अन्याय? ही सारी प्रश्ने निरूत्तर होऊन दवाखाने , न्यायालये, शाळा , कार्यालये, बँका, बाजार सारेच ठप्प! अहो खून कोणाचा झाला? कोणी केला? वकील कोण? सारेच विस्मरण अवस्थेतले मग खटला कोण चालविणार व कसा? 


पेशंटला काय झाले हे सांगता येणार नाही व डॉक्टरांचे नाव लक्षात राहणार नाही तर इलाज कसा होईल? एखाद्याला गावी जायचे पण कोणत्या गावी? माहीत नाही तर प्रवास कसा होईल?


स्वतःची ओळख नाही तर तर तो दुसऱ्यास ओळखणे शक्यच नाही. सारां वेड्यांचा बाजार ठरेल. माणुसकी , संस्कृती, गती व प्रगती याच काय पण साध्या शब्दांनाही अर्थच उरणार नाही. मानवाने ज्ञान संपादन केलेले असूनही विस्मृतीमुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही.


सारी सुखोपयोगी साधने , यंत्रे तशीच वाया जातील. अहो फक्त शरीर खाणार , पिणार डोके बिचारे तर हरवलेले."दोन हात, दोन पाय, एक तोंड माझे सांगेल का कुणी मला नाव काय माझे?" शिक्षणक्षेत्र , कलाक्षेत्र , व्यवसायक्षेत्र , सरकारी क्षेत्र सारे ओस पडतील.रेडिओची गाणी, टि.व्ही.वरचे कार्यक्रम , स्नेहसंमेलने , समारंभ , संगणकाची करामत या साऱ्यातला आनंद लोप पावेल.


आजवरचा ‘आदिमानव ते आजचा उत्क्रांत व प्रगत मानव' हा सारा प्रवास निरर्थक ठरेल.चंद्र, सूर्य, तारे , ग्रह यांचा अभ्यास कोणी करणार नाही. सारी पृथ्वी एका गर्द काळोखात गुरफटली जाईल-विस्मृतीच्या ! मग त्यातून सुटका नाही.पैसा, सौंदर्य, प्रसिद्धी , किर्ती सारे मातिमोल होईल.


मला वाटतं मग परमेश्वराला दुसरंच विश्व निर्माण कराव लागेल, जिथे ‘स्मृती' नांदेल.परत माणूस 'माणूस' म्हणून ओळखला जाईल.त्या नव्या विश्वातला मानव मग म्हणेल


"माणूस माझे नाव,

 माणूस माझे गाव, 

दहा दिशांच्या रिंगणात, 

या पुढे माझी धाव!"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

  माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi

'अहो, मी मोजून पाहिल्या होत्या. पुऱ्या बारा होत्या.' 'अग, पण कुणाला वड्या, भाजी घालून दिली होती का? मोलकरीणबाईंना काही उरलंसुरलं दिलं होतं का? आठव जरा.' 'अहो, नाही. कुणाला काही दिले नाही. काल मी मोजून पाहिल्या माझ्या हातांनी. बारा वाट्या होत्या.


मग एक गेली कुठे?' आई-बाबांमधला संवाद मी ऐकत होते. बाबा म्हणाले, 'नंतर आठवेल. आता त्यावाचून अडले आहे का?' आई म्हणाली, 'तसं नाही हो. पण मी म्हणते गेली कुठे?' एवढीशी वाटी. पण तिने स्त्रीसुलभ स्वभावानुसार आईला चुटपुट लावली. आईने कामे केली. पण डोक्यातली वाटी काही बाहेर येत नव्हती.


दपार झाली. आई बसली होती. मला म्हणाली, 'आशु, तेवढे तांदूळ आण डब्यातले निवडायला ताटात.' मी आज्ञाधारकपणे तांदळाचा डबा उघडला. पाहते तो आत वाटी होती. मी आईला म्हणाले, 'डब्यात एक वाटी आहे. तीच वाटी शोधत होतीस का?' 'हो ग, हो. हल्ली हे असं विसरायला होतं.' आईला वाटी हरवण्यापेक्षा आपल्याला आठवत कसं नाही याची रुखरुख जास्त वाटत होती.


ही झाली तात्पुरती विस्मृती. पण खरंच, माणसाची स्मृती नष्टच झाली तर किती गोंधळ उडेल. आपले सर्व जीवनच स्मृतीवर आधारलेले आहे. आपल्या परीक्षा तर केवळ स्मृतीवरच आधारित आहेत. पेपराचेवेळी सकाळी वाचलेले, पाठ केलेले ऐश्तेळी काही आठवत नाही.


किती अस्वस्थ वाटते अशावेळी! स्मृतीच नष्ट झाली तर परीक्षा आहे हे सुद्धा लक्षात राहणार नाही. शिक्षक काय शिकवायचे हेच विसरून जातील. परीक्षा घ्यायची म्हणून वेळापत्रक केलेले असेल तर ते पाहून वेळेवर परीक्षा घेणेच विसरतील. गडकऱ्यांच्या प्रेमसंन्यास'मधील गोकुळसारखी सर्वांची अवस्था होईल.



कपड्यांना आठवणींच्या गाठीच गाठी मारतील आणि कोणती गाठ कशाची हेच विसरून जातील. परीक्षा घेतली तर पेपर तपासायला विसरतील. विद्यार्थ्यांना नावानिशी ओळखणार नाहीत. स्मृतीच नष्ट झाली तर विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत तरी कशाला फिरकतील?


पालकांना तरी ही आपलीच मुले, ती काय दिवे लावतात हे पाह्यची आठवण कशी राहील? स्त्रिया स्वयंपाकात मीठ दोनदा घालून कधी खारट, तर कधी अजिबात न घालता आळणी स्वयंपाक करतील. कधी तिखटच तिखट घालून ठेवतील. दूध तापत ठेवले तर गॅस बंद करायचा विसरतील. सर्व भांड्यांना ग्रहण लागेल.


कोणी घरातील नळ बंद करायचे विसरेल. मग घरात पाणीच पाणी होईल. शिवाय सर्वजण 'तू नळ उघडा ठेवलास? तू?' असे विचारतील. मग सर्वांचेच उत्तर 'छे! मी नाही.' अंधार पडला तर लाईट लावतील. पण बंद करायचे विसरतील. पंखे गरगरत राहतील.



एखादे लग्न असेल. मांडवात नटूनथटून सर्व गप्पा मारत असतील, अक्षता वाटतील. लग्नघटिका येईल. भटजी सर्व तयारी करतील. मामाला नवऱ्यामुलीला आणायला सांगतील. नवरी येईल. आंतरपाटापलीकडे उभी राहील. नवरामुलगा म्हणेल, 'थांबवा. माझं लग्नच ठरलं नाही. माझे लग्न लावणारे तुम्ही कोण?


ही मुंडावळ्या घातलेली बाई कोण? काय चालवलंय तुम्ही?' इतर लोकांना वाटेल हे हुंड्यासाठी नाटक चालवलेलं दिसतंय. 'अहो, एवढं जर होतं तर आधी नाही का सांगायचं? अहो, स्कूटर दिवाळसणाला देऊ. पण आधी लग्नाला उभे रहा.' सक्तीने कठपुतळ्यासारखा नवरामुलगा लग्नाला उभा राहील. सर्वच मांडव अवाक् होईल.



डॉक्टर एका रोग्याला तपासतील तर त्याचे औषध दुसऱ्याला देतील. काहींना तपासायचेच विसरतील, तर काहींना पुन:पुन्हा तपासतील. पोलिस, चोर चोरी करत असला, तरी नुसते बघत राहतील. ज्याचा अपराध त्याला शिक्षा न होता दुसऱ्याला शिक्षा होईल. चोर सोडून संन्याशाला फाशी होईल.



रहदारीचे नियंत्रण करताना कोणाला थांबा, कोणाला जा सांगितले याचा त्यांचा त्यांनाच मेळ लागणार नाही. त्यामुळे एकाच बाजूची वाहने सतत जात राहतील, तर दुसऱ्या बाजूची वाहने कितीतरी वेळ थांबून राहतील. नुसता सावळा गोंधळ उडेल. शेतकरी शेतात बी पेरायचंच विसरेल. आणि शेताला रोज पाणी देईल.



हिरव्या गर्दीत स्वत:ला झोकून देण्याचे स्वप्न पाहील. अजून पीक का नाही? जेव्हा खणून पाहील तेव्हा लक्षात येईल, अरे, आपण तर बी सुद्धा पेरले नाही. कपाळावर हात मारून घेईल. देशावर कोणी आक्रमण केले तर सैनिक शस्त्र चालवायचेच विसरतील. शत्रूच्या गोळ्यांच्या वर्षावात मरतील. शत्रू अशा जवानांकडे बघतच बसेल.



'अरे, आपल्याला कोणी प्रतिकार कसे करत नाहीत? काही तरी वेगळीच चाल दिसतेय ही भारतीयांची!' मित्र मित्राला ओळखणार नाहीत. कोणी कोणत्याही घरात घुसेल. सर्व काही संपुष्टात येतील. दु:खद स्मृतींचा त्रास होणार नाही. 'टेन्शन' तणाव हे शब्दसुद्धा ऐकायला मिळणार नाहीत. सर्व तणावमुक्त होतील.


एखाद्याची निंदा त्याच्या तोंडावर करायला भीती वाटणार नाही. जामदारखान्याच्या किल्ल्या चोरांच्या हातात देण्यास कोणी कचरणार नाही. चोरांचा सत्कार केला जाईल. राजकीय, प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडेल. सर्वत्र हाहाकार माजेल.


प्रगती खुंटेल. माणूस पुनश्च आदिमानव होईल. थोडक्यात, माणसाची स्मृती नष्ट झाली तर दुनिया वेड्यांचा बाजार एवढी एकच आणि एकच गोष्ट खरी ठरेल! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi


माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक अनुभव घेत असतो. त्यांचे संस्कार मनाच्या कातळावर उमटतात. त्या अनुभवसंस्कारांचे जतन होते. 'धारणा' ही अनुभवसंस्काराची बँक आहे. अनुभव घेतला की त्याचे ठसे मेंदूवर उमटतात. म्हणूनच ‘स्मरण म्हणजे मतानुभव आठवणे' होय.



या स्मरणशक्तीच्या जोरावरच ज्ञानभांडाराचा वारसा पुढे पिढ्यान्पिढ्या चालत आलेला आहे. स्मरणशक्तीमुळेच माणसाचे जीवन समृद्ध झालेले आहे. स्मरणशक्ती ही माणसाला परमेश्वराने दिलेली महान देणगी आहे. स्मरणशक्तीच्या जोरावरच माणसाने अनेक शोध लावले, प्रगतीचे अनेक



टप्पे गाठले. पण या स्मृती'नेच संप पुकारला तर... कल्पनाच करवत नाही. सगळीकडे हाहाकार माजेल. कारण 'स्मृती' ही माणसाच्या प्रगतीची . गुरुकिल्ली आहे. तो मूलाधारच नष्ट झाला तर... गेलेली स्मृती परत मिळविण्यासाठी माणसांना तपश्चर्येलाच बसावे लागेल. परमेश्वरापुढं धरणं धरावं लागेल, की 'हे देवा जगदीशा,



आमची स्मृती का हिरावून घेतलीस? स्मृती नष्ट झाल्यामुळे प्रगतीचे सारे मार्गच खुंटले आहेत. आमचे जीवन असून नसल्यासारखे झाले आहे. तू आम्हाला ही शिक्षा का दिलीस?' आम्ही आमचा गुन्हा कबूल करतो. माणूस मोठा मत्सरी ! सूडभावना त्याच्या मनात धगधगत असते.



वर्षानुवर्षे पिढ्यान्पिढ्या झालेले अपमान, हेवेदावे तो विसरत नाही. मनाच्या कोपऱ्यात तो या घटना घट्ट कवटाळून बसतो. त्यामुळे पिढ्यानपिढ्या खूनसत्र चालू राहते. रक्ताचे पाट वाहतात. मत्सरापोटी अनेक कुटुंबे, अनेक देश बरबाद होतात. मनुष्यहानी होते, म्हणून आम्ही यापुढे सूड-भावनेचा अग्नी गाडून टाकू. एकमेकांशी बंधुभावाने वागू. अहंकार सोडून देऊ. मानवताधर्म पाळू, पण तेवढी आमची स्मृती आम्हाला परत दे.



पण आमची आर्त हाक देवाने ऐकली तर तो देव कसला! काही काळ या विस्मृतीचा झटका सोसावाच लागेल. शाळा-कॉलेजात जाऊन बसायचं म्हटलं तर स्वत:चा वर्गच आठवणार नाही. शिक्षकांनी काही शिकवलं तर ते मनाच्या चाळणीतून गळून पडणार. म्हणून प्रत्येक नोट लिहून ठेवावी लागणार.


लेखनाचं काम खूपच वाढणार. शिक्षकही असंबद्ध बडबड करू लागतील. अध्यापनात पूरक असे संदर्भ त्यांना आठवणारच नाहीत; म्हणून त्यांनाही भाराभर पुस्तके जवळ बाळगावी लागतील. परीक्षा द्यायची म्हटली तर उत्तरं तरी आठवतील का? त्यासाठी कॅल्क्युलेटर्स, कॉम्प्युटर्स प्रत्येकाला जवळ बाळगावे लागतील.


पण भारतासारख्या गरीब देशात प्रत्येकाला हा खर्च परवडेल का? मग 'कॉपी'चा सुळसुळाट वाढेल. प्रत्येक ठिकाणी संदर्भ-पुस्तके न्यावी लागतील; पुस्तकांचा खप वाढेल. प्रकाशकांची चंगळ होईल. घरातून बाहेर पडताना आई-बाबांना नोंदवह्या बरोबर न्याव्या लागतील.


प्रत्येक गोष्टींची नोंद करणे हा मोठा उद्योग होऊन बसणार! स्मरण करून देण्यासाठी घराघरातून घड्याळांच्या गजरांचे खणखणीत आवाज घुमतील. टेलीफोनवाल्यांचे काम वाढेल. माणसांना अर्जंट कामासाठी वेळोवेळी फोन करून स्मरण करून द्यावे लागेल.

तसे अहंभावाला धक्के देणारे प्रसंग, लज्जास्पद व अपमानास्पद बाबी कोणालाच नको असतात. अशा गोष्टी विसरण्याकडेच माणसाचा कल असतो. अशा घटना विस्मृतीच्या कप्प्यात ढकलल्या जातील, पण विकृतीच्या रूपाने त्या पुन्हा वर उफाळून येतील.


मग विसरभोळ्या आजोबांना नातवंडं हसणार नाहीत. वेड्या माणसांना कुणी नावे ठेवणार नाहीत. कारण साऱ्यांचाच खुळ्यांचा बाजार' भरणार. शेवटी आमची स्मृती आम्हाला परत दे, याची परमेश्वराला पुन: पुन्हा आठवण करून द्यावी लागणार! कुणी सांगावं, त्याची ही स्मृती नष्ट झाली तर...! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद