सुसंगती सदा घडो मराठी निबंध | Susangati Sada Ghado Marathi Nibandh

 सुसंगती सदा घडो मराठी निबंध | Susangati Sada Ghado Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सुसंगती सदा घडो मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.


“सुसंगति सदा घडो,

सुजनवाक्य कानी पडो!

कलंक मतिचा झडो, 

विषय सर्वथा नावडो.


" कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेल्या या पंक्ती जीवनाची एक दिशा दर्शवितात. आपण ज्या परिस्थितीत राहतो, ज्यांच्या सहवासात राहतो, त्या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आपण ज्यांच्या संगतीत राहतो, त्यांचे राहणीमान, त्यांचे विचार, त्यांचे गुण दोष यांचा परिणाम नकळतपणे आपला स्वभाव घडवण्यावर होत असतात.


सुगंधी फुलांनी ओंजळ भरलेली असेल तर फुलांचा परिमल तुमच्यासोबत असेल. याउलट एक डांबराची गोळी बाळगाल तर त्याचा उग्र विशिष्ट दर्प तुमच्यासोबत असेल. म्हणजे संगत जशी असेल तसे तुम्ही विकसित होणार . बाह्य वातावरणाचा, संगतीचा परिणाम आपल्या अंतर्मनावर होत असतो. 


बापूजींनी म्हटले "बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो" वाईट प्रवृत्तीपासून स्वतःचा बचाव करता आला पाहिजे. दूरदर्शनच्या कार्यक्रमासंबंधी पाहिले तरी दोन गोष्टी निश्चितपणे समोर येतात. दिवसभर फिल्मी व रिमिक्स गाणी, उत्तान दृश्ये , बीभत्स नाचगाणी बघितल्यास त्यांचा वाईट परिणाम नक्कीच कोवळ्या मनावर होतो. 


कारण जगात जे जे चांगले आहे, मंगल आहे, पवित्र आहे त्यांचा सुपरिणामही चिरंतन आहे, मंगलकारी आहे. चांगले विचार कानावर पडत असतील तर मनाचा विकास योग्य दिशेने होईल व जीवनाची वाटचाल सुकर होईल..


“पेराल तसे उगवते 

ऐकाल तसे बनवते

पहाल तसे कराल

घ्याल तसे व्हाल...


" कोणाच्या संगतीने काशी अन् कोणाच्या संगतीने फाशी, असंही म्हणतात . कुमारवयात मुलांची संगत कशी आहे. हे फार महत्त्वाचे. या वयात संगतीचा, वातावरणाचा पगडा जसा मनात खोलवर रूततो, त्याचे पडसाद जीवनभर उमटतात. गुणी मुलांची संगत प्रगतीकडे नेते. कुसंगत अधोगतीकडे नेते. 


आजचे समाजाचे चित्र विदारक आहे. युवक हा मदिरा अन् मदिराक्षी, गर्द यांच्या विळख्यात गुरफटला जात आहे. अपराधांची मालिका सुरू होऊन गुन्हेगारीत जीवन कैद होत आहे. 'वाल्याचा वाल्मीकी' झाला हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. वेळीच स्वतःला सावरून वाईट दोषांना लाथाडून चांगल्या सहवासात राहा. 


नीरक्षीरविवेक बाळगा. त्यातून चांगले तेवढेच घ्या. वाईट ते सोडून द्या. "असंगाशी संग, प्राणाशी गाठ!" कुसंगत कधी जीवघेणी ठरेल याचा नेम नाही. कारण 'कोरड्याबरोबर ओले जळते .' एकाच टेबलावर चार तरुण मद्यपान करीत असतील तर त्याच टेबलावर बसून एखादा तरुण त्यांच्याबरोबरच साधे शीतपेय पीत असेल. 


तरी तो मद्यपान करीत आहे असेच जग म्हणेल. तुम्ही कोणाबरोबर उठता बसता, कोणाबरोबर येता-जाता, तसे तुम्ही असणारा हा तुमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन आहे. तो नाकारता येत नाही.


'संस्कार' जीवनाची दिशा ठरवतात आणि हे संस्कार संगतीतून जन्म घेतात . तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याचे अस्तित्व राहत नाही. कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याचा थेंब मोत्यासारखा शोभतो. ज्ञानदेवाच्या सहवासात येऊन 'नाम्या' हा संत नामदेव झाला. सुसंगत सत्कृत्याकडे नेते. परिस लोखंडाचेही सोने करतो. 


फुलांच्या हारामध्ये असणारा साधा दोराही फुलांबरोबर देवाच्या अंगी स्थान प्राप्त करतो. मोक्षप्राप्तीसाठी साधुसंत , सज्जन यांचा सहवास आवश्यक आहे. चांगले विचार मनावर रुजतात, मनःशांती मिळते. जीवनाकडे उदात्त व परोपकारी दृष्टीने बघणे समजते. 


अथांग,शांत , उदात्त निसर्गाची एकांत संगत मनाच्या तारा झंकारून प्रसन्न सूर छेडते तो आंनद वेगळाच! अशी संगत हवी जी आपल्याला भरभरून सुख देईल. क्षणभराचे नाहीत तर जीवनभराचे. कारण संगत खोलवर रुजते. तिचे परिणाम दूरवर जातात .


संग तसा रंग! जगात गुण-दुर्गुण, सज्जन-दुर्जन दोन्ही आहेत . दूरदृष्टिकोन ठेऊन काय निवडावे, स्वतःला कसे सावरावे हे आपल्या हातात आहे. आपला स्वभाव चांगला घडत गेला तरच स्वतः सुखी राहून दुसऱ्यांना सुख देता येईल.


"काचही भासते पाचू सोन्याच्या संगे 

आरसाही झळाळतो सूर्याच्या संगे

चंदनाची माती देहाची सहाने संगे 

पतंगाचे जळणे ज्योतीचिया संगे

माती ही सुगंधमय फुलांच्या संगे 

बोरी-बाभळीही सुवासिक चंदनाच्या संगे!"

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद   पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद




निबंध 2
 सुसंगती सदा घडो मराठी निबंध | Susangati Sada Ghado Marathi Nibandh



'संसारकटुवृक्षस्य द्वे फले ह्यामृतोपमे ।

 सुभाषित रसास्वादः संगति : सुजनैः सह ।'


संसाररूपी कटू वृक्षाची दोन फळे मात्र अमृतासारखी मधुर आहेत. सुभाषितरसास्वाद आणि सत्संगती. सदैव ताजी राहणारी ही फळं कोणालाही रुचतील, पचतील, परवडतील अशी आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र, सर्व ऋतूंमध्ये ती प्राप्त होऊ शकतात. मग त्यांचा आस्वाद घेण्यात सुस्ती कशाला करायची ?


सुसंगतीचा महिमा सर्वच संतांनी, सुभाषितकारांनी गायका आहे. 'सदा संगती सज्जनांची करावी' 'न लगे मुक्ती, धनसंपदा, संतसंग देई सदा' 'सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम?' महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः?' इत्यादी कितीतरी उदाहरणे देता येतील.


गंगेच्या पाण्याने सर्व पापांचे क्षालन होते अशी आमची श्रद्धा आहे. सज्जनांच्या सहवासात मनाचा मळ दूर होतो. दुष्ट वासना, द्वेष, वाईट विचार यांचा नाश होतो. पुष्पसंगे मातीस वास लागावा तसे त्यांचे सद्गुण आपल्या अंगी बाणतात, दुर्गुणांची जाणीव होते. 


परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते म्हणतात संतांच्या सज्जनांच्या सहवासात ईश्वरप्राप्ती होऊन जीवनाचे सोने होते. तापलेल्या तव्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाची नावनिशाणीही उरत नाही. कमळाच्या पानावर पडलेल्या जलबिंदूला मोत्याचे सौंदर्य प्राप्त होते पण स्वाती नक्षत्राचे पाणी सागरातील शिंपल्यात पडले तर त्याचा मोती होतो.



उत्तम, मध्यम, अधम गुण संसर्गामुळे प्राप्त होतात याचेच हे द्योतक नाही का? 'संग जया जैसा, लाभ तया तैसा
फुलाच्या सहवासात राहिल्याने शूद्र कीटकाला देवाच्या कंठी रुळण्याचा, मस्तकावर विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त होतो. 


सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाला मारण्याचे धाडस कोणी करत नाही. सज्जनांच्या सहवासात दुर्जनांचाही फायदा होतो असंच म्हणावं लागेल. रामायणाची रचना करणारे वाल्मिकी आधी दरोडेखोर होते अशी कल्पना कोणाला येऊ शकत नाही. नारदमुनींच्या सहवासात ‘वाल्या'चा ‘वाल्मिकी' झाला. 


'मरा, मरा' म्हणता म्हणता 'राम राम' जपू लागला. गौतम बुद्धांच्या दर्शनाने 'अंगुलीमाल'च्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. लोकांना लुटणे सोडून सन्मार्गाने जीवन जगण्याचा आनंद तो लुटू लागला. संत नामदेवांच्या घरी राहून धुणं, भांडी, दळणकांडण करणारी जनाबाईसारखी सामन्य स्त्री, संतपदवीला पोहोचली. ईश्वरभक्तीचा झरा तिच्या हृदयात झुळझुळ वाहू लागला.



'असंगाशी संग, प्राणाशी गाठ' दुर्जनांच्या संगतीत राहिल्याने नुसते नुकसान होत नाही तर प्रसंगी प्राणही गमवावे लागतात. दुष्ट कावळ्याशी मैत्री केल्यामुळे निरपराध हंसाला प्राणाला मुकावे लागले. दुर्योधनाचा पक्ष घेऊन 'मृत्युंजय' कर्णाने मृत्युलाच आवाहन केले. 


मंथरेच्या कपटीपणामुळे कैकयीच्या मनात असूया निर्माण झाली. तिने रामाला दूर केले आणि तिच्या जीवनातील रामच निघून गेला. संभाजी राजे वाईट संगतीमुळे दुर्वर्तनी बनले. शाहीर अनंत फंदी म्हणतात, 'बरी खुशामत शहाण्याचीही, मूर्खाशी ती मैत्री नको' ढेकणाच्या स्पर्शाने हिरा भंगतो. 


एकाच सडक्या आंब्यांमुळे करंडीतील सर्व आंबे सडतात हे काय सांगायला हवे? विषारी वृक्षाचा आश्रय घेतलेली वेलही विषारीच होणार. दारु विकणाऱ्या स्त्रीच्या हातात पाणी असलं तरी लोक त्याला 'दारु' म्हणूनच संबोधतात.



ऋषिमुनींच्या आश्रमात गो -व्याघ्र, अज-वृक, श्वान-माजीर सर्व प्राणी परस्परवैरभाव विसरून गुण्यागोविंदाने नांदू शकतात याचे कारण ‘सज्जनांचा सहवास' हेच होय. आपले माता, पिता, गुरुजन आपल्याला 'चांगल्या संगतीत राहा' असं वारंवार सांगत असतात. 



त्यांच्या सांगण्याकडे काणाडोळा करून चालणार नाही. कारण, सत्संगती म्हणजे दुधात साखर तर कुसंगती म्हणजे दुधात मीठाचा खडा! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3

सुसंगती सदा घडो मराठी निबंध | Susangati Sada Ghado Marathi Nibandh


कवी मोरोपंत हे पेशवाईच्या काळातले एक श्रेष्ठ पंडित कवी. बाबूजी नाईक बारामतीकर यांच्याकडे ते आश्रयाला होते, तेथे ते पुराणे सांगत. प्रवचने व कथा करीत. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी 'केकावली' नावाचे एक सर्वांगसुंदर काव्य 'पृथ्वी' वृत्तांत रचले, वृद्धापकाळात परमेश्वराने आपली जीवन नौका भवसागर पार करून न्यावी अशी विनंती त्यांनी त्या काव्यात केली आहे. 


त्या 'केकावली' मधल्या एका प्रसिद्ध 'केका' (मोराच्या आवाजातील पद) ची सुरुवात ‘सुसंगति सदा घडो' या शब्दांनी केलेली आहे. माणूस कशाने घडतो ? कसा कसा घडतो ? त्याच्या पूर्वसंचितानुसार घडतो, अनुवांशिक गुणांवर तयार होतो की सहवास संगतीने बनतो ?


अनेक अनुभवांनी हे सिद्ध झाले आहे की माणूस सहवासाने-सुसंगतीनेच घडतो व कुसंगतीने बिघडतो. अंगभूत गुणाचेही सुसंगतीने सोने होते, पण कुसंगतीने त्याची माती हाते. भर्तृहरीने प्रसिद्ध नीतिशतकातल्या एका काव्यात म्हटले आहे की पाण्याचा एक थेंब तापलेल्या लोखंडावर पडला तर त्याचे नाव उरत नाही. 


तोच कमळाच्या पाकळीवर पडला तर मोत्याप्रमाणे चमकतो, आणि तोच स्वाती नक्षत्रात समुद्राच्या पोटात असणाऱ्या शिंपल्यात पडला तर त्याचे खरेखुरे मोती बनते. म्हणजेच उत्तम, मध्यम किंवा अधम अशी अवस्था केवळ संपर्कामुळेच प्राप्त होते. खरे ना?


संताजीला धनाजी भेटला आणि मराठी राज्याचा कोसळता डोलारा सांभाळला गेला. होनाजीला बाळा बाहिरू भेटला नसता तर तो मोठा शाहीर कसा झाला असता ? एवढेच कशाला, पेंद्यासारख्या पांगळ्याला कृष्णाचा सहवास लाभला व तो अमर झाला.


 ATURY ज्या लोकांच्या सहवासात वावरतो त्यावरून त्याची लायकी समजते. तो जर गुंड व मवाली लोकांच्यात वावरत असला तर तो स्वतः गुंडच बनणार. या उलट जर तो गुणी, विनयशील आणि मेहनती व प्रामाणिक माणसांच्या सहवासात वावरला तर तोही तसाच गुणी व विनयशील बनेल. 


सत्संगाचा महिमाच असा थोर आहे. वाल्या कोळ्याला थोडा काळ का होईना पण नारदासारख्या ईश्वरभक्ताचा सहवास लाभला व वाल्याचा वाल्मिकी झाला. नराचा नारायण होतो तो त्याच्या करणीमुळे. नर करणी करे तो नरका नारायण बन जाय । 


पण ती करणी चांगली होते ती संतसमागमामुळे. सुसंगतीचे महत्त्व आहे ते यामुळेच. त्यामुळे गुणीजनांचे गुण रत्नकोंदणाप्रमाणे खुलतातच पण निर्गुणीसुद्धा गुणवंत बनतात. म्हणतात ना 'पुष्प संगे मातीस वास येई !" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद