विज्ञानाची प्रगती मराठी निबंध | Vidnyanachi Pragati Marathi Nibandh

 विज्ञानाची प्रगती मराठी निबंध | Vidnyanachi Pragati Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञानाची प्रगती मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण विज्ञानाची प्रगती शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  आजचे युग विज्ञानयुग मानले जाते. विविध शोध लागत आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाने एक प्रकारची क्रांती केलेली आहे. विज्ञानाची घोडदौड सुरूच आहे.


विजेचा शोध हा सगळ्यात महत्त्वपूर्ण शोध आहे. हा शोध म्हणजे विज्ञानाची मोठी देणगी आहे. आज स्वयंपाकघरातील उपकरणांपासून ते मोठमोठ्या कारखान्यांतील सर्व यंत्रे विजेच्या साहाय्याने चालतात. 


विजेचा शोध म्हणजे आजच्या युगातील कल्पवृक्षच बनला आहे. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपल्यावरसुद्धा विद्युत्-सेवा चालूच असते.दळणवळणाची साधने शोधून काढून विज्ञानाने जग एकदम छोटे बनवून टाकले. रेल्वे, मोटार, हवाई जहाज, जलयान या साधनांच्या योगे आज आपण शेकडो मैलांची यात्रा बघता-बघता पूर्ण करू शकतो. 


जगातील कोठेही घडलेली कोणतीही घटना वैज्ञानिक शोधांमुळे काही सेकंदांमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते. संदेशवहनासंबंधीची प्रभावी प्रचार-प्रसारमाध्यमे खरोखरीच आश्चर्यकारक आहेत. तारेच्या साहाय्याने, टेलिफोन, टेलिफॅक्स, वायरलेस यांच्या माध्यमातून कोणत्याही कोपऱ्यातील देशात आपण समाचार पाठवू शकतो. 


भ्रमणध्वनीमुळे आज जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या व्यक्तीशी आपण बोलू शकतो.मनोरंजनाचे क्षेत्र घ्या. याही क्षेत्रातील विज्ञानाची घोडदौड सुरूच आहे. रेडिओपासून दूरदर्शन संचापर्यंत अनेक साधने बाजारात मानवाच्या करमणुकीसाठी हजर आहेत. 


सिनेमा हीदेखील विज्ञानाची अद्भुत देणगी आहे. संगणक म्हणजे आज बहुउपयोगी बनला आहे. आज संगणकाशिवाय आमचे पानही हलत नाही. स्मृतींचा खजिना असल्याने संगणक सामान्य व्यक्तींच्या जीवनात वरदान ठरला आहे. 


आज संगणक घरा-घरांत पोहोचला आहे.वैद्यकीय क्षेत्रातही संगणक उपयुक्त ठरत आहे. सोनोग्राफी, एक्स-रे यांच्या साहाय्याने शरीरातील अंतर्भागाची तपासणी शक्य झाली आहे. विज्ञानामुळे अनेक असाध्य रोगांवर मात करता येऊ लागली आहे. 


विज्ञानाने मानवी जीवनात क्रांती घडविली आहे. कृषिक्षेत्रातही नवे-नवे प्रयोग होत आहेत. नांगर, ट्रॅक्टर, कटाई यंत्र, धान्य कणसांतून काढून पोती भरणे, हे सर्व यंत्रांच्या साहाय्याने घडते. 'घंटों का काम मिनिटों में ही किमया घडविणारे विज्ञान वेगाने घोडदौड करीत आहे. रोज नवे यंत्र तयार होत आहे. 


धरतीची उत्पादनक्षमता वाढवून हरितक्रांती साधली आहे. ज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी अत्याधुनिक छपाई यंत्रे निर्माण झाली आहेत. वृत्तपत्रांच्या लाखो प्रती काही तासांतच छापून वितरणासाठी सज्ज होतात. _विज्ञानाने भूमीप्रमाणेच सागर व अवकाश यांवरही विजय मिळविला आहे. 


तो चंद्रावर पाऊल ठेवून गप्प बसलेला नाही; तर अन्य ग्रहांवरही पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. एकेकाळी वांझ असलेल्या जमिनीवर आज फुलबागा फुलत आहेत. क्लोनच्या प्रयोगातून मनुष्य विश्वनिर्मितीलाच आव्हान देत आहे. विज्ञानाने मानवी सुखासाठी केलेली घोडदौड प्रगतीसाठी नक्कीच लाभदायक आहे.


पण त्याचबरोबर मानवाने संहारक अस्त्रेदेखील बनविली आहेत. परमाणु-बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, तर बनवले आहेतच;मनुष्यमात्राला नामशेष करणारा विषारी गॅसही शोधून काढला आहे. त्यामुळे आमची संस्कृती, मानवजात, आमची सभ्यता यांना वाढता धोका निर्माण झाला आहे.


विज्ञानाची घोडदौड वरदान जशी आहे, तशीच ती मानवजातीसाठी शाप-देखील ठरू शकते. तेव्हा प्रश्न असा आहे की, विज्ञानाचा म्हणजेच परमाणू शक्तीचा उपयोग मनुष्याच्या हितासाठी करायचा की विनाशासाठी? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

 विज्ञानाची प्रगती मराठी निबंध | Vidnyanachi Pragati Marathi Nibandh


शाळेला सुट्टी असताना मी मावशीकडे गेलो होतो. तिची मुलगी तन्वी शाळेत गेली होती. ती आल्यावर तिने मला क्षणार्धात 'ई-मेल' करून दाखवल्यावर, तर मी आश्चर्याने अवाक् झालो. जग किती जवळ-जवळ येतंय... या जाणिवेने मी थक्क झालो. खरंच संगणक, इंटरनेट सेवा, वेबसाइट, ई-मेल ही सर्व विज्ञानाची अपत्ये आश्चर्यकारकच नव्हेत काय? 


हजारो मैलांवरच्या एखाद्या व्यक्तीला हवं तेव्हा हवा तो निरोप आपण काही क्षणात देतो, ही किमया केवळ विज्ञानाचीच! इंटरनेटने पृथ्वीची सागरगोटीच केली. अहो, किराणामाल, खेळणी, घरगुती वापराच्या वस्तू, रेशन, कपडे या सगळ्यांची यादी करत न बसता घरबसल्या संगणक ती आपल्याला पोहोचती करू शकतो. काही प्रगत देशात तर यंत्रमानवच असतात.


खरंच, विज्ञानाच्या जादूच्या कांडीने सारे जग एक जादूनगरी झाली. कवींच्या काव्याचा विषय असलेला चंद्र आज शास्त्रज्ञांच्या गमनाचा व विश्लेषणाचा विषय बनला आहे. विज्ञानाच्या दुडक्या चालीने गृहिणी सुखावली. फूड प्रोसेसर, मायक्रोवेव्ह, ओव्हन, कूकर यांनी वेळ वाचवला. 


शेगड्या, चुली जाऊन बायोगॅसने धुराचे त्रास वाचविले. धुणे धोपटून धुण्याचे श्रम वॉशिंग मशीनने वाचवले. फ्रीजने तर अन्नाची नासाडी वाचवली, पुनर्वयंपाकाचे श्रमही! पूर्वी रेडिओचा शोध लागला, तर म्हणे...लोक एकत्र येऊन ऐकायचे, आता टी.व्ही.वर १०० चॅनल्स दिसतात, म्हणजे २४ तास मनोरंजन! 


चालू क्षणाला जगातील घडामोडी, राजकीय, भौगोलिक, सामाजिक स्थित्यंतरे, हवामान, वातावरणाचे अनुमान, केवळ अंदाजच नाहीत तर उपग्रहामार्फत घेतलेले छायाचित्रच आपल्यापर्यंत टी.व्ही.द्वारे पोहोचते. आपला देश तर कृषिप्रधान देश! या अंदाजांनसार पावसाची पडती भावना लक्षात घेऊन शेतकरी कामाला लागतात. 


त्यातच भर म्हणून नवनवीन संकरित बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके, अत्याधुनिक अवजारे, तंत्रज्ञान यांचा शोध लागला. हरितक्रांतीमुळे देश नुसताच स्वयंपूर्ण बनला नाही, तर तो अन्नधान्याची निर्यातही करू लागला. १०० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या संकरित गायींची पैदास करून शेतीचा जोड धंदा जोरात चालू लागला.


पूर्वी देवी, घटसर्प, प्लेग असे भयानक साथीचे रोग अस्तित्वात होते, विज्ञानाच्या मदतीने त्यांच्या निर्मूलनात मानवाला यश मिळाले. क्षय, टायफॉईड, कावीळ. पोलिओ हे रोग लसीकरणाने आटोक्यात आणता आले. ब्लडप्रेशर, हृद्रोग अशा काही रोगांवर शस्त्रक्रियेद्वारे जय मिळवला. हृदयाच्या शिरांवर रोपण करून हृदय जणू नवीनच करणारे डॉक्टर रोग्यांना देवदूतच वाटू लागले. 


प्लॅस्टिक सर्जरी' ने कुरुपालाही सुंदर करता आले. 'जन्म' ही बाब दैवी मानली जाते, परंतु ती ही वैज्ञानिकांच्या शोधामुळे मानवाच्या हाती आली आहे. 'टेस्ट ट्यूब बेबी' हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण!  नवनवीन औषधांच्या शोधामुळे, वैद्यकीय क्षेत्रातील आमूलाग्र प्रगतीमुळे मानवाचं आयुर्मान वाढलं, मृत्युप्रमाण घटलं व त्यातूनच 'लोकसंख्यावाढीच्या भस्मासुराचा' जन्म झाला. 


अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा सर्वांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे कठीण झाले. दैनंदिन जीवनात यंत्रांचा वापर वाढल्याने मनुष्यबळाची मागणी कमी होऊन बेकारी निर्माण झाली, त्यातूनच गुन्हेगारी बळावली. मुले सतत टी.व्ही. समोर व संगणकापुढे बसू लागल्याने वाचन, मैदानी, खेळ, व्यायाम यांना सुट्टीच मिळाली. ती जणू विसरूनच गेली


'All work and no play, makes Jack a dull boy'


रासायनिक खतांच्या फसव्या व तात्पुरत्या शक्तीवर पोसलेल्या निकृष्ट अन्नधान्य व भाजीपाल्यामुळे रोगप्रतिबंध व प्रतिकारशक्ती हीन झाली. असंख्य उद्योगधंद्याच्या वाढीमुळे प्रदूषणाच्या समस्या भेडसावू लागल्या. बऱ्याचशा वस्तू विजेवर चालल्याने अंगमेहनतीचे काम राहिले नाही, त्यामुळे स्थूलपणा वाढला; मानसिक स्वास्थ्य गमावले.


ई-मेल, फॅक्स, मोबाईल, फोन यांमुळे सगेसोयरे एकमेकांना वर्षानुवर्षे पत्रे पाठवेनासे झाले. त्यांचे संबंध 'हॅलो', 'हाय', 'बाय' या पाश्चात्त्य संस्कृतीत विलीन झाले. त्यामुळे भारतीय संस्कृती लोप पावते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. भावनिक गुंतागुंत नष्ट होऊन लोक व्यवहारी बनले, मानवी जीवनात 


तांत्रिकता येऊ लागली. विज्ञानाला आता वेध लागलेत ते परग्रहावर वसाहत उभारण्याचे! भूतलावरील मर्यादित साधनसंपत्ती व ऊर्जा साठे ही एक समस्या ठरणार आहे. प्रिमियम थ्री फ्यएल. चंद्रावरील हायडोजनचे साठे ही भविष्यातील ऊर्जाशक्ती बनणार आहे. 


ती प्राप्त करण्यासाठी चंद्रावरील खाणकामाचे जगाला वेध लागलेत. नॅनोटेक्नॉलॉजी ही यापुढील क्रांती ठरणार आहे. शरीरात बसविण्यात आलेल्या ई-चिपच्या मदतीने पार्किसन्ससारख्या विकारावर प्रो. वरदन ह्या भारतीय शास्त्रज्ञाने तोडगा शोधला आहे.


विज्ञानाने चढता आलेख तर मानवाला दाखवला, अण्वस्त्र, क्षेपणास्त्र, अद्ययावत बॉम्बर विमाने, पाणबुड्या,अजस्र जहाजे, रणगाडे, बंदुका...बरेच काही! ह्या आलेखाचा सर्वोच्च बिंदू सर्वनाशाचा प्रलय बिंदू येऊन ठेपलाय की काय... नि मग... उतरती भाजणी सुरू होऊन... परत... मानवाची उत्क्रांती अश्मयुग, धातुयुग, चक्रयुग या फेऱ्यातच मानव पुन: अडकेल?


ईर्ष्या जिगिषांच्या तिरडीवर माझी मानवता न मरावी ठरो न हे विज्ञान कावळा माझी पृथ्वी पिंड न व्हावी ही मनाला ग्रासणारी भीती कधीही खरी न व्हावी एवढेच! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद