भाव तोंचि देव मराठी निबंध | Bhav Tochi Dev Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भाव तोंचि देव मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण भाव तोंचि देव असलेले दोन निबंध बघणार आहोत
न देवो विद्यते काष्ठे।
न पाषाणे, न मृण्मये।
भावे हि विद्यते देवः।
तस्माद् भावो हि कारणम्॥
देव लाकडात. दगडात किंवा मातीत नसतो. देव हा भक्तिभावातच असतो. श्रीरामचंद्रांनी शबरी भिल्लिणीचा भोळा भक्तिभाव जाणला व तिने दिलेली उष्टी बोरे आनंदाने खाल्ली. परंतु मध्ययुगीन काळात कर्मकांडाचे महत्त्व वाढले. खरा भक्तिभाव लोक विसरले. संत ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्ग सांगितला.
परमार्थात जात महत्त्वाची नसते तर भक्ती महत्त्वाची असते. ईश्वराविषयी भक्तिभाव असणे महत्त्वाचे आहे हे त्यांनी दृष्टांतांनी पटवून दिले.
भगवद्गीतेत श्रीकृष्णांनीमां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परागतिम्॥
असे अर्जुनाला सांगितले. ज्यांच्या तोंडात- मुखात माझेच नाव आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पाहतात, ज्यांचे मन सतत माझ्याविषयीच विचार करते, माझे गुण ऐकण्यावाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, माझी सेवा हेच सर्व अवयवांचे भूषण असते,
ज्यांची ज्ञानवृत्ती फक्त परमेश्वरालाच जाणते, भगवंताची सेवा करायला मिळाली तरच जीवनाचे सार्थक वाटते नाहीतर जगणे मरणप्राय वाटते, असा भक्त कोणत्याही जातीचा असला तरी श्रेष्ठच.
पाहे पां भक्तिचेनि आथिलेपणे।
दैत्ये देवां आणिले उणे।
माझे नृसिंहत्व लेणे।
जेयचिये महिमे।
ज्ञानेश्वर म्हणतात की, भक्तीच्या संपन्नतेमुळे राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. भक्त प्रल्हादाच्या मोठेपणासाठी प्रत्यक्ष भगवंताला नृसिंह अवतार घ्यावा लागला. तो प्रल्हाद दैत्य कुळातला होता. त्याप्रमाणे दुष्ट जातीत जन्माला आलेले,
श्रुताधीत नसले तरी परमेश्वराला प्रिय असतात. कारण भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा असतो. ज्याप्रमाणे राजाज्ञेची अक्षरे असलेले कातडे श्रेष्ठ ठरते त्याप्रमाणे ज्याचे मन व बुद्धी परमेश्वराच्या प्रेमाने भरलेली आहे, तो भक्त श्रेष्ठ ठरतो. कस्तुरी बाहेरून दिसायला सुंदर नसते किंवा चंदनाचे झाड मनोहर नसते,
परीस ओबड-धोबड असतो किंवा तलवारही मौल्यवान धातूची बनलेली नसते पण त्यांचे गुण मौल्यवान असतात. त्यामुळे त्यांना किंमत प्राप्त होते. भक्तांना भक्तीमुळेच श्रेष्ठत्व प्राप्त होते. महाराष्ट्रातील संतांच्या ठिकाणी असाच भक्तिभाव दिसून येतो.
महाराष्ट्रात प्रत्येक जातीत संत निर्माण झाले. चोखामेळा 'महार' असून किंवा सावतामाळी 'माळी' असून, किंवा गोरा कुंभार 'कुंभार' असूनही भक्तीच्या क्षेत्रात ज्ञानेश्वरएकनाथांसारखेच श्रेष्ठ होते. सावतामाळी म्हणतातकांदामुळा भाजी, अवघी विठाबाई माझी: कारण जसा भाव तसा देव ! भाव तोच देव ! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद