एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध | eka krantikarkache manogat marathi essay.

 एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध | eka krantikarkache manogat marathi essay.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  एका क्रांतिकारकाचे मनोगत शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  आज आपण  एका क्रांतिकारकाचे मनोगत  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  नवरात्राचे दिवस होते. रात्रीच्या वेळी एक रिक्शा दाराशी थांबली. रिक्शातून एक गृहस्थ घरात आले. म्हणाले, 'मी, मोहन रानडे.' ते नाव ऐकताच मी तीनताड उडालेच. 


त्यांच्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी त्यांना आडिवरे' येथे जायचे होते. रात्री त्यांना आमच्याच घरी पत्नीसह आग्रहाने ठेवून घेतले. त्यांची जीवनकथा त्यांच्याच तोंडून ऐकली. स्वदेश-प्रेमाची शिकवण मला बालपणीच मिळाली होती. माझे वडील राष्ट्रीय शाळेत शिक्षक व स्वदेशीचे जाज्वल्य पुरस्कर्ते होते. 


स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा हे माझे 'मानस-गुरु' होते पारतंत्र्याच्या काळात मी व माझे सतंगडी कृष्णेच्या वाळवंटात जोषानं पारतंत्र्य नष्ट करण्याचे पोवाडे म्हणत असू. पोवाडे ऐकत बसलेले एक गृहस्थ म्हणाले, 'मुलांनो, तुम्ही पोवाडे चांगले म्हणता, पण पुढे तुम्हाला फक्त शाहीर व्हायचे आहे का शाहीराला विषय व्हायचे आहे?'शाहीर' की शाहिराला विषय'? 'शाहिराला विषय' व्हायचं मी पक्क केलं.


"भारत स्वतंत्र झाला तरी दीव, दमण, गोवा येथील पोर्तुगीज साम्राज्य कायम होते. या वसाहतींचे भारतात विलिनीकरण घडवून आणण्यासाठी आझाद गोमंतक दलात सामील झालो. प्रथम दादरा-नगरहवेली मुक्त केली. मग इतरत्र हल्ल्यांना सुरुवात केली. अस्नोडे ते हळदोणे एका पाठोपाठ एक हल्ले चढवत गेलो. 


खाणींवर हल्ले केले. बेतीच्या चौकीवर हल्ला करण्याची माझ्या सहकाऱ्यांसह योजना आखली. बेतीच्या चौकीवर सहकाऱ्यांसह येऊन प्रथम ओसरीवर बसलेल्या पाच शिपायांना झोपवले. हेड कांस्टेबलला लाथेनं खाली पाडून चौकीच्या आत प्रवेश केला, पण एवढ्यात मगाशी माझी लाथ खाल्लेच्या हेड कॉन्स्टेबलने माझ्यावर बंदुक रोखली.


 तो दाराआडून माझ्यावर आणि मी व माझे सहकारी त्याच्यावर व इतरांवर गोळ्या झाडत होतो. शेवटी शस्त्रे हातात पडली. आमचा 'बेती'चा बेत यशस्वी झाला. पण हातातून व पोटातून रक्ताची धार वाहात होती. थोड्याच वेळात मी कोसळलो परंतु मला न वाचवता आपले ध्येय गाठण्यास मी त्यांना भाग पाडले.


नंतर शुद्ध आली तेव्हा मी पणजीच्या रुग्णालयात होतो. माझ्या पोटावर शस्त्रक्रिया झाली होती. मी जखमी होऊन खाली कोसळलो होतो तरीही डाव्या खांद्यात पोलिसांनी त्यांचे शस्त्र खुपसण्याचं निघृण कृत्य केलं होतं! पुढे खटला उभा राहिला. मला २६ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 


एके दिवशी मला पोर्तुगालमधील लिस्बन येथे नेले गेले. कारावास भोगण्यासाठी त्यातील ६ वर्षे एकांतवास भोगावा लागला. तुरुंगातील अनन्वित छळाचे किंवा शरीरावरील जखमांचे दुःख वाटले नाही. परंतु गोव्याची भूमी स्वतंत्र झाली तरी आम्ही पारतंत्र्यात होतो. गोवा स्वतंत्र झाला तरी माझी सुटका व्हावी म्हणून भारत सरकारने प्रयत्न केले नाहीत. या प्रसंगांची आठवण बेचैन करते.


माझ्या सुटकेसाठी श्री. सुधीर फडके, मेक्सिकन वकिलातीतील अधिकारी वर्ग, आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटना, असंख्य पोर्तुगीज बंधुभगिनींना प्रयत्न केले. माझी आई व मावशी यांच्या प्रयत्नांना तुलनाच नाही. आपला देश स्वतंत्र झाला असतानाही' आणखी कोणा भारतीयावर 'विजनवास' कंठण्याची पाळी येऊ नये. 


म्हणून मी सतीचे वाण' व 'Struggle Unfinished' अशी दोन पुस्तकेही लिहिली आहेत. आडिवऱ्याची महाकाली हे आमचं कलदैवत. माझी सुटका होण्यासाठी माझ्या भोळ्याभाबड्या आईने नवस बोलला होता. मी ते गाव किंवा देवी बघितली नाही. परंतु आमच्या सौभाग्यवतींच्या आग्रहामुळे आज आडिवऱ्याला निघालो आहे. पण रात्री पुढे जायला गाडी नसल्याने तुम्हाला त्रास द्यावा लागला!"


एवढे बोलून ते थांबले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर फक्त ह्यांनाच स्वातंत्र्यवीर' ही पदवी दिली गेली, हेही त्यांच्या पत्नीकडून समजले. शूर, धाडसी, निगर्वी, निर्लोभी, शांत, सुस्वभावी, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला एक क्रांतिकारक माझ्या घरी आला, म्हणून मी स्वत:ला धन्य' समजले. (सत्य घटना) मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 2

एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध | eka krantikarkache manogat marathi essay.

पनवेलजवळील 'शिरढोण' गावी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक पाहण्यासाठी शाळेतल्या मुलांची सहल आली होती. स्मारकाला वंदन करून स्मारकाजवळ मुलांना बसवून शिक्षक स्मारकासंबंधी व वासुदेव बळवंतासंबंधी माहिती सांगत होते. 


तितक्यात स्मारकाच्या खोलीतून एक वयोवृद्ध गृहस्थ पुढे आले. त्यांच्या हातात काठी नव्हती. ते पाठीत फार वाकलेही नव्हते, पण त्यांचे कापसासारखे पिकलेले केस व चेहऱ्यावरच्या असंख्य सुरकुत्या त्यांचे वय सांगत होत्या. ते बोलू लागले.


"माझे नाव भाऊसाहेब पाटणकर. बाळांनो, तुमच्यापैकी एका मुलाचा प्रश्न मी ऐकला आणि मला तुमच्या पुढे यावेसे वाटले. तुम्हांला क्रांतिकारक पाहायचा होता ना ! वासुदेव बळवंताच्या एवढा मोठा किंवा भगतसिंग, सुखदेवाच्या इतका श्रेष्ठ मी नाही, पण मला अभिमान आहे की मी त्यांच्याच वंशातला आहे."


"त्यांच्याच वंशातला ?" आमच्यातला प्रदीप भिडे नावाचा मुलगा म्हणाला, “या साऱ्यांचे वंश एकच कसे असतील ?'“एकच बाळा !” भाऊसाहेब पुढे बोलू लागले. मुलांनो लक्षात ठेवा, खऱ्या क्रांतिकारकाला जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो. वासुदेव बळवंतपासून मदनलाल धिंग्रांपर्यंत सर्वाची जात एकच. ज्वलज्ज्हाल क्रांतिकारकाची.


वासुदेव बळवंताच्या आधी इ.स. १८५७ मध्ये भारतात मोठे स्वातंत्र्यसमर झाले ते तुम्ही वाचले असेल. त्याचप्रमाणे वासुदेव बळवंतांच्या नंतर मोठे क्रांतिकारक निर्माण झाले ते स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेमुळे. 


मी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो. आपल्या स्वतःच्या सुखाची, शिक्षणाची, मानमरातबाची, आम्हांला कधीच पर्वा नव्हती. त्याचप्रमाणे आमच्या घरादाराची किंवा आमच्या कुटुंबकल्याणाची काळजी आम्ही कधीच केली नाही. पत्नीचे प्रेम किंवा दोस्तांची दोस्ती यांचा मोह आम्हाला कधी पडला नाही.


सेनापती बापटांबरोबर मी प्रथम सशस्त्र क्रांतीत भाग घेतला. त्याचप्रमाणे गुप्त मार्गाने निरनिराळ्या पुढाऱ्यांना शस्त्रे पोचविण्याचे काम केले. बापटांच्या मार्गदर्शनानुसार पुढे १९४२ साली 'चले जाव' चळवळीत मी भाग घेतला आणि मला तुरुंगातच जावे लागले. 


त्यावेळी मी येरवडा जेलमध्ये होतो. माझ्याबरोबर अनेक मोठमोठे पुढारी त्या तुरुंगात होते. त्यावेळी तुरुंगातच आम्ही गुप्त पत्रके काढायचो. बाहेरच्या बातम्या मिळवून तुरुंगातल्या पुढाऱ्यांना सांगायच्या व तुरुंगातल्या हालचाली जेवण घेऊन येणाऱ्या माणसाबरोबर गुप्त रीतीने बाहेर कळवायच्या हे माझे काम होते.


या कार्यात मी घरदार, शेतीवाडी, शिक्षण व चांगली नोकरी यावर पाणी सोडले. हे सारे अर्थातच आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ! पण माझ्याखेरीज इतर काही जण तुरुंगातच हाल होऊन मरण पावले. त्यांनी आत्मबलिदान केले.


खंत एवढीच वाटते की आम्ही त्या काळी जो त्याग केला त्यामुळे हे भारतीय स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव फारच थोड्यांना आहे. सध्याच्या पुढाऱ्यांना सत्यापेक्षा सत्ता मोठी वाटते. - त्यागाचे नाव नाही. उलट हे पुढारी लाचलुचपत, भ्रष्टाचार, काळा पैसा आणि चोरटा व्यापार व्यवहार यात आकंठ रुतलेले आहेत. 


सुमारे १२५ वर्षे झगडून, असंख्य क्रांतिवीरांच्या बलिदानांतून स्वातंत्र्य मिळालेला हा देश आता जागतिक बँकेकडे गहाण पडणार की काय अशी भीती वाटतेय. बाळांनो, तुम्ही लहान व निष्पाप आहात. तुम्ही तरी आपल्या देशाला या संभावित व संधिसाधू तस्करांच्या हातून सोडवा. आपल्या देशाची शान सांभाळा. भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा राखा.


थोडा वेळ का होईना, पण माझं हृदय तुमच्या जवळ उघडं करण्याची संधी तुम्ही मला दिलीत याबद्दल धन्यवाद." असे म्हणून भाऊसाहेब पाटणकर जरासुद्धा न थांबता स्मारकाबाहेर पडून रस्त्याला लागले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 3

एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध | eka krantikarkache manogat marathi essay.




दिवाळीची सुट्टी लागली. सुट्टीत बोटीचा रोमांचकारी प्रवास संपवून आम्ही पोर्टब्लेअरला उतरलो. बंदराला पाय लागल्यापासूनच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या थोर क्रांतिकारकाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला, हाच तो समुद्र, हाच किनारा, ह्याच लाटा, हीच वाळू! 


ज्या अंधारकोठडीत सावरकरांना ठेवले होते, ती बरॅक लगेचच आम्ही पाहायला गेलो. बरॅकमध्ये स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राबरोबर माझ्या आजीच्या काकांचाही फोटो पाहून ऊर अभिमानानं भरून आला. तेही सावरकरांबरोबर जन्मठेपेचे कैदी होते. अनिमिष नेत्रांनी मी ती पवित्र वास्तू पाहात होतो. पाहता पाहता जणू तेजाचे ते एक मंदिर भासू लागले.


इतक्यात... त्या तेजोमहालात एक अनोळखी आवाज घुमला, "बाळ," खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द स्वा. सावरकर होते. "मला आठवतात रे दोस्ता, ते झपाटलेले दिवस. मी नुकता बॅरिस्टर झालो होतो. कोरा करकरीत काळा कोट रुबाबात ल्यालेला एक राजबिंडा तरुण! 


नाशिकमधलं माझं छोटंसं गाव- भगूर. मी भगूरचा 'मारिता मारिता, मरेतो झुंजेन' अशी शपथ मी दुर्गेसमोर घेतली..... तेथेच. आणि कार्याला लागलो. आधी लेखणी हाती घेतली. वृत्तपत्रांतून लिहू लागलो. ब्रिटिशांना कडवा प्रतिकार केला, पण गोरे लोक बधत नव्हते. त्यांचे अत्याचार उघड उघड वाढत होते. 


त्यात देवी, प्लेगसारख्या रोगांनी हलकल्लोळ माजवला होता. प्रजा हतबद्ध झाली होती. अनन्वित छळाने ग्रासली होती. अहिंसा, असहकार ही हत्यारे बोथट झाली होती. 'एक घाव दोन तुकडे' ह्याच न्यायाची गरज ह्या परिस्थितीला होती. जोसेफ मॅझिनी, चाफेकर बंधूंचा आदर्श समोर होता. मग आम्ही सशस्त्र क्रांतीचा उठाव करण्याचे शिंग फुकले.


विलायतेत असताना तिकडून पुस्तकांमधून लपून छपून पिस्तुले, हत्यारे भारतात पाठवली. एक एक ब्रिटीश अधिकारी संपू लागला होता. देशात रण माजले. घर-दार-संसारांची राखरांगोळी होत होती. माझ्याबरोबर बाबारावही लपून छपून काम करीत होते. एक दिवस दोघेही पकडले गेलो! न्यायनिवाडा. झाला. 



कानांवर शिक्षेचे शब्द लाव्हाच्या तप्त रसांसारखे ओतले गेले 'जन्मठेप'! काळेपाणी! म्हणजे ह्या मातृभूमीची सेवा आता अर्धीच राहणार वाटले. कारण काळेपाणी म्हणजे जिवंत राहायची आशाच सोडून द्यावी लागे. मन चरकले आणि बाबारावांच्या काळजीने उद्विग्न झाले.


अंदमानकडे प्रयाणाचा दिवस ठरला. बोटीवर एका कोंदट जागेत कोंबून आम्हा साऱ्या कैद्यांचा प्रवास सुरू झाला. जीव वेडापिसा होईल असे ते रोगट वातावरण. आजूबाजूला रोगी, वेडे, क्रूर, खुनी, दरोडेखोर त्यांच्यातच आमची भरती झाली. सुटकेचे विचार मनात वेगाने सुरू होते. त्या विचारांच्या गतीतच 'मोरीया' जहाजातून मी समुद्रात उडी टाकली. पलायनाचा बेत मनाशी पक्का आखूनच! पण हाय! मी पकडलो गेलो. मग माझ्यावरील पहारा वाढवण्यात आला. आणि शेवटी इथे आणून डांबण्यात आले. जीव तगमगला. 


सोबतीला अंधार नी साथीला हातापायांतील जड शृंखला. मनात सतत मातृभूमी व देशबांधवांच्या काळजीचा पिंगा. दिवसरात्र टोचणी पारतंत्र्याची! ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला .... तळमळला सागरा' असं आर्ततेने समुद्राला विनवत होतो, पण ऐकले नाही त्याने. त्याला मी आणाभाका घातल्या, अगस्ती ऋषींचा धाकही घातला, पण सारेच निरर्थक ठरले.


मी कुणालाच दोष देत नाही कारण, की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने बुद्ध्याची वाण धरिले करि हे सतीचे! अंदमानात दिवसभर आम्हा कैद्यांकडून कोलू ओढला जात असे. कोलू ओढून तेल काढायचे, काथ्या कुटायचा, अत्यंत कष्टाचे काम करायचे. त्यातून खाण्यासाठी आहार अत्यंत अपुरा ; अस्वच्छता इतकी की, भाजीत अळ्या, किडे सापडत. 


वातावरण गलिच्छ असे, जळवादेखील अंगावर येत. डास, ढेकूण, माश्या दलदल यांचे साम्राज्यच होते कोठडीत. आजूबाजूला थुकी, लघवी, विष्ठा ह्याची घाण. वेड्या कैद्यांच्या नाना विक्षिप्त तन्हा चालत. जेलरचे जाचक अन्यायकारी नियम सततच डोक्यावर. सर्वच सुन्न करणारे. 



सुरुवातीला डोळे भरून यायचे. उरातल्या भावना ऊर फुटून बाहेर पडल्या तर बरं असं वाटायचं. संसाराची तर होळी झालीच होती पण पत्नी मुले ह्यांच्या आठवणींनी जीव कासावीस व्हायचा. मन ताब्यात राहायला तयार व्हायचे नाही. मनाचे बेलगाम अश्व चौखूर नी चौफेर उधळायचे. मग... मनाला शांत करीत समर्थ रामदासांची बलदंड छबी डोळ्यासमोर यायची. समजवायची.


“साजिरी शक्ती तो काया, काया मायाची वाढवी युक्तीला पाहिजे शक्ती, तस्मात् शक्ती प्रमाण हे।"
मग मात्र मनोमन ठरवले शक्तीची उपासना करायची. समोर येईल ते अन्न सेवन करायचे. धडधाकट राहायचे, शरीरसंपदा कमवायची. बलोपासना करायची.


त्याप्रमाणे दिवसभरच्या अतिश्रमाच्या कामाबरोबर दंड, जोर, बैठका काढू लागलो, सूर्यनमस्कार घालू लागलो. दणकट शरीरात दणकट मन वसू लागले. मनानेच मग जिवंत राहण्याचे ठरवले, न डगमगता. कधी कधी देवी सरस्वती यायची पुढ्यात... दोन हातांनी शब्दांची बरसात करीत आशीर्वाद द्यायची मग मी बराकीच्या भिंतींवरच कोळशाने लिहही लागलो. 


लिहिलेलं मुखोद्गत करू लागलो, कारण लिहिण्यासाठी जवळ कागद, पेनाची सामुग्री नव्हती. 'कमला' आख्यान मी तेथेच लिहिलं... १९४७ साल उजाडलं. १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. काळरात्र संपली उष:कालाचे किरण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य घेऊन आले, सुटका झाली आमची! मातृभूचे चरण पाहून मन उचंबळून म्हणू लागले,


जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते, भगवती, त्वां महं यशोयुतांवन्दे ॥ पण... आनंदाच्या क्षणीच कुणीतरी वार करावा, तसे अशुभ शब्द कानी पडले. 'देशाचे तुकडे झाले. देश विभागला गेला.' हिंदस्तान पाकिस्तान निर्माण झाले. काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा हे फारच विदारक आहे. मनात प्रश्नांचा कलोळ उसळला. 


बापूजींनी असं कसं घडू दिलं? बॅरिस्टर जीना इतके का बिथरले? भगतासग, राजगुरु, कल्पना दत्त, लो. टिळक, सूर्यसेन यांच्या रक्ताच्या एक एक थेंबातून हजार हजार प्रश्नचिन्ह उभी राहिली. मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यातून सहस्र अश्रुधारा वाह लागल्या. सुजलाम् सुफलाम् अखंड भरतखंड आज दुभंगला, चिरफळला.


नंतर बापूजींची हत्या झाली. देश शोकसागरात बुडाला. मीही परत कारावास भोगला..... मृत्यूच्या प्रतिक्षेत... जीवन कंठण्यापेक्षा मी प्रायोपवेशन केले. अन्न, पाणी त्यागिले अन् देहत्याग केला. सध्याचे चित्र किती विदारक आहे. जळता काश्मिर, रडवेला पंजाब, धगधगती मुंबई....सारं सारं पाहवत नाही, सोसवत नाही. काही राज्यकर्ते तर केवळ रक्षकांच्या वेशातले भक्षकच आहेत! 


अस्मिता व नीती विसरलेले सामाजिक कार्यकर्ते प्रजाअहितदक्ष लोकप्रतिनिधी! बाप रे, सहन होत नाही रे! वाटतं का आम्ही काळ्या पाण्यावर गेलो? कां कोलू ओढला ? जाऊ दे बाळ, पण लक्षात ठेव तुम्हा युवकांकडून मात्र खूप अपेक्षा आहेत. अरे! युवाशक्ती म्हणजे महान ताकद, देशाचा कणा... समाजात दोन प्रकारचे युवक असतात.


पहिल्या प्रकारात 'जे चाललंय, ते चालू दे' म्हणणारे उदासीन व दुसरे जे चाललंय ते बदलण्याची जबाबदारी घेणारे. ती ताकदीनं स्वीकारणारे. क्रांती फक्त शस्त्र व अस्त्रांनीच होते असे नाही. मानसिक व सांस्कृतिक क्रांतीकारक व्हा. या देशाची प्रगती तुमच्या हातात आहे, तरंच भारत महासत्ता' बनेल. 



अखंड भारताचं कालचं स्वप्न उद्या तुम्ही सत्यात आणाल असं आश्वासन दे मला" एवढं बोलून स्वातंत्र्यवीर दिसेनासे झाले. ते उभे होते, तिथली माती मी कपाळी लावून घेतली. मला त्यांच्यातल्या शक्तीचा काही अंश मिळावा म्हणून! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद





 निबंध 3

एका क्रांतिकारकाचे मनोगत मराठी निबंध | eka krantikarkache manogat marathi essay.



मी त्या दिवशी हुतात्मा स्मारकाजवळून जात होतो. त्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत होता तो 'हुतात्मा स्मारक'. अचानक मला एक आवाज ऐकू आला. कोणाचा होता तो आवाज? मी एकदम दचकलोच! मी घाबरून पळत सुटणार तोच परत एकदा तो मधाळ आवाज ऐकू आला - 


“घाबरू नकोस बाळा या हुतात्मा स्मारकावर नाव कोरले गेलेला एक क्रांतिकारक बोलत आहे तुझ्याशी! ये, या कट्टयावर बैस असा घाबरू नकोस. मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे तुझ्यासमोर!”
अरे, मी जेव्हा विद्यार्थिदशेत होतो, तेव्हा देश पारतंत्र्यात होता. मी शिक्षण अर्धवट सोडून दिले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या धगधगत्या अग्निकुंडात मी उडी घेतली.



स्वातंत्र्य मिळविणे हेच ध्येय होते माझ्यासारख्या अनेकांचे! यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले होते. त्यांच्यापासून मी स्फूर्ती घेतली. माझे अनेक सोबती होते. सारे स्वातंत्र्यप्राप्तीच्या उदात्त ध्येययाने झपाटलेले! स्वातंत्र्यासाठी झपाटलेले ध्येयवीरच जणू!
'होऊनिया बेहोष धावलो,
ध्येयपथावरती
न थांबलो विश्रांतीस्तव,
पाहिले न मागे!'



या कामी मला खूप हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या. मी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्यात सहभागी झालो. मी शस्त्रे चालवायला शिकलो. बॉम्ब तयार करताना अनेकदा हात भाजून घेतले, पण मला त्याची पर्वा नव्हती. क्रांती करायची असेल तर अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. 


याची मला जाणीव होती. माझे खूप हाल झाले. अनेकांनी मला या कार्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले; पण
'बांधू ना शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे.'
कारण होता -


'एकच धागा समोर आणि पायतळी अंगार !' मला घरच्यांच्या, आप्तेष्टांच्या, मित्रांच्या प्रीतीपेक्षा क्रांती प्यारी होती! स्वातंत्र्याचे ध्येय गाठण्यासाठी मी केलेले क्रांतिकारी प्रयत्न इंग्रज सरकारला कसे रुचणार ?
सरकारचा माझ्यावर रोष होता मग मी भूमिगत झालो. 



भूमिगत होऊन 'क्रांती' हे वर्तमानपत्र काढले. गुप्त रेडिओ चालविले. सरकारी कचेऱ्यांवर सहकाऱ्यांच्या सहकार्याने हल्ले केले. पोस्ट ऑफिस जाळले. इंग्रजांसाठी काम करणाऱ्या फितुरांना चांगला धडा शिकविला. या कृत्यांमुळे इंग्रजांनी माझ्यावर बक्षीस लावले व या बक्षीसाच्या लोभामुळे आपल्याच (?) माणसांनी मला दगा दिला. मी पोलिसांच्या हाती लागलो. 


माझ्यावर खटला भरण्यात आला. न्यायदानाचे नाटक करण्यात आले. मला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
या शिक्षेमुळे मला दुःख वाटले नाही. आणि का वाटावे दुःख ? रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले? या तत्वावर माझी श्रद्धा होती. ज्या उदात्त ध्येयासाठी मी प्रयत्न केले त्यासाठीच मला फासावर जावे लागणार होते. आणि मला माहिती होते की -


“सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते

उठतिल त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते.”



बलिदानातून असंख्य ध्येयवीरांनी स्फूर्ती घेतली. त्यांनी स्वातंत्र्याच्या पेटत्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेतली. अनेकांनी बलिदान केले. अखेर बलिदान सफल झाले. अहो, भारतमाता स्वतंत्र झाली. पण नंतर मात्र निराशाच झाली... स्वराज्य आले; पण त्याचे तुम्हाला सुराज्यात रूपांतर करता आले नाही. 


स्वातंत्र्यानंतर ध्येयवाद संपला स्वार्थी आणि गलिच्छ राजकारण मान्यता पावत आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वांना खायला पोटभर मिळेल, रोजगार मिळेल अशी अपेक्षा होती; पण ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. दुह्यांचा गुणाकार झाला. स्वार्थी राजकारणी आणि ढोंगी समाजधुरीण यांचा सुळसुळाट झाला. 



गरिबांकडे कोणाचं लक्षच नाही. सगळीकडे भ्रष्टाचार माजला आहे. जो तो सत्तेसाठी हपापला आहे. कोणत्या टोप्या डोईवर ठेवून आपल्या घरावर सोन्याच्या खापऱ्या घालता येतील याचाच जो तो विचार करत आहे...! यामुळे देश सुखी नाही. अन् म्हणून माझे मन दुःखी आहे. कधी-कधी असे वाटते -


'याचसाठी का केला होता अट्टहास ?' पण मी पुरता निराश झालेलो नाही. कारण तुम्हा पिढींकडून आशा वाटते. १९४२ मध्ये जे घडले त्याचा विसर आजच्या अलीकडच्या च्या 'ए लव्ह स्टोरी' वाल्या पिढीला पडणार नाही' याची मला खात्री वाटते. 


नव पिढीने नवीन आदर्शाद्वारे देशाची उभारणी करावी, हीच माझी इच्छा आहे. तरच माझ्या मनाला समाधान वाटेल. माझे बलिदान सार्थ झाल्यासारखे वाटेल.

‘उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे
पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.'


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता धन्‍यवाद .