सांप्रदायिक सद्भावना मराठी निबंध | Essay on sampradayik sadbhavana in marathi

  सांप्रदायिक सद्भावना मराठी निबंध | Essay on sampradayik sadbhavana in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सांप्रदायिक सद्भावना मराठी निबंध बघणार आहोत. संत तुलसीदास म्हणतात, "जहाँ सुमति तह सम्पति नाना। जहां कुमति तहं विपति निधाना।" अर्थात जिथे चांगल्या बुद्धीची माणसे असतात तिथे संपन्नता असते आणि जिथे


वाईट बुद्धीची माणसे असतात तिथे वाद उद्भवतात. एकमेकाबद्दल सद्भावना असणे हाच उन्नतीचा मूळ मंत्र आहे. कोणतेही कुटुंब समाज आणि राष्ट्र सौहार्द व संघटना असल्याशिवाय बलवान बनू शकत नाही.


भारत एक विशाल देश आहे. इथे धार्मिक सहिष्णुतेची परंपरा नेहमीच राहिली आहे. आपल्या संस्कृतीत 'अयं निजः परोवेती' साठी स्थान नाही इथे "वसुधैव कुटुंबकम," ही भावना आहे म्हणून हिंदुस्थान सगळ्या जगापेक्षा चांगला आहे. भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात. 


प्रामुख्याने हिंदू, मुसलमान, शिख, ख्रिश्चन, पारशी, जैन, बुद्ध या धर्मांचे लोक भारताचे निवासी आहेत. जरी याठिकाणी हिंदू बहुसंख्य असले तरी हिंदूंची सहिष्णुता, उदारता यामुळेही या देशात इतर धर्मांचीही प्रगती झाली.


१८५७ चे स्वातंत्र्यसमर असो वा त्यानंतरची स्वातंत्र्यचळवळ असो. संकटाच्या वेळी सर्व धर्मांचे लोक एकजुटीने राष्ट्रसेवा करतात. चीन-पाकितान युद्धाच्या वेळचे भारताचे राष्ट्रीय ऐक्य प्रशंसनीय ठरले आहे. या ऐक्याचा मूळ आधार भारताची सांस्कृतिक पार्श्वभूमी राहिला आहे. 


आपल्या देशातील सर्वात प्राचीन भाषा संस्कृत आहे. तिच्या पासूनच तामिळ, तेलुगु, कानडी, मल्याळम, गुजराती, मराठी, बंगाली इत्यादी भाषा उत्पन्न झाल्या. येथील पर्वकाळ, यात्रा, धार्मिक ठिकाणे धार्मिक सद्भावनेचे प्रतीक आहेत. 


मुसलमान कवी हिंदूंच्या देवतांचे गोडवे गातात तर हिंदू लोक मुसलमानांच्या पिराला नवस बोलतात. सर्व धर्मांचे लोक एकमेकांशी मिळून मिसळून वागतात. हे राष्ट्रीय सद्भावनेच प्रतीक होय. येथील धार्मिक स्थळे सर्वांची आहेत. एखाद्या विशिष्ट धर्माची त्याच्यावर मालकी नाही. 


मथुरा, वृंदावनच्या कृष्ण मंदिरात केवळ हिंदू भक्तच जातात असे नसून मुसलमान पण श्रद्धेने जातात. ब्रजभूमीत जसा घनानाद होता तसाच मुसलमान कवी रसखानही होता सारांश, आपल्या देशात धार्मिक ऐक्य पूर्वीपासून आहे. मोगल राजवटीत हिंदू सरदार, सेनापती होते.


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर हिंदू, मुसलमान आणि शिख धर्माचे अनुयायी भारताचे राष्ट्रपती राहिले. आपल्या सेनेच्या सेनापतिपदावर सर्व धर्मांचे सेनापती क्रमाक्रमाने आले. सर्व धर्मांच्या लोकांनी संकटकाळात वीरोचित कृत्ये करून राष्ट्राला गौरव प्राप्त करून दिला. 


अब्दुल हमीद, मेजर आशाराम त्यागी, रणजित सिंह इ. अनेक लोकांनी आपल्या रक्ताने इतिहास गौरवशाली केला आहे. परंतु काही दिवसांपासून स्वत:च्या क्षणिक स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय सद्भावना नष्ट करून जातीयतेला उत्तेजन दिले जात आहे. मतांच्या राजकारणाने देशातील धार्मिक समता आणि सद्भावनेवर आघात केले आहेत. 


भारतातील बऱ्याच राज्यांत राजकारण पतनाच्या काठावर उभे असलेले दिसते. असे राजकारण राष्ट्राच्या प्रगतीचे शभ लक्षण नाही. जातिवाद व धार्मिक आधारावर राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडन आणतात. या परंपरेमुळे धार्मिक सद्भावना नष्ट होत आहे. 


धार्मिक उत्सवाच्या प्रसंगी एक गट दुसऱ्या गटावर प्राणघातक हल्ले करतो, जळिताच्या घटना घडतात या वास्तवतेकडे पाहून आपण डोळेझाक करू शकत नाही. एका गटाचे समाधान करण्यासाठी वेगळी नीती स्वीकारावयाची आणि दुसऱ्या गटाची उपेक्षा करावयाची फक्त मतांसाठी, निवडून येण्यासाठी जातीच्या आधारावर छोटे राजकीय पक्ष अस्तित्वात येतात. आणि राष्ट्रीय पक्ष सरकार बनविण्यासाठी त्यांच्याशी तडजोड करतात. 


ही गोष्ट धार्मिक सद्भावनेसाठी विषासमान आहे. भारतात अल्पसंख्याक जातिधर्माच्या नावाखाली देशाच्या घटनेशीच खेळ चालू आहे. शहाबानूच्या प्रकरणावरून हे सिद्धही झाले आहे. राजकीय पक्ष नि:पक्षपाती टीकेचे पथ्य पाळू लागले आहेत. सद्भावनेचा मुख्य शत्रू काळा पैसा हा आहे. 


काळया पैशाच्या साहाय्याने तरुणांना प्रलोभनाच्या जाळयांत पकडून सांप्रदायिक दंगे घडवून आणणे फार सोपे आहे. खासदार, आमदार, पुढारी, आपल्या मुलामुलींच्या विवाहावर अब्जावधी रुपये. खर्च करतात. त्यामुळे कुणास ठाऊक कोणता सद्भाव उत्पन्न होतो? सत्य तर हे आहे की, बिखर रहा पानी सां पैसा, गलियों और दरबारों में।


आपाधापी मची हुई है, सत्ता के गलियारों में। जर आपले राष्ट्र सदैव सशक्त आणि अखंडित राहावे व एक महाशक्ती म्हणून जगात मान्यता पावावे असे वाटत असेल तर सांप्रदायिक सद्भावाची आपली प्राचीन परंपरा कायम ठेवली पाहिजे. कवि जगदीशचंद्र त्यागीच्या शब्दांत.


"राष्ट्रीयता धर्म हमारा और अखंडता नारा है। 

भारत हमको अपने प्राणों से भी ज्यादा प्यारा है। 

खंडित हो जायेगा वह ही, जो खंडन की सोचेगा। 

सर्व धर्म सद्भाव, एकता जीवन लक्ष्य हमारा है।" 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद