जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध | JANSEVA HICH ISHAVRSEVA MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण जनसेवा हीच ईश्वरसेवा शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत महाराष्ट्रातील भागवत धर्माने भक्तीला वेगळेच वळण दिले. त्यापूर्वी भगवंताची पूजा करायची ती षोडशोपचारे. पूजेचे अवडंबर फार मोठे होते. पण संतांनी नवा मार्ग दाखवला. केवळ नामस्मरण करा, परमेश्वर प्राप्ती होईल.
संत एकनाथांनी तर त्यापुढे एक पाऊल टाकले. "जनता हाच जनार्दन आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा," असा संदेशच त्यांनी दिला.अपंग, दुर्बलांसाठी आपला वेळ, आपली शक्ती खर्च केली, तर तीच खरी ईशपूजा ठरेल. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात की, जो रंजल्या-गांजलेल्यांना आपले समजून त्यांची सेवा करील, तोच खरा संत, तोच खरा साधू. अशा सेवाभावी व्यक्तीतच देवत्व अवतरलेले असते.
संत गाडगेबाबा देवळात जात नसत. पण देवळात जाणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून देवळाचा परिसर झाडून स्वच्छ करीत असत. कुष्ठरोग्यांची सेवा करणे, हेच आपले भजन, कीर्तन ते मानत. येशू ख्रिस्त, महात्मा गांधी या थोरांनीही आपल्या जीवनकार्यात कुष्ठरोग्यांच्या सेवेला स्थान दिले.
मदर टेरेसा आपली जन्मभूमी सोडून दुःखितांची सेवा करण्याकरिता धावून आल्या. याहून मोठी ईशसेवा कोणती?आनंदवनाची स्थापना करून बाबा आमटे यांनी समाजाने बहिष्कृत केलेल्यांना आत्मविश्वास दिला. हजारो अपंगांना स्वतःच्या पायावर उभे केले. कारण त्या कार्यातच त्यांना ईश्वर दिसला.
आजही समाजात असे अनेक लोक आहेत की, जे अशा ईशपूजेत आपला वेळ सत्कारणी लावतात. कुणी वृद्धांसाठी आश्रम काढतात, तर कुणी आदिवासींच्या वस्तीत जाऊन त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात. कुणी रस्त्यावर हिंडणाऱ्या अनाथ मुलांना सन्मार्गी लावतात, तर कुणी वेश्यांच्या मुलांसाठी घरकुले उभी करतात.
परदेशात वैदयकीय शिक्षण घेतलेले डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी 'शोधग्राम' संस्था काढून बालमृत्यू थोपवले. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाताई आमटे यांनी 'हेमलकसा' येथील आदिवासींना नवे जीवन दिले.
डॉ. बावस्कर वर्षानुवर्षे विंचूदंश झालेल्या रोग्यांसाठी धडपडत आहेत. हे यत्नयज्ञ याच खऱ्या 'महापूजा' आहेत. या सर्वांनी जाणले आहे की, 'देव दगडात नसून माणसांत आहे.' मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद