जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध | JANSEVA HICH ISHAVRSEVA MARATHI NIBANDH

 जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध | JANSEVA HICH ISHAVRSEVA MARATHI NIBANDH

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण  जनसेवा हीच ईश्वरसेवा शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत महाराष्ट्रातील भागवत धर्माने भक्तीला वेगळेच वळण दिले. त्यापूर्वी भगवंताची पूजा करायची ती षोडशोपचारे. पूजेचे अवडंबर फार मोठे होते. पण संतांनी नवा मार्ग दाखवला. केवळ नामस्मरण करा, परमेश्वर प्राप्ती होईल. 


संत एकनाथांनी तर त्यापुढे एक पाऊल टाकले. "जनता हाच जनार्दन आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा," असा संदेशच त्यांनी दिला.अपंग, दुर्बलांसाठी आपला वेळ, आपली शक्ती खर्च केली, तर तीच खरी ईशपूजा ठरेल. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात की, जो रंजल्या-गांजलेल्यांना आपले समजून त्यांची सेवा करील, तोच खरा संत, तोच खरा साधू. अशा सेवाभावी व्यक्तीतच देवत्व अवतरलेले असते.


संत गाडगेबाबा देवळात जात नसत. पण देवळात जाणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून देवळाचा परिसर झाडून स्वच्छ करीत असत. कुष्ठरोग्यांची सेवा करणे, हेच आपले भजन, कीर्तन ते मानत. येशू ख्रिस्त, महात्मा गांधी या थोरांनीही आपल्या जीवनकार्यात कुष्ठरोग्यांच्या सेवेला स्थान दिले.


मदर टेरेसा आपली जन्मभूमी सोडून दुःखितांची सेवा करण्याकरिता धावून आल्या. याहून मोठी ईशसेवा कोणती?आनंदवनाची स्थापना करून बाबा आमटे यांनी समाजाने बहिष्कृत केलेल्यांना आत्मविश्वास दिला. हजारो अपंगांना स्वतःच्या पायावर उभे केले. कारण त्या कार्यातच त्यांना ईश्वर दिसला. 


आजही समाजात असे अनेक लोक आहेत की, जे अशा ईशपूजेत आपला वेळ सत्कारणी लावतात. कुणी वृद्धांसाठी आश्रम काढतात, तर कुणी आदिवासींच्या वस्तीत जाऊन त्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात. कुणी रस्त्यावर हिंडणाऱ्या अनाथ मुलांना सन्मार्गी लावतात, तर कुणी वेश्यांच्या मुलांसाठी घरकुले उभी करतात.


परदेशात वैदयकीय शिक्षण घेतलेले डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी 'शोधग्राम' संस्था काढून बालमृत्यू थोपवले. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाताई आमटे यांनी 'हेमलकसा' येथील आदिवासींना नवे जीवन दिले. 


डॉ. बावस्कर वर्षानुवर्षे विंचूदंश झालेल्या रोग्यांसाठी धडपडत आहेत. हे यत्नयज्ञ याच खऱ्या 'महापूजा' आहेत. या सर्वांनी जाणले आहे की, 'देव दगडात नसून माणसांत आहे.' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


निबंध 2 
 
जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध | JANSEVA HICH ISHAVRSEVA MARATHI NIBANDH

मागच्या रविवारची गोष्ट. आमच्या गावाजवळ सुमारे दहा किलोमीटरच्या अंतरावर एक मालवाहू टेंपो, प्रवाशांसह उलटा झाला. वीस पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. काहीना तातडीने पुण्याला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. 


दवाखान्यात ही ऽऽ गर्दी लोटली होती. गावकरीही स्वयंस्फूर्त मदतीचा हात देऊ करीत होते. मानवतेचे जणू पुजारीच! या स्वयंसेवकांत सगळ्या धर्माचे, जातीचे, राजकीय पक्षांचे लहान मोठे, गरीब-श्रीमंत लोक जमतील ती मदत करीत होते. 


कुणी स्वत:ची गाडी पुण्याला पाठवायला तयार होते, कुणी कापसाची बंडलं, बँडेजेस, डेटॉलच्या बाटल्या आणत होते तर कुणी खांद्यावरून अपघातग्रस्तांची वाहतूक करीत होते, कुणी रक्तदानासाठी रंग लावीत होते.


खरंच 'जनसेवा हीच ईश्वरसेवा!' म्हणतात ह्याचा अनुभव मीही प्रत्यक्ष घेतला त्यादिवशी. बाबांचाही पूर्ण दिवस त्यातच खर्ची पडला. आमच्या घरची सत्यनारायणाची पूजा त्यादिवशी रात्री आठ वाजता झाली. कारण बाबा अडकले होते नरनारायणाच्या पूजेत! दुसऱ्याला मदत करणाऱ्या माझ्या बाबांचा मला खूप खूप अभिमान वाटला. 


वरोड्याला डॉ. बाबा आमट्यांनी तर कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी रात्रीचा दिवस करून आनंदवन उभारले. कुष्ठरोग्यांच्या हातांनी तेथे शेतमळे फुलवले. भाजीपाला, मोत्यांची कणसे पिकवली. रोग्यांमधील न्यूनगंड पुसून, त्यांच्यात आत्मसन्मान व आत्मविश्वास जागवला. 


मदर तेरेसांनी दीनदुबळ्या दलितांची, पीडितांची, तहहयात सेवा शुश्रुषा केली. फार फार वर्षांपूर्वी ज्या थोर शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली, तो लसींचा जनक लुई पाश्चर ह्याने संशोधनाच्या निष्कर्षांसाठी वेगवेगळ्या रोगजंतूंचे इंजेक्शन स्वत: टोचून घेऊन, त्याचे शरीरावर होणारे परिणाम अभ्यासले. लुई पाश्चरच्या अथक प्रयत्नांमुळे देवीसारख्या असाध्य रोगांचे निर्मूलन झाले नी लुई पाश्चर अमर झाला आगळी वेगळी मानवसेवा करून! 



वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस, कार्व्हर ह्यांनी शेतीमध्ये अभिनव प्रयोग व संशोधन करून कृषीक्षेत्रात क्रांती घडवली. मानवी विकासाला हातभार लावला. थोर समाजसेवक म. फुले, ह्यांनी स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली. अस्पृश्यांना, दलितांना पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून दिला. 



आपल्याच मरणाची वाट पाहणाऱ्या विधवांच्या पुनर्विवाहांचा आग्रह धरून कित्येक बालविधवांना जगण्याची उमेद दिली. महर्षी कर्त्यांनी स्त्रियांसाठी अनाथाश्रम, शिक्षणकेंद्रे काढली. ते म्हणत, 'ईश्वराने आपल्याला दोन हात दिलेत, बुद्धी दिलीय ते काही घेण्यासाठी सरसावण्यापेक्षा, देण्यासाठी वापरले जावेत.'


'कुणी नाही वाली भार पेलण्यास, फाटके आभाळ भेगा धरतीस' अशीच अवस्था असलेल्या निराधार, अनाथ बालकांना छप्पराची सावली नि ममतेचा पदर दिला सिंधुताई सपकाळ या मातेनं! मरेपर्यंत रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. कोटणीसांची कहाणी तर अमरत्वाला पोहाचली. प्रतिकूल परिस्थितीत ह्या प्रभृतींनी माणसातल्या ईश्वराची मनोभावे पूजा केली.


हल्ली तर जग जवळ आलंय. ग्लोबलायझेशन झालंय. इंटरनेट सुरू केलं की कळतं, जग व जगातली माणसं एकाच संगणकात मावू शकतात. साऱ्या जगातल्या मानवाचा धर्मही एकच - मानवता. 'हे विश्वचि माझे घर' म्हणणाऱ्या ज्ञानोबांना सातशे वर्षांपूर्वीच ग्लोबलायझेशनचा अर्थ बहुधा कळला होता म्हणूनच त्यांनी विश्वासाठी मागणे मागितले ‘पसायदाना'तून! त्यागाची मूर्ती सानेगुरुजींनी जनसेवेसाठीच जन्म अन् ती करता करताच मृत्यू यावा असं म्हटलंय. ते म्हणतात,



"हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले देशार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत होवो.' आपण सारे भारतीय संस्कृतीत रुजलो, वाढलो, बंधुभाव, एकोपा आपल्या रक्तातच भिनलाय. जणू काही, 'तू हाक मार मी प्रतिसाद देईन, तू मदत माग मी धावत येईन' असं आश्वासक शब्दात सांगणारे आम्ही सारे बांधव.



आमच्या शाळेत मकरसंक्रांत ते रथसप्तमी ह्या काळात एक अभिनव उपक्रम राबवला. या दिवसात प्रत्येकाने 'जे आपल्यापाशी आहे त्याचा विनियोग  दुसऱ्यासाठी करण्याचा. अर्थात स्वत:ची सेवा, कष्ट, मदत गरजूंना देण्याचा उपक्रम. आम्ही विद्यार्थी-विद्यार्थिनी हॉस्पिटलमध्ये गेलो. पेशंटची सेवा केली. एड्सग्रस्त, कॅन्सरग्रस्त मुलांची करमणूक केली. 


पाच पन्नास घरांमधून जुने कपडे गोळे केले, ते गरीब गरजू अनाथ मुलांच्या वसतीगृहात नेऊन दिले. श्रमदान करून परसबागा, रस्ते स्वच्छ केले. वृद्धाश्रमांना भेटी दिल्या. वृद्ध, आजीआजोबांशी गप्पा मारल्या. त्यांना गाणी म्हणून दाखवली. एक प्रेमळ आमच्या तोंडावरून हात फिरवीत म्हणाल्या, बाळांनो, कल्याण होवो तुमचं यशवंत व्हा. कीर्तीवंत व्हा. 



त्यांच्या तोंडभरून आशीर्वादानं वाटलं, 'कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी?' खरा भगवंत तर माणसाच्या हृदयातच वसतो आहे. भगवंत भावाचा भुकेला आहे. नैवेद्याचा नाही. गूळखोबरं, पुरणपोळी भुकेल्या मानवाच्या मुखी घातलं तरच भगवंत तृप्त होतो नि विश्वकल्याणी वर देतो हे नक्की. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद