माझ्यातील गुणदोष मराठी निबंध | MAZYATIL GUNDOSH MARATHI NIBANDH

 माझ्यातील गुणदोष मराठी निबंध | MAZYATIL GUNDOSH MARATHI NIBANDH

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझ्यातील गुणदोष मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. काय ? स्वतःचे गुण स्वतःच्याच तोंडानी (लेखणीनी) सांगायचे? आपणच आपली आरती ओवाळायची? आत्मस्तुतीने जीभ विटाळायची? स्वगुणांचा डांगोरा पिटायचा ?


'आपुली आपण करी स्तुती, तो एक मूर्ख' असं समर्थ ठणकावून सांगत असता कानात बोटे घालून बसायचे ? छे ! छे आपले गुण प्रदर्शनाचा विषय नाही, जाहिरातीचा तर मुळीच नाही. आणि स्वतःचे दोष तरी कसे सांगावे ? आडपडदा न ठेवता, पक्षपात न करता? 'दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही' 


हा तर मानवी स्वभाव ! मी याला अपवाद कशी असणार ? 'विरला जानन्ति गुणान्!' म्हणजे दुसऱ्यांचे गुण जाणणारे लोक विरळ असतात पण माझ्या मते 'विरला जानन्ति स्वदोषान् !' मग स्वतःच्या पायाखाली काय जळत आहे ते मला दिसेल ?


आणखी एक धोक्याची जागा ! गुण सांगताना मनाचा अश्व बेलगाम धावेल आणि दोष सांगताना टाच मारली तरी एकही पाऊल पुढे टाकणार नाही. गुणवर्णन करताना शब्द, वेळ अपरा पडेल आणि दोषांचे वर्णन करताना शब्द मूक होतील. 'मौनं सर्वार्थसाधनम्', 'झाकली मूठ सव्वा लाखाची' या वचनांचं स्मरण होत राहील.


विषय कठीण आहे खराः पण त्या निमित्ताने आत्मपरीक्षण तर होऊन जाईल! या सुज्ञपणाच्या विचारातून हा लेखनप्रपंच ! 'अयोग्यो पुरुषो नास्ति' असं कोणा महाभागाने लिहून ठेवले आहे. प्रत्येकाजवळ काही ना काही गुण असतोच. टाकाऊ, निरुपयोगी असं कोणीच नाही असा त्याचा अनुभव. सांगायला संकोच वाटतो पण माझ्यातही काही चांगले गुण असणारच की हो !


माझं मन आहे फुलपाखरासारखं! आनंदी, निष्कपट, स्वच्छंद ! लहानपणापासून आजतागायत हट्ट केल्याचं स्मरत नाही मला. समाधानाचा हा वारसा आईवडिलांकडून आला आहे. माझ्या प्रेमळ आजीने ध्रुव, प्रल्हादाच्या गोष्टी सांगून देवभक्तीचे संस्कार माझ्यावर केले. 'संवेदनशीलता' हाही माझ्या स्वभावाचा विशेष. 


दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी पाहिलं की माझ्याही डोळ्यात गंगायमुना गर्दी करणार ! भांडणाचा मला मनापासून तिटकारा ! त्यामुळे मनमिळाऊ वृत्ती अंगी उपजतच आहे. माझी अभिरूची चांगली आहे आणि त्याबद्दल मला रास्त अभिमान आहे. 


दूरदर्शनवरील पाचकळ मालिका आणि फालतू चित्रपट मला मुळीच पसंत नाहीत. अभ्यासाबरोबर खेळ, पाककला, नाटक, गायन, वाचन इत्यादी गोष्टीतही मला रस आहे. माझ्या या गुणांचं श्रेय आईवडिलांचं, गुरुजनांचं आहे हे निर्विवाद !


माझा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे लहरीपणा. मनात असलं तर कामाचे डोंगर उपसीन नाही तर इकडची काडीही तिकडे करणार नाही. त्यामुळे 'जो माझ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला' असा कधी कधी अनुभव येतो. चंचलपणासाठी तर मी कायम बोलणी खाते. 


कोणतंही काम एका जागी, दीर्घकाळपर्यंत बसून करणं माझ्या स्वभावात नाही. तीन तास परीक्षेच्या हॉलमध्ये बसून पेपर सोडविणं ही मला शिक्षा वाटते. मी शिक्षिका वगैरे झाले तर हा अवधी कमी करण्यासाठी जरुर खटपट करेन.


'आत्मविश्वासाचा अभाव' हे एक पिशाच्च मला नेहमीच भेडसावत असतं. 'पाण्याने भरलेली बादली आपल्याला उचलेल की नाही?' इथपासून ‘इंग्रजी माध्यम मला झेपेल की नाही ?' इथपर्यंतच्या प्रत्येक प्रश्नाला नकारार्थी उत्तर देणारा आणि माझा ‘आत्मविश्वासघात' करणारा हा माझा कट्टर शत्रू ! त्याला आयुष्यात केव्हातरी नामोहरम करावं लागणार आहे.


आणि माझा भित्रेपणा तर जगजाहीरच आहे. पालीची भीती, झुरळाची भीती, कुत्र्याची भीती, एकटीने बाहेर जायची भीती आणि वर्गात उत्तरं द्यायचीही भीती ! परवा गंमतच झाली. गीतेचा अध्याय पूर्ण पाठ असल्यामुळे माईकसमोर उभं राहण्याची हिंमत केली आणि अशी काही बोबडी वळली अस्मादिकांची ! तर एकंदरीत ‘अशी मी, असामी'


खरं खरं ते सांगितलं, खोटं खोटं ते टाळलं. बाकी काही म्हणा ! निबंधाच्या विषयानी झणझणीत अंजन घातलंय माझ्या डोळ्यात. स्वतःचे दोष कमी करण्याचा आणि नवनवीन गुणांचे संपादन, संवर्धन करण्याचा मी मनाशी निश्चय केला आहे. “जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे" खरं ना ? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 

माझ्यातील गुणदोष मराठी निबंध | MAZYATIL GUNDOSH MARATHI NIBANDH


Man is a mixture of vices and virtues. पण त्यामुळेच माणसाचं व्यक्तिमत्त्व कॅलिडोस्कोपसारखं बहुरंगी, बहुढंगी, कोन बदलला की नवीन रेखाकृती दर्शवणारं, लोभसवाणं वाटतं. मला तर हे फार जाणवतं... पप्पांना मी कविमनाची पण कणखर कन्या वाटते, तर आईला कमकुवत मनाची दुर्बळ कन्या वाटते.


भावाला मी बेरकी वाटते, इतरेजनांना आपुलकी वाटते... कशाला गुण म्हणू, कशाला दोष कळत नाही. 'राखावी बहुतांची अंतरे' चं मी पालन करते. तशी मी भिडस्त. कुणाचं मन मोडायला मला नाही आवडत. त्यामुळे माझं कुणाशी भांडण होत नाही. 


पु. लं. च्या भाषेत 'एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी' तशी माझी कुणाशीही मैत्री होते. बोलघेवडेपणा हा माझ्या चौफेर वाचनानं आला. हजरजबाबीपणा, कोट्या करण्याची वृत्ती मैत्रिणींची मैफल रंगवते. साऱ्यांशी माझ्या तारा जुळतात पण 'व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतातच असे नाही' 


प्रमाणे नकाराधिकार मी राखून ठेवते, वापरतेही!- यालाच माझा भाऊ बेरकेपणा म्हणत असेल. Man is a social animal हे अॅरिस्टॉटलचं म्हणणं मानायचं तर समाजापासून दूर जाऊन कसं चालेल? 'एकमेका साह्य करू-' म्हणून मी सर्वांच्या उपयोगी पडते. 


माझ्या नोट्स, वह्या, कंपास पेटी, डबा 'बहुजन हिताय, बहुजन सुखायच' असेच असतात. वृक्ष आपली फळे, फुले, आपला सुगंध स्वत:साठी थोडाच ठेवतात? संस्कृत सुभाषितांतून काय शिकलो मग आपण?... मला काही कमी पडत नाही. साऱ्या मैत्रिणी माझ्या उपयोगी पडतातच. याला कोणी 'आवळा देऊन कोहळा काढणे' म्हटले तर तो दोष. 


माझा का? मी जातीची श्रद्धाळू. मी भाविक, मी भावनाशील. वेदना, करुणा मला घायाळ करतात. देवावर, माणसाच्या माणूसपणावर माझी श्रद्धा आहे... विश्वास टाकला की कसं निर्धास्त व्हायला होतं. विश्वासावर विश्व चालते... श्वास चालतो. चालायला हवा. कुणी याचा गैरफायदा घेतात- मग आई म्हणते भोळी, भाऊ म्हणतो बावळट!


अन्याय! याची मला चीड येते. अनीती, भ्रष्टाचार ही त्याचीच वेगळी रूपं. माझं विश्व छोटं, वय लहान पण पप्पांशी वाद घालण्याचं, त्यांची चूक निदर्शनास आणून देण्याचं धैर्य मी दाखवते. मोठी झाले, अधिकार आला की अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य दाखवीनच. नुसती चीड वांझोटी. विचारांना कृतीची जोड हवी.आज पप्पांशी वाद घालताना पप्पा म्हणतात कणखर, भाऊ म्हणतो भांडखोर ! बिच्चारा.


मी आशावादी आहे. नुसती स्वप्नाळू नाही. स्वप्न मी ध्येय मानून जिद्द, चिकाटी, धोरण, सातत्य यांचा समन्वय साधायचा प्रयत्न करते. People do not plan to fail but fail to plan. असं मी करत नाही. यशस्वी होण्यासाठी लागणारा मनस्वीपणा माझ्यात आहे.


खूप खूप कष्टाची माझी तयारी असते. त्रयस्थानी याला "घासूबाई आग म्हटलं तर माफीपलीकडे मी काय करू?... गुण व दोष यांची सीमारेषा धसर आहे. गण कधी दोष, तर दोष कधी गुण होतात, कळत नाही. ते बघणाऱ्याच्या पातळीवर. प्रसंगाच्या मागणीवर बदलत जातात. मी कशी आहे कुणास ठाऊक


"ओळख माझी मला न होते, तुम्हीच सांगा कशी मी दिसते ?' - एक मात्र खरं, माणूस हा परस्परविरुद्ध गुणदोषामुळे विरोधाभासाचे उत्तम उदाहरण आहे.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 3 

माझ्यातील गुणदोष मराठी निबंध | MAZYATIL GUNDOSH MARATHI NIBANDH




एका दिवशी अचानक माझ्या डोक्यात किडा वळवळला की आपण आजपासून दैनंदिनी लिहावी. असा 'निका' निर्धार केला अन् त्याचे कसोशीने पालन केले. नंतर दैनंदिनी वाचताना माझ्या असं लक्षात आलं की लोक (आणि मी स्वतः ही) मला खूप गुणी समजतात, हा त्यांचा गोड गैरसमज आहे. 


मी 'गुणवान' नाही तर 'गुण-वाण' आहे अन् दोषांचा भरणा आहे. मी आजपर्यंत माझ्या गुणदोषांकडे कधीच गंभीरपणे पाहिलं नव्हतं. पण दैनंदिनीनं माझे डोळे उघडले. तेंव्हापासूनच माझ्या गुणदोषाबद्दल मी विचार करू लागलो.


माझ्यातील एक खूप मोठा दोष म्हणजे मी खूप भावनाप्रधान मनुष्य आहे. एखाद्या गोष्टीची भावना बाजूला ठेऊन विचार करणं मला जमतच नाही. त्यामुळे भावनेच्या भरात अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात. टॉलस्टॉय म्हणतो की भावनाशील मनुष्याचा समानार्थी शब्द म्हणजे अपयशी मनुष्य, हे अगदी यथार्थ आहे. भावनेच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय कधीच अचूक असू शकत नाही.


दुसरा एक दोष (की गुण ?) म्हणजे मी खूप परोपकारी आहे. माझ्याकडे येऊन कोणी रडव्या चेहऱ्याने पुस्तक, पैसे मागितले तर त्याला मी नाही म्हणू शकत नाही. या माझ्या स्वभावाचा अनेकजण गैरफायदा घेतात. अडचण असल्याचे नाटक करून माझ्याकडून अनेक गोष्टी उकळतात. 


माझ्या भिडस्त स्वभावामुळे मी खूप वेळा अडचणीत सापडतो. दुसऱ्याला उसणे दिलेल्या वस्तूही परत मागणे माझ्या जीवावर येते. हा माझा स्वभाव माहित असल्याने अनेकजण पैसे बुडवतात, नेलेल्या वस्तू वर्षानुवर्षे परत करत नाहीत.


एकलकोंडा स्वभाव हा माझा लाजीरवाणा दोष आहे. या स्वभावाची मला खूप वाटते. माणसानं कसं धबधब्यासारखं बोलकं राहावं असं मलाही वाटतं (पण मनात) एखादा माणूस भेटला तर चार-पाच वाक्यांच्यापुढे आमची गाडी जात नाही समोरचा बोलका असेल तर ठीक अन्यथा तोही माझ्यासारखाच असेल तर एकमेकांचे सुंदर चेहरे पाहण्यात वेळ घालवावा लागतो. 


माझा हा स्वभाव बदलावा असे मला खूप वाटतं कारण या स्वभावामुळे माझी 'माणूसघाणा' अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पण आमचा मित्राचा खास ग्रूप असेल तर मात्र मी बोलण्याचा बाबतीत शूर होतो. याचं कारण म्हणजे तिथला अनौपचारिक माहौल! त्या मैफलीत मीच राजा असतो.


मला चित्रपट पाहण्याचा मनस्वी कंटाळा आहे. हा खरं म्हणजे 'सद्गुण' आहे की नाही? पण आमच्या मित्रांच्या ग्रुपनुसार तो एक गंभीर 'दुर्गुण' जाहीर करण्यात आला आहे आणि त्याबद्दल मला वाळीत टाकण्याची (अजुन सुदैवाने मनात न आलेली) धमकी ते मला नेहमीच देत असतात. 



मला एकच प्रश्न पडतो पैसा, वेळ, मनःशाती खर्च करून ती डोकेदुखी पाहण्यात काय अर्थ आहे? माझ्यामते हिंदी चित्रपट तीन तास न कंटाळता पाहणारी जमात ही पृथ्वीतलावरची सर्वांत सहनशील जमात होय. वास्तवतेचा आणि हिंदी चित्रपटांचा दुरान्वयेही काही संबंध नसतो. त्या चित्रपटातील लोक वेगळ्याच कुठल्यातरी, अजून शोध न लागलेल्या दुनियेत वावरत असतात.


मेडीकलला असणारा नायक वर्षभर मारामाऱ्या, खेळ, मुलींवर प्रेम करण्यात दंग असतो तरीही 'सुवर्णपदक' पटकावतो. यात काडीचंही आश्चर्य आमच्या प्रेक्षकांना वाटत नाही. भर कोर्टात नायक मारामारी करून गोंधळ घालतो अन् न्यायाधीश मजा बघतात.



तीन नायक एकाचवेळी त्यांच्या आईला रक्त देतात. दोन भाऊ लहानपणी जत्रेमध्ये हमखास हरवतात अन् मोठेपणी एक चोर होतो तर दुसरा पोलिस अधिकारी बनतो. आता असल्या चावून चावून चोथा झालेल्या गोष्टी बघून वेड लागायची पाळी येईल. मराठी चित्रपटांत तर आनंदी आनंद आहे. 



चित्रपट पाहायला जातात दोन मोठे टॉवेल बरोबर न्यावे लागतात डोळे पुसण्यासाठी! स्वतःच्या खिशातले पैसे घालून हे रडणं कशाला विकत घ्यायचं? मला राग येत नाही, हा माझा गुण की दोषा याचा निवाडा मला अद्याप करता आलेला नाही. कारण असे अनेक प्रसंग असतात की जिथे राग येणे फायदेशीर असते. 



पण मला कोणी शिव्या दिल्या तरी त्याचा राग येत नाही, उलट राग आला होता तो देशमुख सरांनी एकदा वर्गातल्या सुंदर मुलीसमोर माझा अपमान केला होता तेव्हा पण राग सरांचा नाही तर माझाच आला होता. कारण चूक माझीच होती. सरांनी 'पण' हा शब्द शुद्ध कसा लिहायचा ते हजारदा सांगूनही मी तो 'पन' असा लिहिल्यास सर मुलींसमोर (अर्थात सुंदर) अपमान करणार नाहीत तर काय पूजा करतील काय? 



मला राग येत नाही याचा फायदा म्हणजे माझी कोणाबरोबरही पटकन् मैत्री होते. त्यामुळे मला असंख्य मित्र आहेत. मी सगळ्यांनाच हवा-हवासा वाटतो, त्यामागचे कारण हेच आहे! मला वाचनाचं अफाट वेड आहे. मराठीतील सगळे प्रसिद्ध लेखक मी संपवले आहेत. 



अत्रे, फडके, खांडेकर, पु.ल. यांचा तर अक्षरशः फडशा पाडलाय. शिवाजी सावंतांचं 'मृत्युंजय', रणजित देसाईचं 'स्वामी' वाचून तर मी दोन-तीन दिवस त्या ऐतिहासिक काळातून बाहेरच येत नाही. मी या जगात नसतोच. बाबासाहेब पुरंदरेंची पुस्तकं वाचून शिवाजी महाराज म्हणजे काय चीज आहे, ते कळाले. पु. लं. माझे आवडते लेखक असले तरी अनंत काणेकर, फडके, खांडेकर यांचे लघुनिबंधही मला वेड लावतात.



कथा, कादंबऱ्या, नाटकेही मला आवडत असल्या तरी मी कवितेचा वेडा आहे. (साहित्यातला. उगाच गैरसमज नको) केशवसुतांपासून ते अलीकडच्या चंद्रकांत गोखले पर्यंतच्या अनेक कवींच्या कवितांची मी पारायणे केली आहेत. 



पाडगावकर, गोविंदाग्रज, अनिल मर्ढेकर, विंदा, शांता शेळके इत्यादी कवी मला आवडतात, पण सर्वात आवडते कवी म्हणजे कुसुमाग्रज आणि ग्रेस! कुसुमाग्रजांची 'अष्टपैलू' कविता अन् ग्रेसची काहीशी दुर्बोध वाटणारी 'आशयघन’ कविता म्हणजे मराठी साहित्यातील मैलाचे दगड होत, असं माझं मत आहे.



तर असे माझे गुण नि दोष!
पण समर्थांनी स्वतःची स्तुती करणाऱ्याला महामूर्ख म्हटले आहे. मनुष्य हा कधीच संपूर्णपणे चांगला अथवा वाईट असत नाही, यावर माझी श्रद्धा आहे. जगाच्या दृष्टीने वाईट असलेल्या माणसाच्या हृदयाचा एखादा तरी कोपरा चांगल्या गुणांनी ओतप्रोत भरलेला असतो. 



तर जगाने चांगले म्हणून गौरविलेली माणसंही वाईट काम करताना दिसतात. माझ्यापुरताच विचार केला तर मी ही गुण-दोषाचं मिश्रण आहे. काही दोष सुधारण्याचा मी प्रयत्न करतो. पण काही दोष लाख प्रयत्न केले तरी सुधारत नाहीत. पण जगाच्या दृष्टीने मी गुणवान आहे, हीच त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद