गुरु शिष्य परंपरा निबंध मराठी | Guru Shishya Parampara Nibandh Marathi

 गुरु शिष्य परंपरा निबंध मराठी | Guru Shishya Parampara Nibandh Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गुरु शिष्य परंपरा मराठी निबंध बघणार आहोत.  गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरू: साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।। गुरुंच्या ठायी साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाचं अधिष्ठान आहे. अशा गुरुंना माझा नमस्कार असो. असं शिकवणारी आपली भारतीय संस्कृती! 


आपली गुरूशिष्य परंपराही अतिप्राचीन व सुसंस्कृत आहे. गुरुशिष्य नाव उच्चारताच द्रोणाचार्य-अर्जुन, सांदिपनी ऋषी-कृष्ण, धौम्यऋषी-अरुणी, निवृत्तीनाथज्ञानेश्वर, समर्थ रामदास-कल्याणस्वामी अशा अनेक गुरुशिष्यांच्या जोड्या ठळकपणे डोळ्यासमोर येतात. 


गुरुवरील श्रद्धा व भक्ती शिष्याला उत्तमातील उत्तम धनुर्धर बनवू शकते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकलव्य! गुरुच्या इच्छेसाठी स्वत:चा अंगठा क्षणार्धात काढून देणारा एकलव्य एकमेवाद्वितीयच. मांडीवर डोके ठेवून झोपलेल्या गुरुंची झोपमोड होऊ नये, म्हणून भुंग्याने मांडी फोडली तरी तसूभरही मांडी न हलवणारा सोशीक कर्ण जगावेगळाच. 


भारतात प्राचीनकाळी गुरुकुल पद्धतीने विद्याध्ययन केले जाई. विद्यार्जनासाठी योग्य वयात मुलांना गुरुगृही जावे लागे. शस्त्र, शास्त्र, युद्ध, राजकारण, समाजकारण, धर्म, अर्थ, भाषा, व्याकरण, गणित, संस्कृती ह्यांचे शिक्षण गुरुंच्या आश्रमात मिळे व विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होई. 


त्याचे पालनपोषण स्वत: गुरुमाता प्रेमाने करी. शीलवर्धन व चारित्र्यनिर्मिती हे शिक्षणाचे ध्येय होते. गुरू हे शिष्याला सर्वांगीण मदत करीत. 


गुरू सदा उपदेश करी, संकटसमयी उपायही सुचवी। 

चिंतित फळ देऊनिया, कल्पतरूपरि मनोरथां पुरवी ॥


गुरू हा जीवनपथाचा मार्गदर्शक असतो, शिष्याला योग्य स्थळी, हाताला धरून पोचवणारा, अशा गुरुंची कृतज्ञता मानताना संत तुकाराम महाराज म्हणतात, हाती धरूनिया पावविले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे। खरंच गुरुला शिष्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान असे.


एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असे, असे म्हणण्यापेक्षा ते एकमेकांपासून वेगळे नव्हतेच. गुरुंना ज्ञानाचा विशाल व सखोल डोह संबोधले, तर शिष्य हा त्यावरील तरंगच! डोहापासून तरंग कधी वेगळा झालाय? विनोबा भावे म्हणतात, 'चांगला शिक्षक किंवा गुरू कोण? तर जो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला पुरतो तो. जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर विद्यार्थ्याने आपला शिक्षक आठवावा. 


हक्कानं, विश्वासानं गुरुच त्याच्या पाठीशी उभा ठाकतो.' शिष्याचे जीवन प्रवाही, जिवंत व निर्मितीशील करणारी व्यक्ती म्हणजे गुरूच! ध्यानमूलं

गुरू:मूर्ती

गुरूपदम् मंत्रमूलं

गुरू:वाक्यम् मोक्षमूलं

गुरूकृपा! 

नंतर दिवस बदलले, काळ बदलला. बदलत्या काळानुसार हल्ली गुरुची म्हणजे शिक्षकांची भूमिका बदलत चालली आहे. विभक्त कुटुंबे, प्रतिष्ठेच्या अवास्तव कल्पना, संस्कारांचा हास, पाश्चिमात्यांचे अनुकरण, जीवघेणी स्पर्धा, नेतृत्वहीन समाज, चुकीच्या शिक्षणपद्धती, प्रामाणिक मार्गदर्शनाचा अभाव यांमुळे विद्यार्थी थोडासा दिशाहीन होत चाललाय. विद्यार्थ्यांचा नितांत विश्वास शिक्षकांवर असतो, 


त्यामुळेच खरंतर शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. अध्यापन करताना मुलांमधील गुणांचे वर्धापन व दोषांचे निराकरण करणं गुरुचं कर्तव्य आहे. पंडित नेहरू म्हणत, "नवे राष्ट्र घडवायचे असेल, तर नवीन मानवमूर्ती घडली पाहिजे." मानव घडतो तो स्वत:च्या घरापासूनच. 


आई ही त्याची पहिला गुरू असते. तिने हा विडा उचलला पाहिजे सुमानवाची मूर्ती घडविण्याचा. मग जबाबदारी येते प्राथमिक शिक्षकावर व नंतर विद्यालये, महाविद्यालयीन गुरुजनांवर. त्या त्या वयोगटात विद्यार्थ्यांत असलेले सुप्त गुण बाहेर काढून परिपूर्ण सुंदर शिष्य घडवून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. 


त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव करून देण्याचे काम शिक्षकांनी केले की, देशाची प्रगती होण्यासही वेळ लागणार नाही. जसे संचयित पाण्याला स्वत:चे सामर्थ्य कळते, जेव्हा ते उंचावरून टाकल्यावर त्यातून वीजनिर्मिती होते. संकुचित वृत्तीचा त्याग करून विशालतेकडे झेप घेण्याचे, डोळसपणे जग पाहण्याचे, माणसाकडे माणूस म्हणून पाहावयास शिकवण्याचे शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. म्हणजे संगणकावरून


देशविदेशी राहणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करणारा, इंटरनेटच्या माध्यमातून विश्व आपल्या मुठीत धारण करणारा माणूस शेजारी राहणाऱ्या माणसापासून दुरावणार नाही. मोबाईलवरून कुठल्याही क्षणी, कुठल्याही माणसाच्या कानात बोलताना तो त्याच्या हृदयापासून लांब जाणार नाही. 


विद्यार्थी हे गुरुंचे बऱ्याचवेळा अनुकरण करतात. ते त्यांचे आदर्श व आदरस्थानही असतात. म्हणूनच गुरू नेहमी सदाचरणी, जीवनाची मूल्ये आत्मसात करणाराच असावा. शिस्त, स्वावलंबन, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री-पुरुष समानता ही मुख्य तत्त्वे मनावर बिंबवणारा असावा. कर्तव्यदक्ष, शांत निर्भय शिक्षकच आपल्या वर्तनातून, कृतीतून विद्यार्थ्यांच्या जोपासनेत सहाय्यकारक होतो. 


मार, धाकदपटशा, जरब दाखवून विद्यार्थी सुसंस्कृत व संस्कारक्षम होत नाहीत. हल्ली तर वर्तमानपत्रांतल्या 'शिक्षकांकडून विद्यार्थिनीवर अतिप्रसंग', 'शिक्षकांच्या जबर मारामुळे विद्यार्थी अत्यवस्थ' अशा बातम्या वाचून गुरू-शिष्य नात्यावरचा, परंपरेवरच विश्वास उडतो.


सध्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार 'स्पेशलाइज्ड गुरू ही उपलब्ध असतात. ठरलेल्या किमतीत त्याचे विषय पुरे करून त्यावर परीक्षा घेणे, हे त्यांचे पॅकेज' ठरलेले असते. वैयक्तिक शिकवणीसाठी ठराविक रक्कम घेऊन घरीदेखील मार्गदर्शनासाठी येतात. 


अशा प्रकारे आदर्शवादाकडून उपयुक्ततावादाकडे येताना अध्यापनाचे व्यावसायिकरण झालेय. शिष्यही फीच्या मोबदल्यात मिळणारा मोबदला मोजण्यात तरबेज आहेत. हल्ली 'गुरू' या संकल्पनेच्या कक्षा रुंदावल्यात. विद्यार्थ्यांना इंटरनेटवरून 'ई-गुरू' वा 'ई-गुरुकुल' मधून ऑनलाइन लेक्चर्सचा लाभ घेता येतो. 


एकाच वेळी अगणित शिष्य, या माध्यमातून शिक्षित करता येतात. या कक्षेत जरी, अध्यात्मिक गुरू, स्पिरीच्युअल गुरू, मॅनेजमेंट गुरू, इन्व्हेंस्टमेंट गुरू इत्यादि समाविष्ट होतात तरी, संगीत, नृत्य संशोधन या क्षेत्रात अजूनही गुरुमहिमा मानणारे पूर्वसूरीच्या ऋणात राहणारे शिष्यगण आहेत जे कृतज्ञतेने आजही म्हणतात.


ऐश्वर्यबलधनादिक सौख्ये प्रसवे समस्त जी काही ती विद्या 'जो' देई, तेणे वद काय ते दिले नाही? मानवी गुरुप्रमाणे निसर्ग ग्रंथ, स्वानुभव, पर्यटन हेही श्रेष्ठगुरुंच आहेत. कुठलाही हेवा-देवा, जातिभेद, भेदभाव मनी न आणता शिकवणारे! गुरुपौर्णिमा 


हा तर गुरू-शिष्य विश्वातला मोठा सण! आषाढी पौर्णिमेला हा साजरा करतात. अज्ञानाचा अंध:कार दूर करणाऱ्या गुरुंचं स्मरण करण्याचा दिवस. भगवान व्यास हे आपले आद्यगुरू असल्यामुळे या शुभदिनी त्यांना प्रथम वंदन केले जाते. 


व्यासशक्तीच्या कृपेने आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची व्याप्ती' म्हणजेच व्यास' वाढवत जाणे आणि आपला सर्वांगीण विकास साधणे हा व्यासपूजेमागील प्रमुख हेतू होय. हरिहर आदिक जगमे पूज्य देव जो कोय सद्गुरू की पूजा किये सबकी पूजा होय! असं म्हटलंच आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद