शेतकऱ्याचे ग्रामीण जीवनातील स्थान | shekaryache gramin jivanatil sathan marathi nibandh

  शेतकऱ्याचे ग्रामीण जीवनातील स्थान | shekaryache gramin jivanatil sathan marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शेतकऱ्याचे ग्रामीण जीवनातील स्थान या विषयावर माहिती बघणार आहोत. तीस वर्षांपूर्वी पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले, तेव्हा त्यावेळचे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा दिली- 'जय जवान, जय किसान !' संरक्षणाची आघाडी जवान संभाळतात, पण त्या जवानांनाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला पोसण्याचे काम कोण करतो ? किसान ! अन्नधान्याची आघाडी शेतकरी सांभाळतात.


भारतीय लोकसंख्या सध्या सुमारे ९० कोटी आहे. त्यापैकी तीन चतुर्थांश जनता खेड्यात आहे. हजारो मैल पसरलेल्या खेड्यांतून शेतकरी राहतात, जमीन कसतात आणि घाम गाळून अन्नधान्य पिकवितात.


पन्नास वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी 'खेड्याकडे चला' अशी हाक दिली होती. त्यावेळच्या आणि सध्याच्या खेड्यांत बराच बदल झाला आहे. हल्ली भारतातल्या पुष्कळशा खेड्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा झाल्या आहेत. पुष्कळशा खेड्यांत वीज पोहोचली आहे. घराघरांतून दिवे झगमगत आहेत. 


काही शेतांवर किंवा बागांमध्ये विजेच्या मोटारी बसवून त्याच्या सहाय्याने साऱ्या शेतीला पाणी पुरविले जात आहे. नलिका विहिरी कित्येक ठिकाणी खोदलेल्या आहेत. काही ठिकाणी नदीला बांध घालून पाटाचे पाणी खेळविले आहे. वाहतुकीच्या, दळणवळणाच्या सोयी आता बऱ्याच वाढल्या आहेत. बऱ्याच प्रमाणात कृषिक्रांती होत आहे.


याचा परिणाम असा की अन्नधान्याच्या बाबतीत भारत बहुतांशाने स्वयंपूर्ण झाला आहे. वीस वर्षांपूर्वी भारताला परदेशातून गहूच नव्हे तर तांदूळही मोठ्या प्रमाणात मागवावा लागे. आता परदेशातून सहसा धान्य मागवावे लागत नाही. 'साखर' तर आपण परदेशात निर्यात करतो. 


कापूस उत्पादनातदेखील वेगवेगळी उद्दिष्टे गाठली जात आहेत. कांदा, बटाटा आणि अन्य भाजीपालासुद्धा भारतात फार मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. एक वर्ष दुष्काळ पडला तरी भारतात त्या वर्षी सर्वाना पुरेल एवढा धान्य साठा तयार आहे असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.


खेड्यातून होणाऱ्या या कृषि-उत्पन्नावरच आज भारतातील जनतेचा योगक्षेम होतो आहे. आणि या कृषि-उत्पन्नाचा निर्माता आहे शेतकरी. खेड्यांत शेतावर राबणारा शेतकरी, त्याचे स्थान ग्रामीण जीवनात फार मोठे आहे. पण दुर्दैव असे की तिथेही शेतकऱ्याला स्वतःला उपासमार सहन करावी लागत आहे. 


काही शेतकरी पैशाच्या पाठबळावर आधुनिक कृषितंत्राचा, साधन-सामग्रीचा लाभ उठवून धनाढ्य श्रीमंत शेतमालक बनले आहेत तर आर्थिक दुर्बलता आणि अधुरी शेती व आधुनिक साधनसामग्री वापरण्याची असमर्थता यामुळे हजारो शेतकरी केवळ शेतमजूर राहिलेले आहेत. ते कृषिउत्पादन करतात पण वर्षभर पुरेल एवढे धान्य त्यांच्या घरी नाही...


शिवाय छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाला चांगला बाजारभावही मिळत नाही. मुंबईत दोन रुपये किलो विकल्या जाणाऱ्या कांद्याचे शेतकऱ्याला चार आणेसुद्धा मिळत नाहीत. मधला सगळा फायदा दलाल लोक खाऊन जातात. मग सरकारतर्फे ज्वारी, बाजरी, कांदा वगैरे शेतमाल खरेदी व्हावा, सरकारने चांगला भाव देऊन खरेदी करावा, अशा मागण्या सुरू होतात.


तसेच उसाला व साखरेला भाव जास्त मिळतो, म्हणून बरेच शेतकरी ज्वारी, गहू वा इतर धान्ये पिकविण्याऐवजी ऊस पिकविण्याच्या मागे लागतात. सगळेच ऊस पिकवू लागले तर भारतातील जनतेला अन्नधान्य कोण पुरवील?म्हणूनच केवळ ग्रामसुधारणा घडून उपयोगी नाही. 


ग्रामीण जीवनातील शेतकऱ्याचे मोलाचे स्थान लक्षात घेऊन त्याला कृषि-उत्पादनात उत्साह वाटेल, सहकार्य लाभेल, त्याच्या उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळेल असे पाहिले पाहिजे. यात सर्वांचेच हित आहे. उत्पादनांचा तपशील आकडेवारीने येथे देता येईल.


(३) शेतमालक व शेतमजूर असा पडणारा फरक लक्षात द्या. (४) 'बाजारपेठ' शेतकऱ्यांच्या जीवनात किती महत्त्वाची असते हे लक्षात घ्या. मित्रांनो तुम्‍हाला हा लेख कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद .