कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

my pet cat essay in marathi  | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या घरी मनीमाऊ नावाची छोटीशी गोंडस मांजर आहे या निबंधाच्‍या मदतीने आज  आपण तिच्‍याबद्दलच माहीती करून घेऊया  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


my-pet-cat-essay-in-marathi
my-pet-cat-essay-in-marathi



पशू-पक्षी, मनुष्याचे जीवन साथी आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढीपासून आपणांस दूध मिळते. कुत्रे आपल्या शेताची आणि घराची राखण करतात. पोपट, कबुतर, ससे, मांजर, पाळल्याने आपल्याला आनंद मिळतो. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार लोक पशू पक्षी पाळतात. माझ्या बऱ्याच मित्रांजवळ कोणता ना कोणता पाळीव प्राणी आहे.


मी पण एक छोटीशी सुंदर मांजर पाळली आहे. आम्‍ही लाडाने तिला  मनीमाऊ म्‍हणतो तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. आम्ही सगळे तिला 'मनीमाऊ' म्हणतो. मनीमाऊ म्हणून हाक मारताच ती धावत माझ्याजवळ येऊन बसते. मी तीला रोज दूध, ब्रेड, बिस्किट खाऊ घालतो. साबण लावून तिला आंघोळ घालतो. 


माझी मनीमाऊ मांजर पूर्णपणे शाकाहारी आहे. ती आज्ञाधारक आहे. घरात अजिबात घाण करीत नाही. त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन जातो. संध्याकाळी तिला घेऊन मी बागेत फिरावयास जातो. तिथे मी तिच्याबरोबर खेळतो, धावतो तेव्हा ती शेपटी फुगवून म्याऊँ-म्याऊँ करून आपला आनंद व्यक्त करते.


मनीमाऊ घरात मुक्तपणे फिरते. परंतु खाण्याचे पदार्थ खराब करीत नाही. दारावरची घंटी वाजली की तिचे कान उभे राहतात. मग लगेच ती दाराकडे धावत जाते. जणु  आमचे स्वागतच करते. कधी-कधी ती एखादा उंदीर पकडून बाहेर पळून जाते. कुत्रा मांजरीचा शत्रू असतो. पण तीच कुत्र्यावर धावून जाते. थंडीच्या दिवसांत ती  गच्चीवर जाऊन उन्हात बसते. उन्हाळ्यात सोफ्याखाली नाही तर पलंगाखाली जाऊन बसते. मनीमाऊ मला खूप आवडते. मी कुठे बाहेर गेलो तर मला तिची खूप आठवण येते.


मित्रांनो my favourite animal cat in marathi  तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व तुमच्‍या घरी कोणताही पाळीव प्राणी असल्‍यास त्‍याचे नाव  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my pet cat essay in marathi | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

 jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये मानवाने स्‍वताची प्रगती करण्‍यासाठी कश्‍याप्रकारे जंगलतोड करून पर्यावरणाची हानी केली आहे व याचे कोणकोणते विपरीत परीणाम होत आहेत याबद्दल सविस्‍तर निबंध दिला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh
jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh



निसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की, मुंगीपासून गरुडापर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवनयात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात; पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरली आहे. जंगलात लागणारा वणवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. पण काही वेळेला माणसाच्या हलगर्जीपणामुळेही जंगलात आगी लागतात आणि अफाट जंगलसंपत्ती नष्ट होते.माणसाने जास्तीत जास्त जंगलसंपत्ती नष्ट केली आहे. जंगले तोडून माणसाने नगरे वसवली. त्या नगरांतील आपल्या घरांसाठी, घरे सजवण्यासाठी माणसाने वारेमाप झाडे तोडली.


आज भारतातील जंगलांचा झपाट्याने होणारा नाश ही चिंतेची बाब ठरली आहे. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे मातीची धूप व पुराचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक भूप्रदेश ओसाड बनले आहेत. पर्जन्याचे प्रमाण कमी झाले आहे. पर्यावरणाच्या संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे.


लाकडाचा उपयोग कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो. यासाठीही अनेक जंगले तोडली जातात. जंगलतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वन उत्पादनामध्ये लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, विविध प्रकारचे गवत, रेशीम, वेत, बांबू इत्यादी असंख्य वस्तूंचा समावेश होतो. वनातील वृक्षावरील एक प्रकारच्या किड्यापासून लाख मिळते. 


बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधासाठी उपयोगी असते. शेतकऱ्यांची अवजारे, क्रीडासाहित्य, काडेपेटीतील काड्या यांसाठी ही जंगलतोड होते. जंगलनाशाबरोबर जंगलातील प्राणी-पक्षीही कमी होत आहेत. वाघ व मोर यांची हौसेखातर प्रचंड हत्या होते, हे थांबायला हवे आहे. वृक्ष-संरक्षण कायदा केला गेला आहे. पण सर्व गोष्टी केवळ कायदयाने होत नाहीत. त्यासाठी सर्वसामान्य जनतेचे त्याला हार्दिक व विधायक सहकार्य हवे. 


जंगले नष्ट झाली की तेथील आदिवासींचेही प्रश्न उभे राहतात. 'मेळघाट प्रकल्प'सारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि वनाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. नाहीतर पुढील काळात एखादया भल्यामोठ्या ओसाड जागेवर पाटी लावावी लागेल - 'येथे जंगल होते.' 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जंगलतोड थांबवण्‍यासाठी कोणते उपाय केले पाहीजेत  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड एक समस्या मराठी निंबध

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता कवी मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्ये आपण कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली आहे. त्या पुढील निबंधात तुकाराम महाराज यांच्याबद्दल निबंध सादर केला आहे  तर मग सुरूवात करूया निबंधाला


 मुद्दे : 


  • अनेक लेखक आवडीचे 
  • त्यांपैकी एक - वैशिष्ट्ये 
  • इतर समकालीन लेखकांची तुलना
  • त्यांनी लिहिलेले विविध साहित्य
  • विविध साहित्यांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्ये किंवा पंक्ती
  • एखादे विशेष पुस्तक - का आवडते त्याचे कारण
  • व्यक्तिरेखा - व्यक्ती व साहित्यिक म्हणून त्यांच्याविषयी वाटणारा आदर


विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी तर होतेच त्याचप्रमाणे नाटककार,  कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते. पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातला कवीच! मग 'नटसम्राट' नाटकातील बेलवलकर असो, 'कौन्तेया'तील कर्ण असो वा 'स्वप्नांचा सौदागर' या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो; या सर्वांतून कुसुमाग्रजांचा काव्यात्म पिंड कधीच लपून राहत नाही.

maza-avadta-kavi-marathi-nibandh
maza-avadta-kavi-marathi-nibandh



'जीवनलहरी' हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 'विशाखा', 'किनारा', 'मराठी माती', 'स्वगत', 'हिमरेषा', 'वादळवेल', 'छंदोमयी' अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.


कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी अगदी सामान्य रसिकांनाही आवडली आहे. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः समिधा' म्हणतात -



समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा 

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.


या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतूही स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम' आगगाडी आणि तिच्याखाली चिरडली जाणारी जमीन यांमधील असतो; तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांच्यातील असतो.



कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. मग ती कधी 'पृथ्वीचे प्रेमगीत' गाऊ लागते; तर कधी 'अहि-नकुलाच्या' रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात त्यांचे मन म्हणते, "ते होते जीवित अन् हा जीवितभास.' कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.


असा हा 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेता माझा आवडता कवी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.

निबंध 2

majha avadta kavi essay in marathi 


भागवत धर्माचा प्रसार करणारे एकनाथ समाधिस्थ झाले व तुकारामांच्या रूपाने भक्तीचा अधिकच तेजस्वी तारा उदयास आला. तुकाराम महाराज साधे वाणी, अडाणी, मराठा कुलात जन्मले. त्यांच्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा होती. लहानपणीच त्यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली होती व ती ते यशस्वीपणे पार पाडत होते. लहान वयातच त्यांचे लग्नही झाले होते. परंतु अचानक पडलेल्या दुष्काळच्या तडाख्याने ते हवालदिल झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली.


संसाराच्या काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाल्यावर त्यांच्या मनाला परमार्थाची ओढ लागली. मग मन परमार्थात रम लागले. मग असे वाटू लागले बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळे पीडा केली। समाजापासून, संसारापासून दूर डोंगरावर जाऊन त्यांनी भक्तीचा साधना केली. बाबाजी चैतन्य या गुरूंपासून ‘रामकृष्ण हरी' या मंत्राचा त्यांना लाभ झाला.

शिवाजीमहाराज त्यांच्या कीर्तनाला गेले होते. त्यांनी तुकारामांना नजराणा पाठवला होता. तुकारामांनी तो नाकारला. या 'वैभवाच्या धन्याला' समाजकंटकांकडून खूप त्रास भोगावा लागला होता. परंतु त्यांनी या दांभिकांवर शब्दाचा आसूड मारला होता. संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणलं म्हणून पंडितांचा राग. म्हणून रामेश्वरभटाने त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. पांडुरंगाने अभंग तारले.


सर्वसामान्य माणसांना तुकारामांविषयी जिव्हाळा वाटत असे. त्यांच्या कीर्तनाला त्याची खूप गर्दी होत असे. आपल्यासारखाच चुकणारा, विव्हळणारा जीव आता शांती-सुख-आनंदात डुंबत आहे, तुकाराम ज्या पायऱ्या चढून उंच मोकळ्या जागी, स्वच्छ मोकळ्या वातावरणात जाऊन बसले होते, तेथे आपण जावे असे त्यांना वाटे.


संत तुकारामांचे जीवन म्हणजे 'गरुडाचे उड्डाण.' त्यांच्या झेपेकडे पाहून माणूस अवाक् होतो. त्यांच्याबद्दल त्याला विस्मय वाटतो. परंतु साध्या, सोप्या, सरळ भाषेत त्यांनी पिटलेल्या भक्तीच्या डांगोयानं तो तुकारामांचा नकळत अनुयायी बनतो

खरोखर हे कवी तुकाराम ‘आकाशाएवढे' होते. भागवत धर्ममंदिराचा कळस होते. मराठी सारस्वताचे शिखर होते. त्यांच्या अभंगातील आर्तता, खंबीरपणा, निस्सीम भक्ती, मनातील संघर्ष, आध्यत्मिक उंची माझ्या मनाचा ठाव सोडत नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3



माझा आवडता कवी - बालकवी

बालपणी शाळेत शिकत असताना मनावर मोहिनी घालणाऱ्या विविध कवींच्या ज्या कविता बालकांच्या जिभेवर नाचत असतात, त्यात बालकवींच्या दहा-बारा निसर्ग-कवितांचा अग्रक्रम लागतो. बालपणी मनावर मोहिनी पडते ती त्या ओळीत जाणवणाऱ्या नादमयतेची आणि तालाची १९९० हे वर्ष बालकवींचे जन्मशताब्दीचे वर्ष म्हणून साजरे झाले उत्कृष्ट आत्मनिष्ठ कविता लिहिणारे श्रेष्ठ कवी म्हणजे बालकवी.

 बालकवींनी निसर्ग कविता समृद्ध केली. त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० या दिवशी खानदेशातील धरणगाव या गावी झाला. बालकवींवर शालेय जीवनातच घरी भक्ती,काव्य,रसिकता यांचे आई व आजीकडून संस्कार झाले परतुका गोडी त्यांना थोरली बहीण जिजी हिने लावली नाशिकच्या दूधभांडे शास्त्र्यांनी त्यांना कालिदास,भवभूती यांच्या काम परिचय करून दिला. 

तसेच रामायण, महाभारत, शांकरभाष्य यांचेही ज्ञान करून दिले. जुन्या काळी संस्कृतचा विषयाचा अभ्यास ज्या कवींनी केला होता, त्यांच्या मराठी काव्याला एक वेगळे, नवे, देखणे, काव्यात्मक, रंगतदार रूप कसे प्राप्त होते ते पहावयाचे असल्यास आपण बालकवींच्या कवितांचे पुर्नवालोकन करावयास हवे. 


बालकवींनी बागेचे वर्णन करणारी पहिली कविता १९०३ साली लिहिली आणि २८ वर्षांचे आयुष्य निसर्गकवी या बिरुदाने मिरवावे अशा दर्जाची नवी निसर्गकविता त्यांनी मराठी भाषेला दिली केशवसुत, गोविंदाग्रज विनायक आणि रे. टिळक यांच्या काळात बालकवी आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या कविता लिहीत होते त्यात प्रेमकविता, उदास व काव्यात्मक वृत्तीच्या कविता आहेत आणि समृद्ध निसर्गाचे मानवीरूप प्रत्ययाला आणून देणाऱ्या कविताही आहेत निसर्गाशी बालकवींचे बालपणीच नाते जडले. 


केशवसुतांनी जी एक असांकेतिक, बंधनरहीत, काव्यात्मक अशी नवी कविता लिहिली तिचा संस्कार बालकवींवर झाला एवढेच त्यांचे केशवसुतांच्या कवितेशी नाते सांगता येते रेव्ह. टिळकांच्या कवितांतील भक्तिपणाचाही थोडाफार संस्कार बालकवींच्या समृद्ध निसर्गकवितांत जाणवतो. पण त्यापेक्षा अधिक त्यांनी कोणाकडूनही काही संस्कार घेतले आहेत असे म्हणता येत नाही १९१० सालीच जळगाव येथील कविसंमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सन्मान झाला होता -बालकवी म्हणून आधुनिक मराठीतील खरे स्वयंभू कवी असे बालकवींना म्हणायला काहीच हरकत नाही. 


कविता हे केवळ पद्यच नसते, काव्यात्म मनोवृत्तीची ती प्रतिमामय आविष्कृती असते हे आपल्याला बालकवींच्या कवितांवरूनच म्हणता येते. "भिंत खचली उलथून खांब गेला जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा तिच्या कोलारी बसुनि पारवा तो खिन्न निरस एकान्त गीत गातो" या ओळी वाचताना आपल्या डोळ्यासमोर पारवा तर उभा राहतोच त्याचबरोबर बालकवींची कविता गाणारी खिन्न मूर्तीही डोळ्यासमोर उभी राहते. "झाकाळुनी जल गोड कालिमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर' या ओळी वाचल्यावरही अवतीभवतीचे सुंदर निसर्गदृश्य पाहत औदुंबरच जलात उतरला आहे असे वाटते बालकवींचे व्यक्तित्व हे बालसुलभवृत्तीचे होते. 


सृष्टीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बालसुलभ होती. फुलराणीच्या या ओळीतच पहा, "हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती" 'श्रावणमास' या कवितेत ते म्हणतात - "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे" 'पाऊस' या कवितेतील पुढील ओळी 
- "थबथबली ओथंबून खाली आली जलदारी मज दिसली सायंकाळी" 
'अरुण' या कवितेतील - 

"पूर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची कुणी उधळली मूठ नभी ही लाल गुलालाची"

 या ओळी पहा किती विविध दृश्य आहेत ही 
 "ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई, पाहीन गडे त्या हिरव्या हिरव्या राई त्या विमल जलासह वळणे वळणे घेत हिंडून झऱ्याच्या शीतल कुंजवनात"

 "फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा वरुनी कुणी गुलजारी फिरविला हात कुसुंब्याचा" 

अशा शेकडो निसर्गदृश्ये बालकवींच्या कवितांत विखुरली आहेत फुलराणी ,अरुण,संध्यारजनी,श्रावणास मेघांचा कापूस इ.सर्वच कवितेतील निसर्ग बालकवींनी आपल्या बालपणीच्या मुग्ध शैशवी डोळ्यांनी पाहिलेला वा पंचेंद्रियांनी अनुभवला होता त्यामुळे बालकवींची निसर्गकविता म्हणजे मानवी भावनांच्या आविष्काराचा सुंदर आरसा झाला आहे शब्द,स्पर्श,रूप,रस,गंध या पंचेंद्रियांच्या पाच अनुभूती व गती ही सहावी जाणीव त्यांच्या सर्व कवितात त्यांच्या कवितेतील "औदुंबर जलात पाय टाकून अवतीभवतीचे दृश्य शांतपणे न्याहाळतो आहे निसर्ग सर्वत्र क्रीडाच करतो आहे. 


त्या कवितेतील नाद,ताल वता चार अप्रातम मिश्रण जगातल्या कुठल्या दुसऱ्या भाषेत असू शकेल काय ? असा विचार मनात येतो व भाषत नसणारा एक नवाच शब्द फुलराणी हा मराठीत रुजला व फुलराणीचा विवाह ही घटनासुद्धा जगाच्या वाङ्मयात अमर झाली. "कुणी नाही ग कुणी नाही आम्हांला पाहत बाई शांती दाटली चोहीकडे या ग आता पुढेपुढे लाजत लाजत हळुच हासत खेळ गडे खेळू काही कोणीही पाहात नाही' या ओळीत कोणाचे वर्णन आहे? 


अंगणात खेळणाऱ्या लहान मुलींचे की आकाशात रात्री चमचमणाऱ्या चांदण्यांचे? बालकवींनी मराठी निसर्गकवितेला ही देणगी दिलेली आहे त्यांनी आपल्या तरल मनाच्या भावावस्था निसर्गातील विविध रूपांतून अनुभवत्या सौंदर्यग्रहणाची अतिशय कोमल व तरल शक्ती बालकवींच्या मनात होती तसा त्यांचा ध्यास होता. 

"
सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबनि घ्यावे चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे प्रीतिसारिका गीत तियेचे ऐकावे कानी बनवावे मग धुंद रंगुनी काव्यसुधा पानी" 

आणि हा ध्यास असणाऱ्या कवीच्या मनाला दुसरी पण बाजू होती त्यांच्या मनाचा पारवा कधीकधी कोलावर बसून खिन्न निरस एकांत गीत गातो एखाद्यावेळी तो म्हणतोच "कोठुनी येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतहृदयाला" "आनंदी आनंद गडे म्हणता म्हणता बालकवींच्या शून्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमते गीत" अशाप्रकारे आनंदाच्या व दुःखाच्या अनेक परी वर्णन करून गाणारा बालविहग बालकवी अपघातात मृत्यू पावतो नि मराठी माणसाच्या मनात निसर्ग प्रेमाचे अमररूप घेतो.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 4

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध



तुलसीदास गोस्वामी तुलसीदास माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सर्व साहित्यकृती मला आवडतात. परंतु मला सर्वात जास्त त्यांचे 'रामचरित मानस' आवडते. त्यातील कित्येक दोहे आणि चौपदया मला तोंडपाठ आहेत. ते गाताना, गुणगुणताना मला आनंद होतो. ते मला मार्गदर्शन करतात. 


दु:ख संकटात निकटच्या मित्राप्रमाणे मला साथ देतात. त्यातील शिकवण आणि उपदेश यांच्याबरोबर जो संगीताचा वापर केलेला आहे तो वर्णन करणे शब्दापली- कडचे आहे. 'रामचरित मानस' रामकथा आणि रामचरित्रावर आधारित अतुलनीय एक महाकाव्य आहे. 


मागील कित्येक शतकांपासून याचा भारतीयांवर गाढ प्रभाव आहे. सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री-पुरुष सर्व जातीधर्मांचे व वर्गाचे लोक यापासून प्रेरणा, सामाजिक मर्यादा व नैतिकतेचे धडे घेतात. त्यातील आदर्शाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. 


भारतातील धर्मप्रवण जनतेत हे महाकाव्य एका अद्वितीय दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणास्त्रोत्राच्या रूपात ओळखले जाते. त्याची लोकप्रियता आणि व्यापक प्रभावाची अनेक कारणे आहेत. हा ग्रंथ आज ही तितकाच महत्त्वपूर्ण व प्रासंगिक आहे जितका तो त्याच्या रचनेच्या वेळी होता.

तुलसीदास एक महान लोकनायक होते. त्यांनी लोकहितासाठी आणि जनकल्याणसाठी 'रामचरित मानस' ची रचना केली होती. त्यांच्या अन्य साहित्यकृतीतही लोकसंग्रहाचा भाग मुख्य आहे. खंडन-मंडनाच्या प्रवृत्तीपासून दूर राहून या महान कवीने लोकधर्म, सहजभक्ती समन्वय आणि आदर्शाचा एक अद्वितीय संगम प्रस्तुत केला आहे. 


या घोर कळीकाळात मनुष्य रामाची समर्पण भावाने भक्ती करून या भवसागराला सहज पार करू शकतो.
सगुण भक्ती, ज्ञान आणि समन्वययाच्या दृष्टीने 'रामचरितमानस' अतुलनीय आहे. त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याच अशा प्रकारच्या ग्रंथाशी करता येत नाही. 


जीवनात ज्या आदर्शाची कल्पना तुम्ही करू शकता ती यात आहे. राम आदर्श पुत्र, पती, राजा, मित्र, धनी आहे. भरतामध्ये भावाच्या आदर्शाची पराकाष्ठा आहे. तर हनुमान सेवा, त्याग, तपश्चर्या आणि वीरतेची महान् मूर्ती आहे. सीता पत्नीचे अत्यंत सुंदर आणि श्रेष्ठ उदाहरण. आहे. 


भारतातील प्रत्येक स्त्रीची इच्छा सीतेप्रमाणे त्यागी, तपस्विनी, पतिव्रता, दृढव्रता, व्यवहार-कुशल, विनम्र आणि एकनिष्ठ होण्याची असते. लक्ष्मणाचा त्याग आणि तपश्चर्या अद्वितीय आहे. बंधू राम आणि मातृस्वरूप सीतेच्या सेवेसाठी त्याने सर्व राजविलासाचा त्याग केला, इतकेच नव्हे तर आपली नवविवाहित पत्नी ऊर्मिलेलाही त्याने अयोध्येलाच सोडले. 


सुग्रीव आणि केवट ही मित्रत्वाची अजोड उदाहरणे आहेत. तर दशरथ हे पुत्रप्रेमाचे. रामाचे राज्य एक आदर्श राज्य होते. गांधीजी भारतात याच रामराज्याच्या स्थापनेचे स्वप्न पाहत होते. कविश्रेष्ठ तुलसीदास म्हणतात जासुराज प्रिय प्रजा दुखारी सो नर प्रवसि नरक अधिकारी। 


आधुनिक राजकीय पुढारी, राजकारणी मुत्सद्यांनी यातून प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन घेऊन त्यानुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रामाने निर्वासित असूनही रावण, कुंभकर्ण, मेघनादासारख्या अतिबलवान, पराक्रमी आणि मायावी राक्षसांचा संहार करून जनतेला व ऋषिमुनींना भयमुक्त केले. राम हे, असीम. 



आत्मशक्ती, चारित्र्य आणि तपश्चर्येमुळेच प्राप्त झालेल्या सिद्धीचे साकार रूप होते. त्याच क्षमतांमुळे ते अंजिक्य ठरले आणि अनेक राक्षसांचा, दैत्यांचा, असुरांचा त्यांनी संहार केला. तरीही ते अत्यंत उदार विनम्र, सहिष्णु आणि मोठ्या मनाचे होते. 


स्वार्थ आणि अभिमान यांचा तर त्यांना स्पर्शही झाला नव्हता. वानर, निषाद, भिल्ल इत्यादी आदिवासी जमातींकडून मदत घेण्यात व त्यांच्याशी मैत्री करण्यात त्यांना यकिंचितही संकोच वाटला नाही. उलट रामाला त्यांचा अभिमान वाटला. जटायुसारख्या पक्ष्यालाही त्यांनी हृदयाशी धरले व आदरपूर्वक आपला मित्र बनविले. 


शबरीची बोरे खाऊन स्वत:ला धन्य मानले. शिळा झालेल्या अहिल्येचा त्यांनी उद्धार केला. सर्वाचेच हित त्यांनी केले. 'रामचरितमानस' समन्वयाचा एक विराट प्रयत्न आहे. यात सगुण-निर्गुण, शैव-विष्णु, भक्ती, ज्ञान, भक्ती-कर्म, गाहेस्थ-वैराग्य शासक आणि शासित इत्यादीचा समन्वय दिसून येतो. 


अवधी आणि ब्रज या भाषांमध्ये त्यांनी आपले लेखन केले. तुलसीदासाची कितीही स्तुती केली तरी ती कमीच आहे. माझ्याप्रमाणे अनेकांचा हा साहित्य भक्ती ग्रंथ आहे. संस्कृतीदर्शन, संगीत इत्यादी दृष्टिकोनातून रामचरितमानस एक अद्वितीय ग्रंथ आहे. ज्याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध

 Mahavidyalaya cha nirop ghetana marathi nibandh | महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध बघणार आहोत. आपल्‍या आयुष्‍यातील आपल्‍याला परत हवेहवेसे वाटणारे क्षण असतात. सर्वात सोनेरी क्षण असतात महाविद्यालयातील आणि ,महाविद्यालय म्‍हटले की सर्वाना आठवण झाल्‍याशिवाय राहत नाही ते म्‍हणजे  तेथे झालेल्‍या गंमती जमती, शिक्षकांनी आपल्‍या केलेल्‍या तक्रारी, आपण केलेली मौजमजा , हा काळ कोणीही विसरू शकत नाही .  कितीही सोनेरी असले प्रत्‍येक क्षण हा निघुन जात असतो आणि हा महाविद्यालयातील शेवटचा  क्षण असतो महाविद्यालयाचा निरोप समारंभाचा दिवस त्‍याच अनुशंगाने आपण सविस्‍तर निंबध लेखन करणार आहोत चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.


Mahavidyalaya-cha-nirop-ghetana-marathi-nibandh


नुकताच मी बँकेतुन संध्याकाळी घरी परतलो, तर घराच्या दारात एक माझा  महाविद्यालयातील मित्र माझी वाट पाहत उभा होता. तो पुण्याला एका नोकरीच्या संदर्भात इंटरव्ह्यु देण्यासाठी आला होता. त्‍यापुर्वी माझ्या आईने त्‍याचे  स्वागत, चहा-पाणी वगैरे केले होतेच. मीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिलो जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी भेटत होतो आम्ही. आमच्या गप्पा रंगल्या आणि एकदम त्यांनी त्यांच्या बॅगमधुन एक फोटो काढला. 


तो फोटो पाहुन मी एकदम भारावून गेलो. तो फोटो होता महाविद्यालयाच्‍या निरोप समारंभाच्या दिवसाचा. त्यामध्ये माझा मित्र आणि मी आम्हा दोघांचा सत्कार त्यावेळचे मा. शिक्षणसंचालक यांच्या हस्ते झाला होता. आम्ही दोघेही जवळजवळ समान गुण घेऊन गुणवत्ता यादीत तेरा आणि चौदा क्रमांकांनी उत्तीर्ण झालो होतो. तो फोटो पाहिला आणि त्या दिवसामध्ये एकाएकी हरवून गेलो.

 

ज्या महाविद्यालयात  मी शिकत होतो, त्या महाविद्यालयाचा 'निरोप समारंभ' माझ्या डोळ्यासमोरून जाऊ लागला. गेली ५ वर्षे  ते महाविद्यालय माझे आराध्य दैवत होते. माझा मित्र अन मी नेहमी पहिल्या पाच क्रमांकात येत होतो. चांगली चढाओढ होती आमची. ती शेवटपर्यंत गाजवली. अर्थातच विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष - ग्रंथालयाचा प्रमुख – क्रीडा प्रमुख  - सहलप्रमुख ही सगळी पदे आम्ही भूषवली होती. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आम्हांला चांगले ओळखत. 


सर्वजण 'सिनियर्स' म्हणून मान देत. स्पर्धा झाल्या. परीक्षा झाल्या आणि बघता बघता शैक्षणिक वर्ष कधी संपले हैं समजलेच नाही... परीक्षांचा रिझल्ट आला, तोही आमच्या दोघांच्या नावांनी मोठे यश घेऊन. निरोप आणि सत्कार समारंभाची सूचना फळ्यावर लावली गेली. आणि गेलेले सर्व दिवस शांत बसू देईनात. महाविद्यालयाच्‍या सहलीतील झालेल्‍या गमती जमती  , त्या वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथालयातील पुस्तके मिळविण्यासाठी धडपड, मित्रांशी झालेली भांडणे, त्या मारामाऱ्या. काही काही म्हणून डोळ्यासमोरून दूर होईना. मन भरून आले... नको, नको तो निरोप समारंभ असे वाटू लागले.


अखेरीस ती सकाळ उजाडली. ठीक १० वाजता महाविद्यालयाच्या हॉलमध्ये आम्ही सर्वजण जमलो. मी, माझा मित्र आणि काही विद्यार्थी स्टेजवर बसणार होतो. माननीय अध्यक्ष, मा. मुख्याध्यापक, इतर सर्व मा. अध्यापक मंडळी व्यासपीठावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. व्यासपीठावर उजव्या बाजूस बसण्याची खास व्यवस्था आमची केली होती. संकोच वाटत होता... तसा हा समारंभ सत्काराचा-आनंदाचा होता. परंतु एकप्रकारची हुरहुर त्यात होती. कारण 'निरोप' ही घ्यायचा होता. 


नेहमीचे उपक्रम झाल्यावर मा. मुख्याध्यापक बोलण्यास उभे राहिले, तुम्ही हुशार, बुद्धिमान विद्यार्थी, देशाचे भावी नागरिक आणि देशाचे भवितव्य घडविणारे. उद्या तुम्ही वैभवाच्या शिखरावर असाल, उच्च शिक्षण घेऊन परदेशी जाल. खूप मोठे व्हाल. पण बाळांनो, आपल्या देशाला विसरू नका... आपल्या महाविद्यालयाचे स्मरण ठेवा. जिथे प्रथम तुम्हांला अंकुर फुटले, छोटी छोटी पाने, फुले आली त्या जमिनीला विसरू नका.


आपले, आपल्या महाविद्यालयाचे, देशाचे नाव, उज्ज्वल करा. जीवनात सर्वजण यशस्वी होतातच असे नाही, पण अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्नशील रहा. आमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेत. त्यानंतर आमचा खरोखरीच धीर सुटत चालला होता. आम्ही सुन्न होऊन बसलो होतो. त्यानंतर एक एक शिक्षकही उठले आणि त्यांनी आम्हांला भरभरून आशीर्वाद दिले. 'महाविद्यालय ही यशाची खरी पायरी आहे, असे सांगून तुमच्या पाठीशी महाविद्यालय सदैव राहील' असे विचार व्यक्त केले. 

मा. शिक्षणाधिकाऱ्यांनी ही आमचे कौतुक केले. सर्वांकडून आम्हांला फुलांचे हार, गुच्छ, ग्रंथ असे पुरस्कार मिळत होते. आणि अखेरीस सत्कारास उत्तर देण्याची वेळ आली आणि सर्वांनी माझ्याकडे बोट दाखविले. सर्वांच्या वतीने मी बोलणार होतो. घसा दाटून आला होता. अनेक प्रसंग आठवत होते आणि त्याप्रसंगी वेळोवेळी शिक्षक मित्र आणि मुख्याध्यापकांनी दिलेला आधार आठवत होता, 'क्षमाशील वृत्तीनेच आज आम्ही इथे पोहोचलो,


सर्वांच्या आधाराने आज आम्ही यशस्वी झालो. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.' असे म्हणून दाटलेल्या कंठानेच आम्ही सर्वजण पुढे येऊन नतमस्तक झालो. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला आणि अश्रृंना वाट मिळाली. चहापान झाले पण कोणीच कोणाशी बोलत नव्हते... खिन्न मनाने आम्ही घरी परतलो. या प्रसंगाला किती वर्षे लोटली. आम्‍ही दोघे खूप खूप बोललो, हसलो आणि महाविद्यालयाच्या त्या हरवलेल्या क्षणांमध्‍ये परत जाण्याचा परत परत प्रयत्न करीत राहिलो.

मित्रांनो तुम्‍हाला college farewell essay in marathi हा निबंध कसा वाटला हे  व तुम्‍ही अनुभवलेला महाविद्यालयातील निरोप समारंभाचा दिवस कसा होता कमेंट करून सांगु शकता.  धन्‍यवाद

Mahavidyalaya cha nirop ghetana marathi nibandh | महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध

maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध 



समाजाच्या दु:खांशी नातं सांगणाऱ्यांना, शतकांची कुंपणं अडवत नाहीत. ते शब्द कुरवाळीत नाहीत अन् खाजगी व्यथाही गोंजारत नाहीत! सभोवतीच्या दुःखांना आव्हान देत येतात. या समाजातल्या दु:खभरल्या रात्री अन् अंधारलेली मने उजळून लख्ख करतात. अशी ही परमेश्वराप्रमाणे पूजनीय व्यक्तिमत्त्व म्हणजेच आपले समाजसुधारक होत. असाच एक वंदनीय समाजसुधारक मराठी मातीत जन्मलेला आहे, जो आज महाराष्ट्राचंच नव्हे तर जगाचं भूषण ठरला आहे आणि तो म्हणजे बाबा आमटे! मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं खरं नाव. 

maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi
maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi


२६ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणघाट येथे एका कर्मठ जमीनदाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९४९ मध्ये ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल डिसीझेस्' इथे त्यांनी महारोग्यांवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. १९५० मध्ये त्यांनी 'महारोगी सेवा समिती' स्थापन केली. बाबांना ज्या क्षणी 'क्षितीज नसलेले पंख' लाभले असल्याची जाणीव झाली, त्याच क्षणी नियतीने त्यांच्या पुढ्यात परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेसारखा, तो गटारात रूतलेला महारोगी आणून टाकला, त्याचक्षणी महारोग्याच्या शरीराच्या जखमा आधुनिक उपचारांनी बऱ्या करणे सोपे असले तरी त्याच्या मनाला झालेल्या जखमा पूर्णपणे भरून यायला त्याचा पुरुषार्थ जागृत केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले. हे काम करताना आलेल्या अनुभवांतून आणि झालेल्या चिंतनातून चंद्रपूर जिल्ह्यातील 'आनंदवना'चा जन्म झाला.

 उद्ध्वस्त मानवातून पराक्रमी व्यक्तित्व निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न पाहून परदेशातील जाणती मंडळी त्यांना मोठ्या आपुलकीने मदत करीत आहेत. आनंदवनासाठी सर्वप्रथम परदेशातून आलेली मदत नॉर्मा शिअर या अभिनेत्रीकडून होती! गांधीजींनी त्यांना अभय साधक' ही पदवी दिली. फक्त आनंदवनापाशीच ते थांबले नाहीत, तो त्यांचा मार्गावरचा एक टप्पा आहे. आज खलिस्तनवादी लोक 'भारत तोडो' म्हणत असतानाच त्यांनी देशाची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी 'भारत जोडो' ही पदयात्रा काढली. समाजसुधारणेचा त्यांचा आणखी एक सुंदर प्रयत्न म्हणजे 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम' ह्या त्यांच्या कविता! त्यांच्या एकांतसाधनेचं ते फलित आहे. 



आजच्या युवापिढीला मारलेली ती अमूर्त हाक आहे. आळस, दैववाद, असामाजिकता, अल्पसंतुष्टता व संवेदनहीनता यांनी ग्रासलेल्या मनांना उद्देशून सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीत बाबा म्हणाले, 'मन का कुष्ठ शरीर के कुष्ठसे अधिक भयंकर होता है।' हे जग व जीवन, फुलवण्याकरिता, उपभोग घेण्याकरिता आपल्याला दिले आहे, निसर्ग अनंत हस्तांनी आपणाला देऊ शकतो, पण त्याला संतुष्ट करण्याचे आव्हान भारतीयाने स्वीकारले पाहिजे, असा बाबांचा आग्रह आहे. यश यावे आणि या माझ्या आवडत्या समाजसुधारकाचे स्वप्न साकार व्हावे हीच माझ्यासारख्या त्यांच्या चाहतीची इच्छा ! म्हणून मला बाबांविषयी म्हणावंसं वाटतं 'जे का रंजले गांजले त्यांसि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि

 निबंध  2

तुकाराम महाराज म्हणतात,
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा' 
देवाची अशी सुंदर परिभाषा तुकाराम महाराजांनी केली. खरे म्हणजे देव ह्या पेक्षा वेगळा असूच शकत नाही. देव हा माणसात आहे मूर्तीत नाही हे तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार मला अशा प्रकारचे गुण असलेला महापुरुष आढळून आला ते म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
बी.ए.,बी.एससी.,डीएससी.,एम.ए.,पी.एच.डी. अशा अनेक पदव्या प्राप्त करुन ते उच्चविद्याविभुषीत झाले.


भरपुर संपत्ती कमावून आपल्या कुटूंबाचा फायदा करु शकले असते.परंतु समाजसेवेचे व्रत घेणा-या या महापुरुषाला संपत्ती कमविण्याचे ध्येय नव्हते.त्यांना वेड होत ते भारतीय समाजाला अंधारातुन प्रकाशाकडे नेण्याचे, अज्ञानातुन ज्ञानाकडे नेण्याचे,अधोगतीतुन प्रगतीकडे नेण्याचे. बुद्ध,कबीर व महात्मा फुले या महापुरुषांना त्यांनी आपले गुरु मानले.या तीनपैकी कुणाचाही त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला नाही किंवा ते समकालीन सुद्धा नव्हते परंतु त्यांचे विचार व कार्य डॉ.आंबेडकरांना अतिशय महत्वाचे वाटले.त्यामुळे वरिल तिन्ही महापुरुषांना त्यांनी आपल्या गुरुस्थानी मानले.



त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा प्रचंड आहे. प्रत्येक ग्रंथात अमूल्य विचार आहेत. २) ग्रंथ निर्मिती : शूद्रांना शतकानुशतके विद्या ग्रहण करण्यावर परंपरेने बंदी घातली होती त्यामुळे भारतीय बांधव आपला इतिहास विसरला. त्याला आपली ओळख राहिली नाही. तेंव्हा त्याला आपली ओळख व्हावी या उद्देशाने बाबासाहेबांनी त्यांच्या करिता “शुद्र पूर्वी कोण होत?' हा ग्रंथ लिहिला. 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अधोगती', 'रीडल्स इन हिंदूइझम'इ. प्रत्येक भारतीयाने वाचावेत अशी ग्रंथसंपदा आहे.


बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ सुद्धा बाबासाहेबांनी सर्वच बहुजनासाठी लिहला. तो केवळ बौद्ध अनुयायांसाठीच लिहिला असे अजिबात नाही. हा ग्रंथ म्हणजे बुद्धाने केलेल्या क्रांतीचा इतिहास आहे. हा कुण्या एका जातीसाठी लिहिला नाही. कुण्या एका धर्मासाठी लिहिला नाही. ३) हिंदू कोड बिल : हिंदू स्त्रियांना आपले हक्क व अधिकार मिळावेत या करिता हिंदू कोड बिल तयार केले होते. परंतु त्या बिलात कोणत्या तरतुदी आहेत ह्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या हिंदू स्त्रियांनी त्याचा प्रखर विरोध केला.


४) घटना निर्मिती : आज जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून महत्व आहे. जगातील एक महान घटनाकार म्हणून जग बाबासाहेबांना घटनेवरच आज भारतीय लोकशाही सुरु आहे.परंपरेने नाकारलेले मुलभूत अधिकार घटनेमुळे '. मिळाले.


स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय यावर अधारीत राष्ट्राच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला व त्या प्रकारची कलमे संविधानात अंतर्भुत केली.शिका,संघटीत व्हा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करा ही त्यांची त्रिसुत्री आहे.
म्हणूनच कवी म्हणतो, “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे”. बहुजनांचे हित साधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम!


 निबंध 3


माझा आवडता समाजसुधारक महात्मा ज्योतिबांं फुले



महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • माझा आवडता समाजसुधारक एकोणिसाव्या शतकातील महात्मा जोतीराव फुले
  • विदयेचे महत्त्व जाणणारा
  • बालपणापासून आईचा वियोग
  • वडिलांचे प्रेम मिळाले
  • समाजातील अनिष्ट प्रथांची जाणीव 
  • कार्याची आखणी 
  • पत्नीचे बहुमोल साहाय्य
  • ज्ञानदान
  • स्त्रियांसाठी शाळा
  • दलितांसाठी हौद
  • शेतकऱ्याचा असूड 
  • सत्यशोधक समाज

"विदयेविना मति गेली। 
मतीविना नीति गेली। 
नीतीविना गति गेली। 
गतीविना वित्त गेले।।
इतके अनर्थ एका अविदयेने केले."

किती मोजक्या शब्दांत जोतीरावांनी येथे विदयेचे महत्त्व सांगितले आहे ! कारण स्वतः त्यांना विदया मिळवायला खुप  कष्ट घ्यावे लागले होते. १८२७ मध्ये  त्यांचा जन्म झाला होता. बालवयातच त्यांची आई देवाघरी गेली आणि आईचे प्रेम त्यांना त्यांच्या वडलांनी, गोविंदरावांनीच दिले. शिकत असतानाच विविध अनुभवांतून जोतीरावांना भोवतालच्या समाजातील अनिष्ट प्रथा लक्षात आल्या.

 मोठ्या कष्टाने त्यांनी इंग्रजी विदया संपादन केली आणि भरपूर वाचन करून ते बहुश्रुत झाले. शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या जोतीरावांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला-सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांच्याकडे विद्यार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. सावित्रीबाईंची त्यांना जन्मभर साथ मिळाली. 


स्त्रियांच्या शिक्षणाला त्या काळात प्रखर विरोध होता. जोतीरावांना व सावित्रीबाईंना दगडगोटे, शेणमाती यांचा मारा सहन करावा लागला. पण १८४८ साली सुरू केलेले ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सतत चालू ठेवले. जोतीराव फुले यांना जे वाटले, ते त्यांनी बोलून दाखवले, त्याप्रमाणे कृती केली म्हणून आचार्य अत्रे त्यांचा उल्लेख 'कर्ते सुधारक' असा करतात.



जोतीरावांच्या काळात म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. विशेषतः विधवा स्त्रियांना फार वाईट वागणूक दिली जात असे. त्यांचे केशवपन केले जाई. ही अनिष्ट रूढी बंद पडावी म्हणून जोतीरावांनी न्हाव्यांचाच संप घडवून आणला. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ उभी केली. तसेच, त्यांनी बालहत्याप्रतिबंधकगृहाची देखील स्थापना केली.



जोतीरावांनी दलित वर्गाचीही दुःखे हलकी करण्याचा यत्न केला. त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचा अभ्यास करून त्यांची स्थिती सुधारावी म्हणून जोतीरावांनी शेतकऱ्याचा असूड' हे पुस्तक लिहून सरकारला अनेक उपाय सुचवले. 


१८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती. आपले विचार मांडताना जोतीरावांनी 'अखंड रचले. त्यांत ते आपल्या देशबांधवांना मौलिक संदेश देतात -
जगाच्या कल्याणा। देह कष्टवावा। कारणी लावावा। सत्यासाठी।। असा हा कर्ता सुधारक माझा आवडता आणि आदर्श समाजसुधारक आहे. 

maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध