माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi

माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण माणसाची स्मृती नष्ट झाली तर शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  निसर्गाकडून माणसाला लाभलेली एक महत्त्वाची देणगी म्हणजे स्मरणशक्ती होय. माणसाच्या आजवरच्या प्रगतीमध्ये या स्मरणशक्तीचा फार मोठा वाटा आहे. अर्थात, या स्मरणशक्तीचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. विशेषतः राग, द्वेष माणसाच्या मनात फार काळ धुमसत राहिला की त्यातूनच भांडणे, मारामाऱ्या, खून इतकेच नव्हे, तर राष्ट्राराष्ट्रांतील युद्धे घडतात. अशा वेळी वाटते की, माणसाला स्मृतीच नसती, तर किती बरे झाले असते! 


माणसाची स्मृती नष्ट झाली तर माणूस राग, द्वेष मनात बाळगूच शकणार नाही. कारण स्मृती नसल्यामुळे त्याच्या मनात काही राहूच शकणार नाही. त्यामुळे भांडणं, मारामाऱ्या, योजनापूर्वक केलेले खून, दरोडे शक्यच होणार नाहीत. देशादेशांमधील युद्धं संपतील ! स्मृती नसल्यामुळे अतिरेक्यांना काही आठवणारच नाही आणि त्यांचा कोणताही कट यशस्वी होणार नाही. जगातल्या किती कटकटी संपतील ! न आणखीही फायदे होतील. कधी कधी आईबाबा काम सांगतात. आपल्याला कंटाळा येतो. आपण काम करत नाही. आपण कारण सांगतो, 'विसरलो.' मग, विसरलास कसा' असं दरडावून जाब विचारला जातो. यावर आपण काहीच बोलू शकत नाही. स्मृतीच नसती, तर हा प्रश्नच आला नसता. सगळी कामं आपोआप टळली असती.


आपला अभ्यास म्हणजे हे लक्षात ठेवा, ते लक्षात ठेवा, असंच असतं. स्मृती नसती तर पाठांतर करावं लागलं नसतं. वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान लक्षात ठेवणं, प्रश्नोत्तरं लक्षात ठेवणं हे सगळं टळलं असतं. गृहपाठ करा, क्लासला जा, क्लासचा गृहपाठ करा, सगळीकडच्या परीक्षांची तयारी करा, हे काही करावं लागलंच नसतं. किती त्रास वाचला असता ! स्मृती नष्ट झाली, तर फायदाच फायदा होऊ शकेल ! -


स्मृती नष्ट झाल्यामुळे होणाऱ्या फायदयांच्या कल्पनांमध्ये मी रममाण झालो होतो. एक एक कल्पना मनात निर्माण होऊ लागली होती. आणि अचानक मला आठवले ते स्मृतिभ्रंश झालेले शेजारचे आजोबा ! मग मात्र मनाचा थरकापच उडाला. मला स्मृती नष्ट झाल्याचे तोटेच तोटे दिसू लागले. बघा ना... 


स्मृती नष्ट झाली तर आई जेवण करायलाही विसरेल ! मग खाणार काय? बरं, आईने जेवण करायला घेतलं, तरी करणार कशी? कारण कोणता पदार्थ कसा शिजवायचा, हे तिला आठवणारच नाही! आपल्याला सुद्धा कोणता पदार्थ कसा लागतो, त्याची चव काय, हे आठवणारच नाही! सर्व माणसे इतर प्राण्यांप्रमाणेच रानावनात किंवा उकिरड्यावर अन्न शोधत हिंडतील. बरं, स्मृती नसल्याने अभ्यास नाही म्हणून ज्ञान नाही. ज्ञान नसल्याने प्रगती शक्य नाही. त्यामुळे उकिरड्यावरील जीवनातून सुटका कशी करून घेणार?



याहीपेक्षा भयंकर गोष्ट आता माझ्या लक्षात येतेय. आईबाबा आपल्याला ओळखणारच नाहीत. आपणही आईबाबांना ओळखणार नाही ! घर ओळखता येणार नाही. कोणीही कोणालाही ओळखणार नाही! सगळेच एकमेकांना परके असतील ! म्हणजे कोणालाही कोणाविषयी आपुलकी नसेल, प्रेम नसेल. याचा अर्थ कोणीही दुसऱ्याला लुबाडेल, त्याच्याशी भांडेल, त्याला मारील. म्हणजे हाणामाऱ्या, युद्धं सहज होतील. माणसे माणसांच्या जिवावर उठतील. कोणीही इतरांची पर्वा करणार नाही.


छे, छे ! स्मृती हवीच. ती नसणं माणसाला परवडणारं नाही."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • माणसे राग, द्वेष यांनी आंधळे
  • मनात ठेवतात
  • केव्हातरी भीषण कृत्य करतात
  • स्मृती नसती तर हे घडले नसते
  • आणखीही फायदे
  • अभ्यासाचा त्रास नसेल
  • कामे टळतील
  • तोटेही खूपच
  • स्मृती नाही म्हणून ज्ञान नाही आणि ज्ञान नाही म्हणून प्रगती नाही
  • आईबाबा, इतर माणसे ओळखणार नाहीत
  • सगळेच परके
  • इतर प्राण्यांसारखे
  • उकिरड्यावरील जीवन
  • स्मृती हवीच.

निबंध 2

माणसाची स्मृती नष्ट झाली तर मराठी निबंध | Manasachi smruti nast zali tar essay in marathi

माझ्या कल्पनेची मलाच मजा वाटली. वाटलं भोळे सरच काय, सारे जण विसरले तर... माणसाची स्मृती नष्ट झाली तर... खरंच गंमत होईल की नाही ! मी शाळेत वही न्यायला विसरतो तसेच भोळे सर वही मागायला विसरतील ! कशाला ? शाळेत यायलाच विसरतील !

त्यांच्या प्रमाणेच इतर माणसेसुद्धा कामावर जायला विसरतील. काही जण आपापली कामे विसरतील. काही जण आपापली ऑफिसे विसरतील. भलत्याच ऑफिसात घुसतील. तिथल्या एका खुर्चीवर बसून 'दामू पाणी आण' असे बाळासाहेब सांगतील तर एक बाई पुढे येऊन म्हणेल...

"दामू नाही मी यमू ! तुम्हांला काय पाहिजे?' "मला प्लॅनिंग कमिशनचे ऑफिस पाहिजे." "पण हे फॅमिली प्लॅनिंगचे ऑफिस आहे." "अरे बापरे ! ऑफिसची जागाच विसरलो मी' असे म्हणत बाळासाहेब पायऱ्या उतरून चालू लागतील. पण जाणार कुठे ? कुठे जायचे तेच ते विसरतील.

गडकऱ्यांच्या 'प्रेमसंन्यास' नाटकात विसरभोळा गोकुळ' म्हणून एक पात्र आहे. तो बऱ्याच गोष्टी सतत विसरतो. बायकोने सामान आणायला सांगितले, तर ते विसरतो. कुठली वस्तू किती आणायची ते विसरतो. आपण विसरण्याची चूक करू नये म्हणून तो उपरण्याला गाठ मारतो.

कोणीही काहीही काम सांगितले की दुसरी गाठ. अशा गाठी मारून मारून त्याच्या उपरण्याची अवस्था गंडमाळेसारखी होते पण पुढे प्रत्येक वेळी कोणती गाठ कशासाठी मारली हेच त्याला आठवत नाही! पण खरोखर माणसाची स्मृती नष्ट झाली तर किती भीषण अवस्था होईल, विचार करा.


कामावर जाणाऱ्या माणसांप्रमाणे बेस्ट कामगार, एस.टी. कामगार, रेल्वे कामगार कामावर जायला विसरले तर...सारेच व्यवहार बंद होतील. गाड्या, आगगाड्या, गिरण्या, कारखाने, उद्योगधंदे, शाळा, कॉलेजे सारेच बंद. कारण सगळेच विसरभोळे...कोण कुणाला कसली आठवण करणार?

आपण कोण ? आपले घरदार कोणते ? नातेवाईक कोणते ? ह्याचाच विसर माणसांना पडला तर...पडला तर काय ? माणसाची स्मृती नष्ट झाल्यावर असा विसर पडणारच. मग आपली मुलगी समजून अंबूताई भीमाताईच्या मुलीलाच कडेवर घेऊन निघतील तर आपला मुलगा समजून प्रो. हणमंते जांबुवंतरावाच्या जगन्यालाच सिनेमाला घेऊन जातील...हे परखडले पण यापेक्षा आणखी भयंकर प्रकार घडू शकतील...आपले घर समजून दुसऱ्याच्या घरात माणसे घुसतील आणि तिथल्या बायकामाणसांना हुकूम सोडतील. 'बकरा किश्तोंपर'-या पाकिस्तानच्या रंगभूमीवर गाजलेल्या एका भन्नाट विनोदी नाटकातल्या त्या शेख नावाच्या पात्राला विसरण्याची खोड (आदत) असते.


तो चुकून मिा साहेबांच्या घरात शिरतो आणि तिथे असलेल्या पाठमोऱ्या बाईला आपलीच पत्नी समजून हाका मारतो. मग भयंकर गहजब उडतो. चिं.वि. जोशी यांनीदेखील स्मरणशक्तींच्या प्रोफसर साहेबांची अशी गोष्ट सांगितली आहे. शहराची नावे लक्षात कशी ठेवावी याबद्दल ते चालत्या गाडीत समोरच्या माणसाला युक्त्या सांगत असतात. उदा. 'अहमदनगर' हे नाव लक्षात कसे ठेवावे ? पहिली तीन अक्षरे घेतली तर 'मी' असा अर्थ होतो


(अहम). तीन, चार व पाच अक्षरे घेतली तर रतीचा पती... म्हणजे मदन. पाच, सहा, सात अक्षरे घेतली की शहर (नगर) व तीन, सहा, सात अक्षरे घेतली की सुसर (मगर) एवढे लक्षात ठेवले की 'अहमदनगर' हे नाव लक्षात ठेवायला सोपे ! ...एवढ्या गप्पा मारून स्टेशनवर उतरताना प्रोफेसर साहेबांच्या लक्षात येते की लग्न जुळविण्यासाठी जिला दाखवायला आपण घेऊन निघालो ती मुलगीच बरोबर नाही.

तिला निघण्याच्या स्टेशनावरच विसरलो. माणसाची स्मृती नष्ट झाली तर असे असंख्य घोटाळे होतील. अशी एखादी गोष्ट थोड्या वेळापुरती असेल तर मजा असते, पण जास्त झाली की तीच सजा होते. जेव्हा लिहिण्यावाचण्याची कला अवगत नव्हती


तेव्हापासून-वैदिक काळापासून-शेकडो सूक्ते, सूत्रे, श्लोक, संहिता, पुढे दोन चार हजार वर्षेपर्यंत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे पोचल्या त्या कशाच्या जोरावर ? स्मरणशक्तीच्या जोरावरच ! तुकारामाचे इंद्रायणीत बुडविलेले अभंग लोकांच्या लक्षात होते म्हणून ते परत लिहून काढले गेले.


विस्मृती म्हणजे भ्रम आणि विस्मरण म्हणजे एक प्रकारे मनाचे व मेंदूचे मरणच...माणसाचा देह काय तो जिवंत. बाकी मेंदू मृत ! माणूस वेडाच होणार नाही का...ज्ञान विज्ञानाची गती व संक्रमणच संपेल ना ? माणसाची स्मृती नष्ट झाली तर - दुनिया वेड्यांचा बाजार बनेल ! आणखी ! ...आणखी...आणखी काय बरं ? आठवत कसं नाही ? अरे बापरे ! माझी स्मृती तर नष्ट होत नाही ना ! देवा ! तूही मला विसरलास तर...? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद