छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध | Chatrapati Shahu Maharaj Essay in Marathi.

छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध | Chatrapati Shahu Maharaj Essay in Marathi. 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शाहू महाराज  मराठी निबंध बघणार आहोत.  तनमन पुलकित होते... ऐकता राजर्षीची गाथा स्मृती तयांच्या आठवती अन् अवनत होई माथा! कोल्हापूर संस्थान म्हटलं की, आजही डोळ्यांसमोर छबी उभी राहते ती संस्थानचे अधिपती छत्रपती शाहूमहाराजांची. 


बहुजन समाजातील शिक्षण प्रसार व दलितोद्धार यासाठी प्रयत्न करणारे, पुरोगामी विचारांचे कडवे समाजसुधारक म्हणून ओळखले जाणारे राजर्षी शाहूमहाराज. शंभर वर्षांपूर्वी सहकाराचे महत्त्व जाणणारा, सहकाराचे अवलंबन करणारा, देशाच्या उन्नतीसाठीचे, विकासाचे नवनवे मार्ग शोधणारा एक द्रष्टा समाज प्रबोधनकार. 


शेती व उद्योग या दोन्ही क्षेत्रात सहकाराचा अवलंब केला, तरच देशाचा आर्थिक विकास होऊ शकेल, असे आपल्या रोखठोक प्रभावी भाषेतून प्रतिपादन करणारा खंदा कार्यकर्ता. 'सहकार्य यशो बीजम्' हे तत्त्व आचरणात आणणारा ‘संहतिः कार्य साधिका' म्हणत जगणारा समाजाचा आधारस्तंभ.


समाजकर्त्याच्या ध्येयापोटी स्वत: राजर्षांनी कित्येकवेळा जीवास धोका पत्करला तर कित्येकदा राज्यासही. प्रजेचे हिताहित पाहणाऱ्या महाराजांनी पाण्याच्या प्रश्नाकडे नेहमीच डोळसपणे पाहिले. नद्यांवर मोठमोठी धरणे उभारली कालव्यांच्या भव्यदिव्य योजना हाती घेतल्या. 


सहकारी संस्था उघडल्या, चालवल्या व त्यांच्या जिवावर भारतात हरितक्रांती घडवून आणण्यास हातभार लावला. सामान्य जनतेला समानतेची वागणूक मिळावी, उच्च कनिष्ठतेचे समूळ उच्चाटन व्हावे, सामाजिक न्याय सर्वांना मिळावा म्हणून त्यांनी क्रांतिकारक निबंध जारी केले. प्रसंगी समाजातील प्रतिष्ठित वर्गाचा रोष पत्करून दीन दलित, मागास वर्गाचा उघडपणे कैवार घेतला.


भारतासारख्या विकसनशील देशात मागासवर्गीयांची टक्केवारी जास्त आहे व त्यांची उन्नती करणे म्हणजेच देशाचा विकास साधणे, देशाचा उद्धार करणे होय. असे त्यांचे स्पष्ट व बेडर मत होते. दक्षिणेत कोल्हापूरपासून ते उत्तरेकडे नागपुरापर्यंत त्यांनी ज्ञानमंदिरे उघडली. 


राज्यात सक्तीचे व मोफत शिक्षण सुरू करून या दलितवर्गाची शारीरिक, मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून, दास्यातून कायमची सुटका करण्याचे कसून प्रयत्न केले. सर्वात महत्त्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे शाहूंनी गिरिजन व हरिजन यांची दास्यातून मुक्तता करून त्यांची गुलामगिरी नष्ट केली व त्यांना मानवी मूलभूत हक्क मिळवून दिले, ही होय. 


गिरिजनांच्या पंगतीस प्रेमाने, आपुलकीने व निर्भयपणे जेवणारा राजा म्हणून त्यांची ख्याती होती. त्यामळेच लोक त्यांना 'महाराजांचे महाराज' असे प्रेमाने संबोधत. तर कर्ध 'मोठ्या दिलाचा राजा' म्हणून त्यांचा गौरव करीत. या राजाने प्रजेच्या हृदयसिंहासनावर अढळ स्थान मिळवले होते. भारतातील लोकांचे हस्तकौशल्य सर्वश्रुतच आहे.


हस्तकला कौशल्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी, मोठ्या उत्सवाच्या किंवा समारंभाच्या प्रसंगी ते स्वराष्ट्रीय प्रदर्शने भरविण्याचा आग्रह धरीत, ज्यायोगे होतकरू कारागिरांस मार्गदर्शन मिळेल व आपल्या लोकांत स्वदेशी वस्तूंचा वापर वाढेल, स्वदेशीचा प्रचार व प्रसार होईल. 


राजर्षांच्या नसानसात लोकशाही तत्त्वांचा अंगीकार होता. कलाकौशल्यांचा विकास त्यांनी कला शाळांमधून तर केलाच पण मुलांना या कलाशाळांत प्रवेशासाठी कुठल्याही जातिधर्माचा वा परंपरेने व्यावसायिक असण्याचा निर्बंध ठेवला नाही.


कलाकारांनी आपली कला पुढच्या पिढीला शिकवायची नाही, सुपूर्द करायची नाही, ही प्रवृत्ती घातक आहे. तिच्यामुळे कलेचा हास होत गेला असे त्यांचे स्पष्ट मत होते. अंधश्रद्धा व गैरसमजुतींवर ते कडाडून टीका करीत. जगण्याच्या विशाल दृष्टिकोनावर त्यांची नितांत श्रद्धा होती. राजाश्रयापेक्षा लोकाश्रय मोठा व विशेष श्रेयस्कर असतो, असं ते ठामपणे म्हणत.


एकीचं बळ, संघटन शक्ती, एक संघता अंगीकारून सहकाराच्या मार्गाने चालण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष असे. प्रत्येकाने एककल्ली मार्गाने निरनिराळे काम करण्याचे दिवस संपले, आता पुष्कळ लोकांनी आपली कुशलता, पैसा, अंगमेहनत, अक्कल एक केली पाहिजे.


द्योग धंदा वाढवला पाहिजे त्यातच फायदा आहे, असं ते म्हणत. म्हणूनच उद्योग शिकवणाऱ्या शाळा निघाव्यात, त्यांची भरभराट व्हावी, कारखाने वाढीस लागावेत अशीच त्यांची इच्छा होती, स्वप्ने होती व त्यासाठी लागणारे भांडवल, हव्या त्या सवलती, उत्तेजन देण्यास ते उत्पर असत. त्या काळात सहकारी पतपेढ्यांची बीजे महाराजांनी समाजात रुजवली. 


हिंदुस्थान मुख्यत्वेकरून शेतीप्रधान देश आहे. येथील प्रजेचा मुख्य धंदा शेती. पण शेतकीत पुरेशी प्राप्ती नाही. पोट भरत नाही म्हणून मोठ्या शहरांत मजुरी करण्यास जाणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढते आहे. त्यायोगाने दिवसेंदिवस खेड्यातील वस्ती कमी होऊन शहरे गजबजत आहेत. 


तेथील वस्ती नको इतकी दाट होतेय, तेथील आरोग्य बिघडते आहे. स्थलांतरण करणाऱ्या जनतेमुळे रोगप्रसार खेड्यांतही होत आहे. ह्या विचारांनी ते अस्वस्थ होत. याउलट शेतीच्या उद्योगात जितक्या जास्त लोकांना काम मिळेल तितके चांगले. ह्या हेतूने जास्त असलेली लोकसंख्या शेतमजुरीच्या धंद्यात जावी, अशा विचारांनी त्यांना प्रेरीत केले होते. शेतकऱ्यांच्या कामाच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत


नांगर व विहिरीचे पाणी काढण्याची मोट - त्यांच्यात सुधारणा होऊन शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट व वेळ ह्यांची बचत व्हावी, पाणी वाया जाऊ नये असे त्यांचे डोळस धोरण होते. शेतीच्या सुधारणांकडे लक्ष दिल्यास शेतकीचे सरासरी उत्पन्नही वाढेल. जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल असा निर्मळ दृष्टिकोन देणारा पुरोगामी विचारांचा हा एक तळमळीचा शेतीसुधारकही होता.


राजर्षी शाहूमहाराज खरंच एक महान व्यक्ती होते. एक चतुरस्र, अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. हिंदी शास्त्रीय संगीताचा त्यांनी पुरस्कार केला. मराठी अभिनय क्षेत्र, लोककलांना त्यांनी नेहमी प्रोत्साहित केले. मराठी रंगभूमीचा ते एक प्रमुख शिल्पकारच, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 


मल्लविद्येचा महान पुरस्कर्ता व एक भक्कम आधारस्तंभ होता. आधुनिक महाराष्ट्राच्या निष्ठावान भाग्यविधात्यांच्या यादीत शाहमहाराजांचे नाव नेहमीच अग्रभागी राहील. समाजात महत्त्वाच्या व विविध भूमिका त्यांनी वठविल्या, पण भारतात नवसमाज निर्मितीसाठी त्यांनी जे कठोर परिश्रम घेतले, ते केवळ अद्वितीय, संस्मरणीय व ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले.  


थोर समाजक्रांतिकारक सुधारकाला आमचे मन:पूर्वक अभिवादन. त्यांच्या स्मृतीपुढे आम्ही सदैव नतमस्तक आहोत. 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर आमुचे जुळती।'  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद