पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

 पंचायत राज्य निबंध मराठी | Panchayat Raj Nibandh in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पंचायत राज्य मराठी निबंध बघणार आहोत. भारत हा खेड्यांचा देश आहे. निम्म्याहून अधिक जनता ग्रामीण भागात रहाते. खेड्यांच्या विकासासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. तात्पर्य, विकासकार्य आणि प्रशासनात ग्रामीण जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असणे आवश्यक आहे. 


परंतु देशात पंचायती राज्य आणि ग्रामपंचायती असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. पंचायती राज्य आणि ग्रामपंचायतींची परंपरा खूप प्राचीन आहे. पंचायती राज्य म्हणजे पंचांच्या द्वारे न्यायनिवाडा करणे. आपापसांतील सगळे वादविवाद, समस्या गावाचे पंच मोठ्या कुशलतेने आणि विचारपूर्वक सोडवितात. 


त्यांच्या न्यायावर कुणीही अविश्वास दाखवीत नाही. म्हणूनच प्राथमिक स्तरावर असलेल्या पंचायती हा लोकशाहीचा मजबूत पाया बनला. पंचायतीनी देशाच्या सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्याबरोबरच पंचवार्षिक योजनांना सुरवात झाली आणि ग्रामसमित्या व पंचायतींच्या स्थापनेला आरंभ झाला. राज्यांनी ग्रामपंचायतींच्या स्थापनेसाठी आवश्यक अशी विशेष पावले उचलली. परंतु त्यांना मर्यादित अधिकार देण्यात आले होते. 


त्यांच्याजवळ आर्थिक उत्पन्नाची साधने नव्हती. त्या स्वतंत्रपणे खर्च करू शकत नव्हत्या. म्हणून त्यांचे कार्य समाधानकारक नव्हते. भारतीय घटनेत दुरुस्ती करून पंचायती व्यवस्थेला प्रभावी बनविण्यात आले. त्यांच्या वास्तविक, आर्थिक प्रशासकीय अधिकारांत वाढ करण्यात आली.


आता प्रत्येक राज्यात पंचायती राज्य व्यवस्था अस्तित्वात आहे. ती गावांचा विकास गावांची व्यवस्था यासाठी कटिबद्ध असून ती जबाबदारी पार पाडण्यास तयार आहे. पंचायतीत एक सरपंच एक उपसरपंच व त्यांच्या मदतीसाठी इतर सदस्य असतात. 


पंचायत, न्यायदान, समस्या निवारण गुन्हेगारांना शिक्षा करणे, गावातील आरोग्य शिक्षण व कल्याणाची व्यवस्था ही कामे करते. विहिरी, मंदिरे, प्रार्थनास्थळे, तलाव, सिंचनाची साधने, विश्रामगृहे, शाळा इत्यादींची व्यवस्था ठेवते. या सर्वांची देखभाल करण्याची जबाबदारी पण पंचायतीवरच असते.


पंचायती राज्यात त्रिस्तरीय प्रशासन व्यवस्था असते. पहिल्या स्तरावर ग्रामपंचायती असतात, दुसऱ्या स्तरावर पंचायत समित्या व तिसऱ्या स्तरावर जिल्हा परिषदा असतात. या संस्था आपापल्या क्षेत्रातील ग्रामीण उद्योग, कृषिविकास, माता व शिशुकल्याण, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, चारा, रस्ते, विहिरी, स्वच्छता इत्यादी कामे करतात.


दारिद्र्य निर्मूलन, ग्रामीण विकास, जवाहर रोजगार योजना इत्यादी कार्यक्रमांत वरील संस्था सक्रिय भाग घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून गरीब ग्रामीण जनतेत एक नवी जागृती होत आहे व ते आपल्या अधिकाराप्रती, सुविधांप्रती जागरुक होत आहेत. सामाजिक, आर्थिक विषमता हटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.


पंचायतींना अधिक निःपक्षपाती, विश्वसनीय, जबाबदार, कुशल, आणि समर्थ. बनावयाचे आहे. यात सर्व जाती, जमाती, महिला. छोटे शेतकरी, शेतमजूर इत्यादींचा सहभाग हवा. पंचायतींना अधिक आर्थिक मदत, अधिकार आणि प्रशासकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. 


पंच, सरपंच, उपसरपंचांना प्रशिक्षण दिले पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारने यांच्या विकासासाठी त्वरित खंबीर पावले उचलली पाहिजेत. पंचायतीमध्ये महिलांना आरक्षण असले पाहिजे. भारताचा खरा विकास आणि समृद्धी बरीचशी पंचायती संस्थांच्या कार्य कुशलतेवर, यशस्वितेवरच अवलंबून आहे. 


पंचायतीच स्थानिक समस्या सोडवून विकास घडवून आणू शकतात, यास दुसरा कोणताही पर्याय नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद