आपला स्वातंत्र्य दिन आणि सुरक्षितता मराठी निबंध | appala swatantra din ani surkshitata marathi nibandh

आपला स्वातंत्र्य दिन आणि सुरक्षितता मराठी निबंध | appala swatantra din ani surkshitata marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आपला स्वातंत्र्य दिन आणि सुरक्षितता मराठी निबंध बघणार आहोत.  तब्बल दीडशे वर्षे ब्रिटिशांबरोबर संघर्ष करून भारताने स्वातंत्र्य मिळविले. दीडशे वर्षे ब्रिटिशांनी भारतीयांवर राज्य केले, त्यांचे शोषण केले, जुलूम-जबरदस्ती केली आणि त्यांना म. गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, पं. नेहरू, टिळक, आगरकर यासारख्या महान आणि कर्तृत्वसंपन्न अशा देशप्रेमींनी लढा देऊन ब्रिटिशांच्या 'मुठीतून' भारताला सोडवून आणले. 



त्या देशप्रेमाने झपाटलेल्या व्यक्तींनी या देशासाठी स्वतःचे अवघे आयुष्य पणाला लावले, काहींनी तर देशासाठी सर्वस्व बलिदान केले. त्यामुळेच भारत हे एक 'स्वतंत्र' राष्ट्र म्हणून उदयाला आले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि तो आपल्या नव्या पिढीच्या स्वाधीन केला आणि खऱ्या अर्थाने त्यांचे जीवन सार्थक झाले.

"झंडा ऊँचा रहे हमारा।

विजयी विश्व तिरंगा प्यारा।।" 


असे गीत जेव्हा भारत स्वतंत्र झा, तेव्हा प्रत्येक भारतीयाने मोठ्या अभिमानाने, निर्भयपणे म्हटले होते. परंतु आज परिस्थिती काय आहे ? याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की आज भारतात झेंडावंदन किंवा स्वातंत्र्यदिन साजरा करताना आजूबाजूला मोठमोठ्या रायफल, बंदुका घेऊन जवान थांबलेले असताना तो साजरा होतो. खरंच या गोष्टीचा बारकाव्याने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आज भारतात झेंडावंदन किंवा स्वातंत्र्यदिन साजरा करताना आजूबाजूला मोठमोठ्या रायफल, बंदुका घेऊन जवान थांबलेले असताना तो साजरा होतो.  


खरच या गोष्टीचा बारकाव्याने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्यदिनदेखील आपण मुक्तपणे साजरा करू शकत नाही. का आपल्याला एवढ्या सुरक्षिततेची गरज भासते ? का जम्मू-काश्मीरसारख्या ठिकाणी शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना आजूबाजूला जवानांचा किंवा पोलिसांचा पहारा, संरक्षण असते ?



याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतामध्ये वाढलेला दहशतवाद ! आज भारताने २१व्या शतकात पदार्पण केले आहे. भारताची औद्योगिक, तांत्रिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती वाखाणण्यासारखी आहे. इतर देशांची तुलना करता भारताने 'आय. टी. ' क्षेत्रात केलेली कामगिरी तर विशेष उल्लेखनीय आहे. हरितक्रांतीने भारताने अन्नधान्याच्या आणि धवलक्रांतीने दूधउत्पादनाच्या बाबतीत क्रांतीच केली. 


अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करू पाहत आहेत, अमेरिका, जपानसारख्या देशात भारतीय तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. एकंदरीत पाहता भारताने विविध क्षेत्रात केलेली प्रगती त्यामुळेच काही विघातक शक्ती याचा नाश करण्याच्या प्रयत्नात आहेत.


भारताने एवढी प्रगती केली, पण भारत दहशतवादी कारवायांचा छडा लावण्यात कमी पडत असल्याने दिसून यत. कारण भारत हा खंडप्राय देश आहे. इथे वेगवेगळ्या धर्माचे, वंशाचे, जातीचे लोक एकत्र नांदतात. सर्वांना घटनेने समान अधिकार, कायदे व स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु काही समाजकंटक लोकांना हे पाहवत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे ११ जुलै २००६ रोजी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ७ ठिकाणी लोकलमध्ये झालेले बॉम्बस्फोट, यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले, जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आणि तपासाअंती हे सर्व कांड 'सिमी' या दहशतवादी संघटनेने केले असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यामागे 'लष्कर-ए-तोयबा' व 'जैश-ए-मोहम्मंद' या संघटनामार्फत हा कट रचला गेला होता, त्यानंतर लगेचच ८ सप्टेंबर २००६ ला मालेगावमध्ये खडा कबरस्तान आणि मुशावरत चौक या दोन ठिकाणी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये प्रसारमाध्यमाच्या सांगण्यावरून किमान ३७ जण ठार झाले असावेत.


दहशतवादाच्या मुळाशी क्रूरपणा आणि गुन्हेगारी वृत्ती असते. मात्र त्यानंतर विचारसरणीची, अस्तित्ववादाची, राजकारणाची जोड दिली जाते. टोकदार अस्मिता, अस्तित्व नष्ट होण्याची भिती, जहाल विचारसरणी, इतरांकडून होत असलेली उपेक्षा या साऱ्याचे रूपांतर दहशतवादाला चालना देणाऱ्या संघटनेत करण्यात क्रूर शक्तींना यश आले, की दहशतवाद वाढीस लागतो. 


अर्थात त्यासाठी पोषक वातावरण तयार करणाऱ्या शक्तीही त्याला तितक्याच जबाबदार असतात. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे स्वतंत्र अस्मिता नाहीशी होण्याची भीती अनेकांना वाटत आहे. आपले 'स्व'त्व गमावून बसण्याच्या भितीपोटीही हिंसाचार वाढतो, दहशतवाद वाढण्यामागे ही सर्व कारणे आहेत. त्यामुळे भारतात सुरक्षितता अशी कोठेही राहिली नाही.


बाहेरून येऊन लोक येथे दहशत निर्माण करतात तर मग आपण स्वतंत्र आहोत का ? हा प्रश्न पडतो. यावरून असे दिसून येते की, भारतात बरेच लोक जीव मुठीत धरून जगत आहेत, आणि हे दारुण सत्य आपण नाकारू शकत नाही. भारतामध्ये मोठ्या सभा, व्याख्याने, उद्घाटन समारंभ यासारखे अनेक कार्यक्रम कडक बंदोबस्तात पार पाडली जातात, पण खरेच या सभा समारंभांना येणारे लोक हे स्वतःच्या भारतमातेला आपल्या या देशाकडे पाहून कीव येत असेल की हीच का माझी धरणी जिथे, आणि जिच्यासाठी अनेकांनी बलिदान केले ? हा स्वातंत्र्यदिन पाहून स्वातंत्र्यदिन या शब्दाचा अर्थ बदलल्यासारखा वाटतो, हा तर आपल्या "झेंड्याचा पहारा दिनच'' म्हणावा लागेल.



ही आपल्या देशाची शोकांतिका आहे, की आपण ६० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला, परंतु ६० सेकंदाचीदेखील सुरक्षितता आज आपल्याकडे नाही आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर दहशतवाद हा मुळापासून नष्ट करायला हवा. त्यासाठी दहशतवादाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. किमान गरीब व श्रीमंत यामधील दरी दूर व्हायला हवी. कोणत्याही धार्मिक तेढ दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हायला हव्यात, देशातील भ्रष्ट राजनीती व्यवस्था सुधारल्यास देश हा दहशतवादाच्या छायेतून बाहेर पडेल.


शेवटी या भारतमातेला वंदन करून ही परिस्थिती केव्हातरी नक्की बदलावी अशी आशा आपण करू शकतो आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे व सुरक्षितपणे आपला स्वातंत्र्यदिन साजरा करू शकतो. असे झाल्यासच आपण...

"सारे जहाँ से अच्छा

हिंदोस्ताँ हमारा, हमारा।" हे गीत अभिमानाने म्हणू शकू.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद