स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध | Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi

 स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध | Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण  स्वातंत्र्यवीर सावरकर शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात वीर सावरकरांचे स्थान अद्वितीय आहे. महाभारतातल्या एखाद्या वीर पुरुषाप्रमाणे त्यांचे सारे चरित्र आणि कर्तृत्व आहे. भारताच्या स्वातंत्र्यसाठी जास्तीत जास्त त्याग करणाऱ्या आणि धोका पत्करणाऱ्या देशभक्तांमध्ये वीर सावरकरांना नि:संशय अग्रस्थान द्यावे लागेल.


वयाच्या पंचविसाव्या वर्षाच्या आत भारताच्या सशस्त्र क्रांतीचे ते पुढारी बनले. 'सत्तावनी स्वातंत्र्यसमर' ही सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाची ‘अमरगीता' त्यांनी याच काळात लिहिली. 


वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी इंग्रज सरकारचे राज्य नष्ट करण्याचा कट करण्याच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या खुनाला मदत केल्याच्या अशा दोन आरोपांवरून त्यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा होऊन त्यांची रवानगी अंदमानच्या तुरुंगात झाली.


फाशीच्या शिक्षेपेक्षा अधिक भयंकर अशी ही शिक्षा मिळालेले सावरकर एकमेव देशभक्त होत. अंदमानातील त्यांचे जीवन म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज होती. यात सावरकरांचा जय झाला. सावरकरांनी अंदमानाच्या नरकात इ. स. १९११ साली पाऊल ठेवले. 


त्यांच्या सुटकेची मागणी साऱ्या भारतवर्षाने एकमुखाने केली, तेव्हा दहा वर्षांनी त्यांची अंदमानातून सुटका झाली.१९११ साली सावरकर सेल्युलर जेलमध्ये दाखल झाले. प्रथम त्यांना छिल्का कुटण्याचे काम देण्यात आले. छिल्का कुटून कुटून हात सुजायचे; तळहातास मोठमोठे फोड यायचे. तशाच हातांनी छिल्का कुटायला लागायचा.


त्यामुळे ते फोड फुटून त्यांतून रक्त वाहायचे. त्यानंतर त्यांना घाण्याला जुंपण्यात आले. घाणा ओढता-ओढता श्वास जड होई, चक्कर येऊन मटकन खाली बसावे लागे, घशाला कोरड पडे; पण पाणी मिळत नसे. पिण्याच्या पाण्यासाठी जमादाराची आर्जवे करावी लागत. 


संध्याकाळी तेल कमी भरले, तर बारीसाहेबांचे अपशब्द ऐकावे लागत. तुरुंगातल्या सर्व कैद्यांचा अमानुष छळ करणारा बारीसाहेब हा तर साक्षात् यमाचाअवतार होता. बंदीवानांस काम, अन्न, वस्त्र, मारहाण अशा प्रकारे त्रास देण्यात येई. मलमूत्राचा अवरोध करण्यास भाग पाडले जाई. 


कधी कधी मलावरोध करणे अशक्य होई. तसे झाल्यास, तो कैदी शिक्षेस पात्र होई. सावरकरांनी याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सर्व बंदीवानांच्यात एकी घडवून आणली आणि सरकारकडे त्याविरुद्ध अर्ज केला. तेथेही दाद न मिळाल्यावर अखेर त्यांनी घाण्याचे काम नाकारून त्यासाठी बंदीगृहात पहिला संप घडवून आणला.


संपात सहभागी झालेल्या बंदींना कांजीवर ठेवण्यात आले. आठ दिवस हातकडी, बेडी, कोठडीबंदी अशा नैमित्तिक शिक्षा देण्यात आल्या. कोयनेलचे घोट घशात ओतले जात. त्यामुळे कैदी चक्कर येऊन पडत. पोटात आग पडत असे. 


तरीही संपवाल्या कैद्यांमधील एकोपा व धैर्य पाहून त्यांची शिक्षा कमी झाली. अशा प्रकारे तेथील बंदीवानांना ते योग्य सल्ला व धीर देत आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देत, त्यांना हिंदुस्थानचा इतिहास सांगत, थोरा-मोठ्यांची चरित्रे सांगत आणि त्यांच्याबरोबर राजकीय, धार्मिक विषयांवर चर्चा करत.


तुरुंगात कागद, पेन या गोष्टी मिळत नसत. तेव्हा ते चुन्याने रंगवलेल्या भिंतींवर लहान खिळे, घायपाताचे काटे यांच्या साहाय्याने लेखन करीत. 'कमला' नावाचे महाकाव्य त्यांनी अशा भिंतीवरच लिहिले. अशा प्रकारे अंदमानातील कठोर अशा जीवनातही त्यांनी आपल्या बुद्धीच्या साहाय्याने मात केली.


एकाच बंदीगृहात सावरकरांचे ज्येष्ठ बंधू तात्याराव सावरकरही होते; पण त्यांची कधी दृष्टादृष्टही झाली नव्हती. पण जेव्हा त्यांना समजले, तेव्हा मात्र त्यांनी युक्तीने त्यांच्याशी भेट घेतली. त्यांनी कारावासातही ज्ञानसत्र चालू ठेवले. हिंदुस्थानबद्दलच्या बातम्या मिळविण्यासाठी त्यांना नाना त-हेचे प्रयत्न करावे लागत. 


कधीकधी अधिकाऱ्यांच्या शौचकूपातले किंवा उकिरड्यावरच्या कचऱ्यातले वर्तमानपत्रांचे फाटकेतुटके कागद गोळा करून आणत आणि वाचत. त्यातूनच त्यांना बंगालच्या फाळणीबद्दलची बातमी समजली. १९०५ सालची बंगालची फाळणी रद्द झाली, ही बातमी, तसेच नामदार गोखल्यांनी शिक्षणाचा ठराव केल्याची बातमी समजली होती.


अशा प्रकारे सावरकरांनी देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी खडतर यातना सहन केल्या. सुटकेनंतर त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. अखेर १९६६ मध्ये त्यांनी देह ठेवला.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध  2

 स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध | Vinayak Damodar Savarkar Essay In Marathi


 "कैदी पळाला...सावरकर पळाला...' अशा आरोळ्या मोरिया बोटीवर उठल्या. मोठ्या ईयेने व जिद्दीने त्या बोटीच्या संडासातून सागरात उडी ठोकून बंदुकीच्या गोळ्या चुकवीत पाण्यात पोहत जाणारे स्वातंत्र्यवीर विनायक अखेर फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर फ्रेंच पोलिसांच्या तावडीत सापडले. 'प्रतिकूल' तेच घडले होते.


१८८३ मध्ये एडनच्या तुरुंगात मरण पावलेले क्रांतिवीर वासुदेव बळवतच २८ मे १८८३ रोजी भगूर गावी सावरकर कुलात 'विनायक' रूपाने अवतरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लहानपणापासून घोडेस्वारी, धनुर्विद्या, तलवार चालविणे हे खेळ खेळताना ते मित्रमेळा व सैनिक शाळा यात सहभागी झाले. 


रँड साहेबांचा खून करणारे चाफेकर बंधू फासावर गेले तेव्हा वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी प्रतिज्ञा केली- "माइया देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी, सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेतो शत्रूशी झुंजेन"..या प्रतिज्ञापूर्तीच्या कार्याची प्राणप्रतिष्ठा विलायती कपड्यांच्या प्रचंड होळीने झाली. 


 त्यावेळी सावरकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. या कृत्याबद्दल सावरकरांना प्रिन्सिपॉल रँग्लर परांजपे यांनी वसतिगृहातून काढून टाकले व दहा रुपये दंड केला. लो. टिळक व शिवरामपंत परांजपे यांनी मात्र सावरकरांच्या या कार्याचा गौरव केला.. 


पढे शिक्षणासाठी लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी 'अभिनव भारत' या नावाची क्रांतिकार्य करणारी संस्था निर्माण केली. सेनापती बापट त्यांचे सहकारी होते. लंडन ते भारत पुस्तकांचा पूल तयार झाला. त्यातून पिस्तुले पाठविली जाऊ लागली. भारताच्या गुलामगिरीच्या शंखलांमुळे अस्वस्थ झालेले सावरकर 'ब्रायटन' च्या सागरतीरावर उभे राहून सागराला साद घालीत होते.


"ने मजसी ने परत मातृभूमीला...सागरा प्राण तळमळला...” आणि त्याच सागरमार्गाने जाताना पकडले गेले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला गेला. ५० वर्षांची...दोन जन्मठेपींची...काळ्या पाण्याची क्रूर शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली. १९११ साली हा स्वातंत्र्यसिंह अंदमान कारागृहाच्या गजाआड कोंडला गेला.


भट्टीत सोने उजळून निघावे, तशी सावरकरांची नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा त्या उग्र बंदिवासात प्रकर्षाने पालवली. अंदमानच्या भिंतीवर काट्याने त्यांनी 'कमला' खंडकाव्य लिहून काढले. त्यांचे ‘सत्तावनचे स्वातंत्र्यसमर,' 'माझी जन्मठेप', हे ग्रंथ वाचताना सारे रान आपल्या भोवती पेटून उठत आहे असा भास होतो. त्यांचे 'सहा सोनेरी पाने', 'जात्युच्छेदक निबंध' व काही नाटके हे ग्रंथही गाजले.


पुढे त्यांनी हिंदुमहासभेत भाग घेतला व सहा वेळा अध्यक्षस्थान भूषविले. त्यांच्या प्रखर पुरोगामी वैचारिक दृष्टीमुळे त्यांच्या अनुयायांपुढेही काळोखी आली. विचारांनी व द्रष्टेपणाने जणू शंभर वर्षे ते आधी जन्माला आले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना गांधी खून खटल्यात गुंतवण्याचे हीन प्रयत्न करण्यात आले, पण त्यातून ते निष्कलंकपणे मुक्त झाले.


सावरकरांचे जीवन म्हणजे अखंड संग्राम. सुखासीन स्वप्नांची मलमल विणण्याच्या तरुण वयात अग्निशिखेने दिक्कालावर भारतीय स्वातंत्र्याचा महामंत्र कोरण्याच्या दीर्घोद्योगात त्यांचे जीवन नखशिखान्त होरपळून निघाले. आपल्या आक्रमक, प्रभावी, युयुत्सू व विजिगिषू वृत्तीमुळे त्यांना काळ्या पाण्याची यात्रा करावी लागली, 


पण हे व्रत त्यांनी अंधतेने स्वीकारलेले नव्हते. इतिहास व निसर्गाच्या प्रकाशात ते सतीचे वाण त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे वक्तृत्व व विद्वत्व अजोड होते. हिंदुसमाजसुधारणेसाठी त्यांनी त्यातल्या रूढींवर ज्वालाग्राही शब्दांत प्रखर हल्ला चढविला. 


'दोन शब्दांत दोन संस्कृती,' 'मंत्रबळे नव्हे यंत्रबळे,' 'मनुष्याचा देव व विश्वाचा देव' यासारखे अनेक लेख त्यांनी लिहिले. ज्वालामुखीच्या शाईत कडाडणाऱ्या बिजलीची लेखणी बुड । समाजपुरुषाच्या ललाटावर लेख लिहिणारे एकमेवाद्वितीय लेखक सावरकरच. संरक्षणासारख्या अनेक राजकीय विषयांवरील त्यांचे अंदाज आज भचूक ठरत आहेत.


महाकवीची कल्पनाशक्ती, ज्वलंत राष्ट्रभक्ती व अकतोभय विज्ञानाधिष्ठित बुद्धिवादी प्रवृत्ती यांचे रसायन असलेल्या क्रांतिकारकांच्या मुकुटमणी मत्युंजय सावरकरांनी मृत्यूशी झुजदत देत अखेरीस २६ फेब्रुवारी १९६६ रोजो आत्मार्पण केले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद