व्यवसाय शिक्षण काळाची गरज मराठी निबंध | Vyavsay Shikshan Kalachi Garaj Marathi Nibandh

 व्यवसाय शिक्षण काळाची गरज मराठी निबंध | Vyavsay Shikshan Kalachi Garaj Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  व्यवसाय शिक्षण काळाची गरज मराठी निबंध बघणार आहोत. "काय बाळ मग दहावीनंतर कुठली साईड घेणार? तू काय,स्कॉलर! डॉक्टर नाहीतर इंजिनियरच होणार. पण अभ्यास भरपर कर हं! बेसावध राह नको. स्पर्धा फार मोठी आहे. 


महाविद्यालयात जागा कमी त्यामुळे संधीही कमी. काळजी घे बाबा. मनापासून अभ्यास कर हं!" हे आणि असे सल्ले, उपदेश वारंवार घरात, बाहेर, शाळेत, नातेवाईकांकडून, जिव्हाळ्याच्या निकटवर्ती लोकांकडून, कानावर सतत येऊ लागले. परीक्षा उंबरठ्यावर येऊन ठेपली नी मनावर एक वेगळंच दडपण हळूहळू वाढू लागले. 


मला स्वप्नं पडू लागली की मी मैलोन्मैलाच्या रांगेत माझी मार्कलिस्ट घेऊन बाबांबरोबर उभा आहे, प्रख्यात कॉलेजच्या प्रवेशद्वारापाशी ..... अकरावीच्या प्रवेशासाठी. बाबा वारंवार घाम पुसताहेत, आई मोबाईलवरून सतत आमच्याशी संपर्क साधतेय. इतक्यात माझा नंबर येतो नी प्रवेश संपल्याचे जाहीर केले जाते. 


आता माझे काय होणार? ह्या विचाराने कासावीस मी, दचकून जागा होतो नि अंथरुणावर उठून बसतो.  वाटतं... झुगारून द्यावा आम्ही मुलांमुलींनी वर्षानुवर्षांचा मनावर असलेला एक छाप शिक्षणपद्धतीचा पगडा. प्रगतीच्या-प्रतिष्ठेच्या बेगडी कल्पना, नोकरी करण्याची पारंपारिक मनोधारणा, आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार एखाद्या कलेकडे, शिक्षणाकडे असलेला दुर्लक्षित कल, स्वतंत्र व्यवसाय करण्याच्या आत्मविश्वासाचा अभाव नी अतिसुरक्षित, मर्यादित विकास साधणारी जीवनशैली.


दिवसेंदिवस, लोकसंख्येच्या विस्फोटाकडे आपला देश चाललाय. सुशिक्षित बेकारीची समस्या आ वासून उभी आहे. अशा वेळी काळाची गरज ओळखून, स्वतंत्र व्यावसायिक म्हणून उभे राहणेच अत्यावश्यक आहे तेही व्यावसायिक शिक्षण घेऊन. 


लवकरात लवकर परिपूर्ण होऊन! 'उत्तम व्यापार, मध्यम शेती व कनिष्ठ नोकरी', हे लक्षात घेऊनच उद्योगात झटणे हेच आपण शहाणपणाने अंगीकारले पाहिजे. अनावश्यक पदव्या संपादन करून बेकारी व बेरोजगारी वाढवण्यापेक्षा आम्हा मुलांची आवड, शारीरिक, बौद्धिक क्षमता पाहून


भविष्यातील व्यवसायाची डोळसपणे निवड करून, त्याच दिशेने शैक्षणिक मार्गक्रमणा करणंच लाभदायक आहे. लोकहितवादी- म. फुले, आगरकर ह्या थोर समाजसुधारकांनी धंदेशिक्षणाचा विचार शंभर वर्षांपूर्वीच केला होता.


विद्यार्थ्यांसाठी शासकीय व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू आहेत. आय.टी.आय. मधून कित्येक तरूण प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मोबाईल रिपेअर, कार्पेटर शिक्षित होऊन बाहेर पडतात. आमच्या शेजारीच राजू नावाचा मुलगा राहतो. दहावीनंतर त्याने ऑटोमोबाइल इंजिनियरिंगचा डिप्लोमा घेतला. 


स्वत:चे मोटार गॅरेज काढले. तसेच रात्रंदिवस काम करून कष्टाने भरपूर रोजगार मिळवणारा, इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला अभय. बघावं तेव्हा विजेची उपकरणे, शेतावरील विहिरींचे पंप दुरुस्त करणारा मोटार वाइंडर राजू. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला अभिजित 'फूड सेंटर' उभारून बसला.


'जेथे राबती हात, तेथे हरी' आज श्रमांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. कुठलेही काम हलके नाही, हे ब्यूटी पार्लर चालवणारी स्वातीताई सर्वांना सांगते. विशिष्ट ज्ञान घेऊन, शिकून सवरून, ठरवून त्या व्यवसायात पडण्याचे फायदे शेतीतज्ज्ञ विकासदादाकडे पाहन पटतात. 


म्हणूनच कृषीशास्त्रात एम्. एस्. सी. होऊन आपल्या जमिनीतील पिकवलेला उत्तम प्रतीचा माल तो निर्यातही करतो. इंटरनेटच्या साह्याने, ईमेलचा सर्रास वापर करून उत्पादने बाजारपेठा, व्यापारी दर ह्यांचा अभ्यासपूर्वक मेळ घालतो. शेतकरी संघटनेचं नेतृत्व करतो प्रभावीपणे विचार मांडून एकाच प्रकारच्या उत्पादिताचं वा मालाचं संपृक्तीकरण बाजारात होऊ देत नाही.


ग्रामीण भागात तर शेतीबरोबरीनं येतात जोडधंदे. मत्स्यपालन, वराहपालन, इमू पालन, मधुमक्षिका पालन, गोशाळा, दुग्धव्यवसाय, रेशीम उत्पादन, सेंद्रिय खाद्यरंग निर्मिती, गांडूळखत प्रकल्प, रोपवाटिका व्यवसाय इत्यादी व्यवसाय तरुण लघुउद्योजक करू शकतात. 


स्वयंरोजगार निर्माण करू शकतात. अगदी आत्ता निघालेला शेती, पर्यटन व्यवसायही गर्दी खेचणारा व पैसे कमावून देणारा धंदा आहे. अशा व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन नेहमीच कार्यशील असते. अनुदाने देते, आर्थिक विकासासाठी झटते, स्वतंत्र योजना राबवते. 


त्यासाठी लागणारी औषधे, खते, उपकरणे अत्यल्प दरात वा कधी कधी मोफतही देते. समाजाने मात्र श्रमप्रतिष्ठा, स्वयंरोजगार ह्या मूल्यांना महत्त्वाचे स्थान देऊन एखाद्या कॉम्प्युटर इंजिनियरला व कृषी पदवीधारक तरुणाला समान प्रतिष्ठा दिली पाहिजे. म्हणजे तरुण उत्साहाने व्यवसायशिक्षणाच्या मागे लागतील.


त्यांना कळेल की, रुळलेल्या वाटांवरून न जाता, शिक्षणाच्या नव्या वाटा चोखाळणं आज क्रम प्राप्त आहे. चारचौघांनी केलं, म्हणून सगळं काही शिकण्यापेक्षा आपल्या आवडीच्या विषयात विशेष प्राविण्य मिळवलं पाहिजे कारण जमाना ‘स्पेशालिस्ट' चा आहे.


माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, व्यवस्थापन, परकीय भाषा शिक्षण, फोटोग्राफी, अॅनिमेशन, ग्राफिक डिझायनिंग, फॅशन मेकिंग, एन्हीरॉनमेंटल सायन्स, हेल्थ सायन्स, ओशनोग्राफी इत्यादी वाटा पूर्णपणे अपरिचित नाहीत पण अजून धोपटमार्गही झालेले नाहीत. 


ह्या साऱ्या अभ्यासक्रमांची माहिती " एज्यूमंत्रा यांसारख्या दैनिक पुरवण्यांमधून पुरवली जाते ती वेळोवेळी अभ्यासून, तपासून अंगीकारावी एवढेच. भारतात पूर्वी खेडी स्वयंपूर्ण होती. सर्वांना रोजगार मिळत होते. बेकारी नव्हती. पण आता मृगजळांपाठी जावे, तसे शिक्षित तरुण शहरांकडे निघालेत  नोकरी मिळवण्याच्या नादात. 


शहरांमध्ये गर्दी करून तेथे ध्वनी, जल, वायू प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरत आहेत. सुदृढ निरोगी आरोग्य गमावून शारीरिक व्याधींना सामोरे जात आहेत. ह्यापेक्षा सारेच व्यवसाय, पुन: एकदा पूर्वीसारखे आपल्याच गावात सुरू झाले, तर खेडी स्वयंपूर्ण होतीलच पण रोजगाराच्या हमीबरोबर सुखसमाधानही नांदेल असंच वाटतं.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद