कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध

निबंध क्रं. १ 

नमस्‍कार मित्रांनो आज आपण  Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध बघणार आहोत.  स्वामी विवेकानंद यांनी  भारताचे व हिंदू धर्माचे नाव नाव संपुर्ण विश्‍वात कश्‍याप्रकारे केले त्‍यांच्‍या बालपणा गमती जमती , त्‍यांनी केलेली भारत भ्रमंती ,  यांचे वर्णन खालील २  निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळेच आपल्याला पुत्ररत्‍न लाभले, अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'नरेंद्र' असे ठेवले.


नरेंद्र हा बालवयात कोपिष्ट होता. शाळेतही तो फार खोड्या काढत असे. पण पुढे त्याच्यात पूजाअर्चा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली. नरेंद्राला तीव्र बुद्धि्मत्तेचे वरदान लाभले होते. नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन त्याने आपले शरीर सुदृढ बनवले होते. मोठा झाल्यावर नरेंद्र ब्राम्‍हणसमाजात जाऊ लागला. तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. 'खरोखरच देव आहे की नाही? देव असेल तर तो कोठे भेटेल?' नरेंद्र ज्याला-त्याला हे प्रश्न विचारत असे. तेव्हा ब्राहमसमाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्राला स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्राचे गुरू झाले.

Swami Vivekananda Essay In Marathi
Swami Vivekananda Essay In Marathi



परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे, ही शिकवण परमहंसांनी नरेंद्राला दिली. सुरवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही. नंतर परमहंसांच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले. तो कालिमातेचा भक्त बनला. रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्राला सांगितले की, तू हिंदुत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्त्वज्ञान साऱ्या जगाला सांग.


१८९३ मध्ये नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना 'स्वामी विवेकानंद' म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरवात करताना 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे न संबोधता 'माझ्या बंधु-भगिनींनो' असे संबोधून उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे माहात्म्य सर्वांना पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्यही त्यांनी या महान कार्यासाठी वेचले.







 स्वामी विवेकानंद निबंध क्रं. २ 


महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  1. बालपण वैभवात 
  2. अभ्यास,खेळ, व्यायाम, संगीत, काव्य इत्यादी अनेक गोष्टींत रुची
  3. १४-१५ व्या वर्षी भारतभ्रमण 
  4. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या भारतीयांचे दर्शन 
  5. स्वधर्म विसरलेल्या हिंदूंचे दर्शन
  6. राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव
  7. अनेक धर्मांतील, ग्रंथांतील तत्त्वांचा अभ्यास
  8. रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व
  9. भारतभ्रमणाला सुरुवात
  10. कन्याकुमारी येथे तपश्चर्या 
  11. अमेरिकेत
  12. सर्वधर्म परिषदेला हजर 
  13. सभा जिंकली
  14. जगभर नाव.


जेव्हा भारत पारतंत्र्यात होता, तेव्हा भारतीय समाजाला एक प्रकारची धर्मग्लानीच आली होती म्हणा ना! अशा अंधकारात १२ जानेवारी १८६३ रोजी दत्त घराण्यात एक दीपज्योती जन्माला आली. तिचे नाव नरेंद्रनाथ दत्त, म्हणजेच विश्वविख्यात स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे बालपण अत्यंत आनंदात व वैभवात गेले. विशाल नेत्र आणि विशाल भाल लाभलेले स्वामी विवेकानंद अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, सुदृढ, निर्भय, विलोभनीय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना अभ्यास, खेळ, व्यायाम, संगीत, काव्य, पाकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत खूप रुची होती. लहान वयात आईकडून धार्मिक विचारांचे; तर मोठेपणी वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. सत्य वचन व सत्य आचरण हा तर त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.

१४-१५ वर्षांचे असतानाच अर्धाअधिक भारत त्यांनी पालथा घातला. त्या काळी त्यांनी भारतीयांची केविलवाणी अवस्था पाहिली. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या, स्वत्व विसरलेल्या हिंदू समाजाला पाश्चात्य शिक्षणाने भारून टाकले होते. परकीयांंच्या फसव्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाने भारतीय समाजाची दिशाभूल केली जात होती. हे सर्व पाहून विवेकानंद अत्यंत व्यथित व अस्वस्थ झाले.


 रवींद्रनाथ टागोरांशी चर्चा करून आणि राजा राममोहन रॉय यांची तत्त्वे विचारात घेऊन विवेकानंदांनी सर्व धर्माचा आणि तत्‍वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यांचे इंग्रजी, संस्कृत, बंगाली इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. निरनिराळ्या धर्मातील व पंथांतील विद्वानांशी त्यांनी तत्त्वज्ञानावर चर्चा केली. त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व पत्करले.


विवेकानंद हे १८८४ साली पदवीधर झाले. रामकृष्ण परमहंसांच्या प्रभावामुळे त्यांनी संन्यास घेतला आणि भिक्षेची झोळी घेऊन राष्ट्रकल्याणासाठी घराबाहेर पडले. अंतिम सत्य काय? या एकाच विचाराचा त्यांनी ध्यास घेतला आणि भारतभ्रमणाला सुरुवात केली. भारतभ्रमणानंतर कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर बसून विचार करत असताना भारतातील दरिद्री, अज्ञानी जनतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे अनेक स्त्री-पुरुष निर्माण केले पाहिजेत, असे त्यांना तीव्रतेने जाणवू लागले. 


 अमेरिकेतील शिकागो शहरी ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी सर्वधर्म परिषद भरणार होती. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद तेथे उपस्थित राहिले. परिषदेच्या दिवशी विवेकानंदांनी 'माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो' अशी भावपूर्ण शब्दांनी सुरुवात करून सभा जिंकली. त्यावेळी दोन मिनिटे सतत टाळ्यांचा गजर होत होता. या परिषदेत ते ज्या दिवशी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत विचारगर्भ भाषणाने हिंदू धर्माविषयीचे निबंध वाचत होते, त्या दिवशी 'न भूतो न भविष्यति' अशी गर्दी लोटली होती. 


होमरूल लीगच्या नेत्या अॅनी बेझंट यांनी या प्रसंगी 'एक योद्धा संन्यासी, समस्त प्रतिनिधींमध्ये वयाने लहान तरीही प्राचीन व श्रेष्ठ सत्याची जिवंत मूर्तीच' असे स्वामी विवेकानंदांचे वर्णन केले आहे. विवेकानंदांनी खऱ्या धर्माची तत्त्वे सांगून धर्म हे उन्नतीचे साधन असावे, असे प्रतिपादन केले.


विवेकानंदांची प्रभावी भाषणशैली साऱ्या जगतात वाखाणली गेली. समस्त पाश्चात्त्य जगात विवेकानंदांची कीर्ती व भारताचा मान वाढला. अपूर्व सहनशीलता, असीम धैर्य, अलौकिक त्यागशक्ती यांचा सहज समन्वय म्हणजे स्वामी विवेकानंद ! ज्याने आपल्या देशाला आणि देशबांधवांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले, ते स्वामी विवेकानंद माझी आवडती विभूती आहेत. या महान विभूतीने ४ जुलै १९०२ या  दिवशी रात्री बेलूर या मठात महासमाधी घेतली.

मित्रांनो  तुम्‍हाला वरील निबंध कसा वाटला हे आम्‍हाला कमेंट करून जरूर कळवा . निबंध पुर्ण वाचल्‍याबद्दल धन्यवाद. 

टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  1. Swami Vivekananda Nibandh In Marathi
  2. swami vivekananda marathi madhe nibandh

Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi

निबंध क्रं. १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी मराठी निबंध बघणार आहोत. सत्‍य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्‍या माध्‍यामातुन भारताला गुलामगीरीच्‍या बेळीतुन मुक्‍तता मिळवुन देण्‍याचे कार्य महात्‍मा गांधीजींनी पुर्ण केले. जन्माने सामान्‍य असणारे गांधीजी आपल्‍या कार्यामुळे कश्‍याप्रकारे महान व्‍यक्‍तीमत्‍व प्राप्‍त करू शकले याची सखोल माहीती खालील 4 निबंधात प्रस्‍तुत केली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.



मानवतेचा मानदंड महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून दयायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, 'महामानव', गांधीजी स्वत:ला नेहमी 'एक सामान्य माणूस' मानत असत. त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे 'गांधीजी' होय.



महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते; पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले. तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते, त्यांच्याविरुद्ध ते खंबीरपणे झगडले.


Mahatma-Gandhi-Nibandh-In-Marathi
Mahatma-Gandhi-Nibandh-In-Marathi


भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केला. सामान्य भारतीय हे अर्धनग्न अवस्थेत जिवन ज‍गतात, अर्धपोटी राहतात हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा  छोट्या वस्‍तीत राहणे त्यांनी पसंत केले. सर्व लोकांना समाजात समान वागणूक हवी, असे आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचराकुंडी साफ करण्याचे काम करायला स्वत: सदैव पुढे येत असत.



मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला कर त्यांना अन्यायकारक वाटला; म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजीनी 'दांडी यात्रा' काढली. महात्माजींंनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. सर्व धर्मातील व सर्व जातीजमातीतील जनतेने एकदिलाने राहावे, यासाठी ते जीवनभर झटले. एका प्रार्थनासभेत त्यांची हत्या झाली. आज गांधीजी देहाने हयात नाहीत; पण त्यांच्या अलौकिक कार्याने  ते अमर झाले आहेत.  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध क्रमांक २
राष्ट्रपिता महात्मा गांधी
 महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  1. सामान्यातून असामान्य 
  2. चुका कबूल करण्याची वृत्ती -
  3. आत्मवृत्ताला नाव 'सत्याचे प्रयोग ' 
  4. बॅरिस्टर झाल्यावर आफ्रिकेला प्रयाण 
  5. विषमतेची वागणूक सशस्त्र सत्तेला अहिंसेने उत्तर
  6. भारतदर्शन 
  7. राजकारणात प्रवेश
  8. सत्याग्रह निःशस्त्र प्रतिकार 
  9. सविनय कायदेभंग 
  10. उपोषण 
  11. निरपेक्ष समाजकार्य 
  12. सर्व जनतेचे बापू 
  13. सेवाग्राममधून समाजसेवा 
  14. कुटिर उदयोगांना महत्त्व 
  15. सत्ता पद स्वीकारले नाही
  16. सत्यासाठी मरणही पत्करले 
  17. राष्ट्राचा पिता.



भारताला स्‍वतंत्र करण्‍यासाठी अनेक महान स्‍त्री व पुरूषांनी आपले सर्वस्‍व राष्‍ट्राला अर्पण केले . अश्‍या महापुरूषापैकी एक होते महात्‍मा गांधी. महात्‍मा गांधी युगपुरूष होते. त्‍यांच्‍या बद्दल सर्व विश्‍व आदराची भावना ठेवत होते . अश्‍या महामानवाला नमन करूया आणि निबंधाला सुरूवात करूया .



महात्माजींच्या कार्याची थोरवी गाताना प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणाले होते, "आणखी काही पिढ्यांनंतर लोकांचा विश्वासही बसणार नाही की, असा कधी कोणी माणूस झाला होता." ध्येयवेडाने प्रेरित झाल्यावर एका सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व कसे फुलू शकते, त्याचे महात्माजी हे उदाहरण आहेत. २ ऑक्टोबर १८६९ ला काठेवाडमध्ये पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला होता.

त्यांची विदयार्थिदशा ही इतर सर्वसामान्य मुलांसारखीच होती. त्या वयात त्यांच्याही हातून चुका झाल्या. त्यांचा वेगळेपणा एवढाच की, त्यांनी आपल्या चुका कबूल केल्या. पुढेही जीवनात वेगवेगळे प्रयोग करताना जेव्हा जेव्हा चुका झाल्या, तेव्हा तेव्हा त्या त्यांनी सर्वांपुढे मान्य केल्या व त्याचे शासनही स्वत:ला करून घेतले. आपल्या आत्मवृत्तालाही त्यांनी नाव दिले आहे  'सत्याचे प्रयोग.' दुसरा गांधीजींचे विशेष म्हणजे परदेशात जाण्यापूर्वी आपल्या मातेजवळ त्यांनी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या आयुष्यभर पाळल्या.

वयाच्या अट्ठाविसाव्या वर्षी बॅरिस्टर गांधी कामानिमित्त आफ्रिकेत गेले, पण तेथील हिंदी लोकांना मिळणारी अमानुष वागणूक पाहून त्यांच्या कार्याचे स्वरूपच बदलले. त्यांना स्वत:लाही 'काळा आदमी' म्हणून हा छळ काही काळ सहन करावा लागला आणि तेथेच त्यांच्या कार्याचे स्वरूप ठरले. या अन्यायापुढे मान तुकवणे योग्य नाही, हे त्यांना जाणवले. त्याच वेळी गांधीजींनी सशस्त्र शक्तीपुढे 'अहिंसे'चे हत्यार स्वीकारले. "हे सामर्थ्य आपल्याला आपल्या पत्नीकडून मिळाले" असे महात्माजी सदैव सांगत.

आफ्रिकेतून परत आल्यावर आपल्या गुरूंच्या ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या - सांगण्यानुसार गांधीजींनी संपूर्ण भारताचे - भारतीय समाजाचे दर्शन घेतले आणि १९२० पासून आपल्या लढ्याला सुरुवात करताना सत्याग्रह, नि:शस्त्र प्रतिकार, सविनय कायदेभंग व स्वदेशीचा पुरस्कार या चतु:सूत्रीचा स्वीकार केला. एखादया लढ्यात हिंसेने प्रवेश केला, तर गांधीजी त्या क्षणी तो लढा थांबवत व उपोषणाचा मार्ग स्वीकारून स्वशासन करून घेत.

यानंतर गांधीजी जगले ते देशासाठी, त्यांनी कधीही आपल्या पत्नीचा, आपल्या मुलांचा, कुटुंबाचा वा घराण्याच्या स्वार्थाचा विचार केला नाही, त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांचा मोठा मुलगा हरिलाल त्यांना दुरावला, पण ते संपूर्ण भारतीय जनतेचे 'बापू' झाले होते. ब्रिटिशांशी लढण्यात ते अखंड गुंतलेले असतानाही आपल्या देशातील दलित पीडित समाजाचा त्यांना क्षणभरही विसर पडला नव्हता. हरिजनांच्या उद्धारासाठी त्यांनी 'हरिजन' साप्ताहिक चालवले. साबरमतीच्या सेवाश्रमात त्यांनी हरिजन, आदिवासी, कुष्ठपीडित सर्वांची सेवा केली. मोठ्या कारखान्यांपेक्षा 'कुटिर उदयोगा'ला ते महत्त्व देत.

बापूजी जे जगले ते इतरांसाठीच. म्हणून कवी मनमोहन म्हणतात, 'चंदनाचे खोड लाजे। हा झिजे त्याहूनही  कोणतेही पद, कोणतेही स्थान, सत्ता त्यांनी स्वीकारली नाही. असेच कार्यरत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी या राष्ट्रपित्याचा एका मारेकऱ्याने खून केला. त्यावेळी प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले होते, “या जगात अतिशय चांगले असणेही तितके चांगले नाही."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



निबंध क्रमांक ३

Mahatma Gandhi Information In Marathi Essay

महत्‍वाचे मुद्दे : 

  1. महात्मा गांधी
  2. आवडते पुढारी
  3. सत्याग्रह व असहकार ही शस्त्रास्त्रे
  4. बापूजीपासून महात्माजी
  5. सत्वाचे प्रयोग' आत्मचरित्र
  6. असामान्य धाडस
  7. सशस्त्र शक्तीशी निशस्त्र मुकाबला
  8. असहकार चळवळ
  9. दांडी यात्रा
  10. चले जाव आंदोलन 
  11. निकंलक चारित्र्य 
  12. संयम, मनोनिग्रह
  13. सामान्याकडून असामान्यत्वाकडे वाटचाल

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शस्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूजी 'महात्मा' कसे झाले, याचा शोध घेतला की त्यांच्या चरित्रातील दिव्यत्व प्रत्ययास येते. आपली जीवन कहाणी सांगताना बापूजी तिचा उल्लेख 'सत्याचे प्रयोग' म्हणून करतात. आपल्या जीवनातील सर्व चुकांची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. गांधीजींनी लोकांना सत्याचे नुसते पाठ दिले नाहीत, तर स्वत:च्या जीवनात सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले.

महात्माजीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, बापूजींनी आयुष्यभर सत्य, अहिंसा या व्रतांचे कठोरपणे पालन केले: बापूजीजवळ असामान्य धाडस होते. आपल्या देशातील लोकांची गरीबीची अवस्‍था पाहून बापूजी केवळ पंचा नेसूनच सर्वत्र वावरू लागले. बापूजींंनी आपला देश, भारतीय संस्कृती, भारतातील सर्वसामान्य माणूस यांचा प्रथम विचार केला. म्हणूनच सशस्त्र चळवळीचा हिंसक मार्ग त्यांनी अनुसरला नाही.

सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ते नि:शस्त्र हातांनी. 'सत्याग्रह या नवीन अस्त्राचा उपयोग त्यांनी प्रथम आफ्रिकेत आणि नंतर भारतात केला. १९२० ची बापुजीची असहकार चळवळ, १९३० ची 'दांडी यात्रा' व १९४२ चा 'चले जाव' लढा' हे संपुर्ण विश्वातील स्वातंत्र्य आंदोलनांमधील सोनेरी क्षण होते. बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात होते. बापुजींजवळ विलक्षण 'संयम' होता. 


आजच्या विदयार्थ्यांत कोणत्याही त-हेचा 'मनोनिग्रह' आढळत नाही. मनोनिग्रहाचे महत्त्व त्यांना बापूजींच्या जीवनचरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी कस्तुरबांना आजारपणात मीठ सोडायला सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी त्यांचे मनोबल तयार करण्यासाठी स्वत:च मीठ सोडले. खजूर व शेळीचे दूध या साध्या पदार्थांवर ते अखेरपर्यंत राहिले. 

सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धेत बापूजी केव्हाच अडकले नाहीत. आफ्रिका सोडताना आपल्याला मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशकार्यासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेच्या कोणत्याही पदाची हाव न धरता, ते निर्वासितांच्या सेवेला धावून गेले. सामान्याकडून असामान्यत्वाकडे यशस्वी वाटचाल कशी करता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रपिता बापूजी


प्रख्यात तत्त्वज्ञ आईनस्टाईनने महात्माजी र्विषयी असे म्हटले आहे की, “आणखी काही वर्षांनंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही."सर्वाना सत्‍य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे आपले आवडते बापू आता आपल्यात राहिले नाहीत, परंतु त्यांची तत्वे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहतील .

मित्रांनो मी आशा  करतो तुम्हाला महात्मा गांधी निबंध मराठी आवडला असेल , निबंध पुर्ण वाचल्‍याबद्दल  धन्‍यवाद 

निबंध क्रमांक 4

 राष्ट्रपिता महात्मा गांधी Essay On Mahatma Gandhi In Marathi

 भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर होते. त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एव्हरेस्ट शिखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती.  आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते. 


सत्य, अहिंसा, न्याय, समानता, सेवा, राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते एक आदर्श उदाहरण होते. हिंसा, स्वार्थ, असत्य, संकुचितपणा, राजकारण, जातिभेद, घृणा, द्वेष, लोभ, लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार आणि आदर्श यांचे उच्चांक गाठून मानवतेची कीर्ती वाढविली. या वास्तवतेवर कदाचित येणाऱ्या पिढीचा विश्वासही बसणार नाही.


जे असाधारण, असंभव आणि अविश्सनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले. त्यांचे जीवन, आदर्श, उच्च विचार, साधेपणा, खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील.
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक स्त्री होती.  वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबाशी झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहून राजकोटला स्थलांतर केले.


किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ, कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली करू लागले. तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. 


तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहांत टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा निश्चय केला. 'गीता' त्यांचा आदर्श बनली. तिथे असतानाच त्यांनी सत्य, अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले. त्यात सत्याग्रह मुख्य होता.


१९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार, मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. भारतीय नेते आणि संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले. त्यांना मार्गदशन केले त्यांच्यावर प्रेम केले. 


त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. संपूर्ण भारतात खादी, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच आली. त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला. गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. नेते, गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार त्यांना पटवून दिले. त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला. 

परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली. गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले. अनेक सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली.


१२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनांत इंग्रज शासकांविरुद्ध तिरस्कार नव्हता. द्वेष नव्हता. ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका. त्यांनी 'यंग इंडिया''हरिजन' ही वत्तपत्रे चालविली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले. काँग्रेस आणि भारताला गांधीजींनीच 'स्वराज्य' ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली 'भारत छोड़ो' चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट झाला.


शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले. जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दु:ख झाले. संपूर्ण शक्तिनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले. लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरणच जनतेसमोर प्रस्तुत केले.


दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूबरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, "आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे. राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वत:ला सत्य आणि त्या मूल्यांच्या प्रति समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध क्रमांक 5


बापूजी - एक थोर आदर्श

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती॥ २ ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा जन्मदिवस. आता, आंतरराष्ट्रीय स्तरावर 'अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. अशी नुकतीच वर्तमानपत्रातून बातमी आली. राष्ट्रपिता महात्माजींची अनमोल कारकीर्द- प्रकर्षाने डोळ्यासमोरून जाऊ लागली.

सध्याचे युग 'कलियुग, आक्रमणाचे युग'. रोज वृत्तपत्रात कोठे ना कोठे तरी बंद - हरताळ, जाळपोळ, बलात्कार, लूटमार, दरोडा, घातपात, बॉम्बस्फोट, मोर्चे अशा बातम्या नित्य-परिचयाच्या झाल्या आहेत. शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र आणि सरळमार्गी असणाऱ्या क्षेत्रातूनही विद्यार्थी - शिक्षण महर्षी संस्थाचालक या सर्वामध्ये अनाचार-भ्रष्टाचार-मारामारीच्या बार्ता आता सरसकट येऊ लागल्या आहेत, मागील शतकार्धात आम्ही स्वातंत्र्यासाठी परकीयांसाठी लढत होतो. आता आपणच आपल्याशी झगडत आहेत आणि आपल्या प्रगती मार्गात मोठे अडथळे निर्माण करीत आहोत. - 'राष्ट्राचे भावी नागरिक' म्हणून आपण युवाशक्तीला, विद्यार्थ्यांना आवाहन करतो, जागरूक करण्याचा प्रयत्न करतो,

परंतु हीच शक्ती, हेच विद्यार्थी आपल्या हक्कांविषयी विशेष जागरूक असताना, पण कर्तव्यांविषयी नाही, त्यांच्या त्या पोरकटपणामुळे, अजाणतेमुळे ते न झालेल्या अन्यायाविरुद्धही चिडून उठताना दिसतात. आणि मग अशात-हेने चुकलेल्या या वासरांना योग्य मार्गाला नेणारा आदर्शच राहिला नाही. अशावेळी आठवण होते ती आपल्या बापूजींची, त्या थोर राष्ट्रपित्याची..

ही कोवळी, अपरिपक्व मुले आणि त्यांच्या सभोवताली हे स्वार्थान-अत्याचाराने-सत्ताप्राप्तीसाठी काहीही करायला निघालेल्या सत्तांधाने बरबटलेले. कसे आणि कोण करणार यांच्यावर संस्कार ? कोण देणार यांना उपदेश ? कोण ठेवणार यांच्यापुढे आदर्श ? अशा या बालकांपुढे गांधीजींच्या थोर जीवनाची अगदी जवळून ओळख करून देणे, आज आवश्यक ठरले आहे.

'२ ऑक्टोबर' महात्माजींचा जन्मदिवस या दिवशी आपण सुट्टी घेतो. परंतु निदान तो दिवस तरी विद्यार्थ्यांसाठी के वळ गांधीजींचा जीवनपरिचय करून देण्यात गेला तरी पुष्कळ गोष्टी साध्य होतील. गांधीजींचे बालपण, जीवनचर्या, शिक्षण, बालपणातील अनुभवातून लिहिलेले 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तक, हरिश्चंद्र नाटकाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम, एकदा कोठे बोलल्यानंतर त्यांच्या वडिलांकडून मिळालेली शिक्षा, नंतर प्रत्येक गोष्ट सत्यपणे सांगायची त्यांची सवय, जीवनातील अपयशही प्रामाणिकपणे सांगण्याची त्यांची पद्धत... अशा अनेक गोष्टींचा बालजीवनावर निश्चित चांगला परिणाम होईल.

बापूजींच्या जीवनातील तो अतिशय महत्त्वाचा प्रसंग, द. आफ्रिकेमध्ये असताना... काळ्या लोकांना दिली जाणारी वागणूक तो रेल्वेमधील प्रसंग... त्यातून त्यांचे दिसणारे देशप्रेम... धाडस-धडाडी, निश्चितपणे मुलांना देशप्रेमाचा उपदेश करून जाईल. आपण सामान्य माणसे अनेकदा न पटणाऱ्या गोष्टी इतरांसाठी करतो, इतर लोक आपल्याला हसतील म्हणून आपण घाबरतो. परंतु गांधीजी स्वतः धुतलेले कपडेच परदेशात घालत असत.


बापूजींच्या पंचाची तर आपल्या देशात तर चेष्टा झाली, परदेशातही फार चेष्टा झाली. पण त्यांनी पंचा वापरणे सोडले नाही, अशा पद्धतीने "माझ्या देशातील लोकांना जर अंगभर कपडा मिळत नाही तर, मी कसे घालू अंगभर कपडे ?" असा महान हेतू - विचार त्यांच्यामागे होता. म्हणूनच गांधीजींनाच ते शोभले आणि जीवनभर निभावले. गांधीजींचा ‘संयम' फार मोठा होता. मद्य, मांस आणि परस्त्री या तीन गोष्टींपासून कायम दूर राहण्याचे वचन त्यांनी आपल्या मातेला दिले होते, ते त्यांनी अखेरपर्यंत पाळले. हा संयम - असा मनोनिग्रह आजच्या पिढीत कोठून येणार, कोठे आढळणार?

तो गांधीजींच्या चरित्रातून निश्चितच विद्यार्थ्यांना मिळेल. एकदा त्यांच्या पत्नी-कस्तुरबा यांना 'मीठ' सोडण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्या तयार नव्हत्या म्हणून बापूजींनीच मीठ सोडले, नंतर त्या कबूल झाल्या. गांधीजी खजूर आणि शेळीचे दूध या साध्या गोष्टींवर अखेरपर्यंत जगले.

सत्ता, संपत्ती यांच्या विनाशक स्पर्धेत बापूजी केव्हाही अडकले नाहीत. द. आफ्रिकेतून परत येताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते कोणत्याच सत्तेच्या पदावर राहिले नाहीत तर निर्वासितांच्या सेवेसाठी रुजू झाले. त्यांचे स्वतःचे अक्षर चांगले नव्हते. पण ते म्हणत वाईट अक्षर हे अपूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.

अशा या केवळ भारतापुरतेच नाही तर साऱ्या जगात महान ठरलेल्या बापूजींना आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिनाचा हीरक महोत्सव साजरा करताना आमचे शतशः प्रणाम...

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध

 

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध  : 'मोकळा तास' म्हणजे शालेय जीवनातील एक आनंदाची पर्वणीच! “मी उदया येणार नाही हं!" असे सूतोवाच कधी एखादे गुरुजी करतात; तर-“अरे, आज अत्रे सर येणार नाहीत. त्यांच्या मेहुणीचे लग्न आहे.” अशी बित्तंबातमी एखादा वर्गमित्र आणतो तेव्हा या 'मोकळ्या तासा'ची पूर्वसूचना मिळते. पण एखादे दिवशी अनपेक्षितपणे असा 'मोकळा तास' मिळतो आणि मग आश्चर्य, आनंद अशा संमिश्र भावनेने 'ऑफ पीरियड' असा वर्गात एकच जल्लोष उठतो. मोकळ्या तासाला वर्गावर येणारे शिक्षक खिलाडू वृत्तीचे असले तर ते हे स्वागत हसत स्वीकारतात; पण असा अनुभव क्वचितच येतो. बहुतेक शिक्षक काही ना काही अभ्यासच घेत असतात.



खरे पाहता, मोकळ्या तासाला अभ्यास म्हणजे आमच्या हक्कावर आक्रमणच नाही का? मोकळा तास म्हणजे गप्पांचा तास असे आमचे गणित असते. अशा गप्पांतून आमचे जनरल नॉलेज'-सामान्य ज्ञान कितीतरी वाढते. माझ्या वर्गातील 'राजीव जोगळेकर' याला अशा मोकळ्या तासाला फार भाव असतो. कारण राजीवचे वडील शिकारी आहेत; त्यामुळे राजीवजवळ शिकारकथा, साहसकथा यांचा भरपूर साठा आहे. वर्गात आलेले शिक्षकही राजीवला एखादी चित्तथरारक शिकारकथा सांगण्याचा आग्रह करतात. मग राजीव कथा सुरू करतो. 

off period in school essay in marathi
off period in school essay in marathi


कथानिवेदनाची उत्कृष्ट कला राजूला लाभली आहे. राजूची कथा रंगू लागते तशी मुले तास विसरतात, वर्ग विसरतात, शाळाही विसरतात. राजूची कथा सुरू झालेली असते आणि आता सर्वजण जंगलात जाऊन पोहोचलेले असतात. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे असतात. श्वास रोखून धरलेले असतात. बिबट्या वाघ व शिकारी, परस्परांवर नेम धरून बसलेले असतात आणि तेवढ्यात घंटेचा टोला पडतो. गुरुजींसह सर्वांना तो तास संपू नये असे वाटत असते; पण नाइलाजाने राजूला कथा थांबवावी लागते. आणि मग कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी आम्हांला दुसऱ्या मोकळ्या तासाची वाट पाहावी लागते.



एखादा मोकळा तास म्हणजे विनोदाची मेजवानीच ठरते. आमच्या शाळेतील ‘भागवत सर' अशा मोकळ्या तासाला वर्गावर आले की ते स्वतःच काही विनोद सांगतात. मग एकापाठोपाठ एक विनोदांची, चुटक्यांची मुलांकडून मैफल झडते. प्रत्येक विनोद-श्रवणानंतर वर्गात हास्याचा कल्लोळ उठतो. काही काही विनोद तर इतके अफलातून असतात की हशाबरोबर बाकेही बडविली जातात. आपण शाळेत आहोत याचा विसर पडतो. अशा वेळी शेजारच्या वर्गातील शिक्षक आमच्या वर्गात डोकावतात; पण आम्हांला त्याची तमा नसते. असा हा मोकळा तास संपला की वाईट वाटते. पुन्हा मोकळा तास मिळावा आणि भागवत सरच वर्गावर यावेत अशी आम्ही मनोमन प्रार्थना करीत असतो.

एखादया मोकळ्या तासाला कोणीही सर वर्गावर येत नाहीत. मग काय विचारता, आमचेच राज्य चालू होते. वर्गप्रतिनिधी वर्गाची सूत्रे हाती घेतो तेव्हा वर वर वर्ग शांत दिसत असतो; पण आमच्या काही ना काही खोड्या चालूच असतात. बाकाखालची वया, पुस्तके, दप्तरे, खाण्याचा डबा, चपला इकडून तिकडे सरकविल्या जातात. कुणाच्या पाठीवर 'विकाऊ गाढवा'ची चिठ्ठी लावली जाते,


 तर कधी कुठूनतरी एखादा बाण येतो आणि मग कागदाच्या बाणांचा पाऊस पडतो. त्यातच कधीतरी नकलांचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग सर्व शिक्षकांच्या नकला घडू लागतात. वर्ग अक्षरशः डोक्यावर घेतला जातो. कधी याचे पर्यवसान शिक्षेतही होते; पण त्याचेही आम्हांला काही वाटत नाही. कारण मोकळया तासाची मजा पोटभर उपभोगलेली असते. 'मोकळा तास' हा शालेय जीवनातील 'ओयासिस', रम्य हिरवळ आहे हे खरेच!

टीप : वरील निबंध मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध  या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • shaletil aathvani essay in marathi
  • shaletil gamti jamti essay in marathi

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध



माझी आई मराठी निबंध  MAJHI AAI MARATHI NIBANDH 




नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आई मराठी निबंध मराठी (मोठा )बघणार  आहोत. या लेखामध्‍ये 6  पुर्ण  वेगवेगळे निबंध देण्‍यात आले आहे. या निबंधामधे आईचे आपल्‍या मुलाविषयी व्‍यक्त होणारे प्रेम व मुलांच्‍या फायद्यासाठी स्‍वता केलेला त्‍याग, आईचे मुलासोबत असलेल्‍या प्रेमळ नात्‍याचे वर्णन यात निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया माझी आई मराठी निबंधाला. 



आईपुढे स्वर्गाचीही महानता  कमी  पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही." माझी आईही अगदी अशीच आहे. 



आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला अभ्‍यास पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले. 

हे  निबंध पण वाचा  





mazi-aai-essay-marathi
mazi-aai-essay-marathi

मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्‍येत बिघडायची. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते.

 मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. (हे पण वाचा माझे बाबा मराठी निबंध)



ती स्वतः एम्. एस्सी.(M.Sc) असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी.(Ph.D) केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती.


माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते.


आई या शब्द साधा सरळ असुनसुध्दात त्यात पुर्ण जगाची माया ममता दडलेली आहे. बालपणापासुन लाडाने खाऊ पिऊ घालणारी आई ही साक्षात अन्न‍पुर्णा देवी आहे. आपण आजारी पडल्यावर आई रात्रभर जागुन आपली सेवा करत असते. आईचा स्वभावच वेगळा असतो ती कधी प्रेम करते तर कधी रागावते पण नेहमीच आपल्यात मुलांच्या भल्याचाच विचार करते . 



खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थांबतील.(मोफत वाचा 100 हुन अधिक मराठी निबंध)


आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईची माया मिळाली नसेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,


'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'


मित्रांनो तुम्‍हाला माझी आई मराठी निबंध हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. व आपण खाली दिलेले बाकीचे ३ निबंध वाचु शकता.  धन्‍यवाद .

MAJHI AAI MARATHI NIBANDH क्रंमाक २ 420 शब्‍दात

कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटले आहे की, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी।" खरं आहे ते! या मातेच्या प्रेमाला कशाची तुलना नाही. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे हया आईपुढे व्यर्थ आहेत. म्हणून तर जग जिंकलेल्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. 

स्वराज्यसंस्थापक शिवबाच्या जीवनातही मातेला सर्वश्रेष्ठ स्थान होते. मातेचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच आढळतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करता येत नाही. एखादी श्रीमंत आई आपल्या मूलाचे जेवढे लाड करील, त्याला जेवढ्या उंची किमती वस्तू आणून देईल तेवढया भारी वस्तू गरीब आई आपल्या लेकराला देऊ शकणार नाही. पण म्हणून काही तिच्या प्रेमाची प्रत कमी ठरणार नाही. 



मातृप्रेमाची अनेक उदाहरणे आपल्याला भोवताली नेहमी दिसत असतात. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला ती ओला-कोरडा तूकडा आधी भरविते. आपल्या लेकरासाठी आई केवढे साहस करू शकते याचा पुरावा म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज.

आई आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती जन्म देते एवढेच नव्हे तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती सर्वतोपरी सांभाळते. ती त्याला खाऊपिऊ घालून त्याचे संगोपन करते व त्याबरोबरच त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगून ती त्याचे मन फुलविते आणि मनाचा विकासही घडविते. 

मातेचा विशेष सहवास न लाभलेल्या बालकाला हया साऱ्या सौभाग्याला वंचित व्हावे लागते. शिवबा, विनोबा, बापूजी या साऱ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक नाना ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे." अपंग, मंदबुद्धी कसेही बालक असले तरी माता आपली माया पातळ करीत नाही. (हे पण वाचा आई संपावर गेली तर निबंध मराठी )

मातेच्या या श्रेष्ठत्वाची कसोटी लागते ती कुपुत्राच्या बाबतीत. कारण अशा दुर्गुणी मुलाचा वाली मातेशिवाय कोणी नसतो. घरीदारी सर्वत्र त्याला अपमान सोसावा लागतो. प्रत्यक्ष जन्मदाता पिताही त्याला घराबाहेर काढतो. अशा वेळी ती माता मात्र आपल्या कुपुत्रालाही जवळ करते. म्हणून तर कवी मोरोपंत म्हणतात

  • "प्रसाद पट झाकती परि परा गुरूंचे थिटे
  • म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे." 


आपल्या जीवनात अशी अनेक उपकारांची गाठोडी आपल्या मस्तकी असतात, त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. म्हातारपणी वृद्ध मातापित्यांची सेवा करणे ही काही अंशाने त्या ऋणांची फेड होईल. पण ती फारच थोडी. कारण तो आपल्या कर्तव्याचाच भाग असतो. काहीजण कृतघ्न होऊन ती फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात. 

म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमासाठी आसुसलेली असतात. ते त्यांना मिळाल्यास, त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. अनेकदा ‘अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीप्रमाणे आपल्याकडून मातेची महती ओळखली जात नाही. पण हे कृपाछत्र एव मोठे आहे. 

हे उपकार एवढे अगणित आहेत की सात वेळा काय, शंभर वेळा जन्मुुनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे की, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते आपल्यावर कृपाप्रसादाची खैरात करीत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. उगाचच नाही कवी म्हणत की, “आईसारखे दैवत साऱ्या जगतामधी नाही.

MAZI AAI ESSAY IN MARATHI क्रंमाक ३ 223 WORDS 


एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. आमच्या घरात भरपूर माणसे आहेत आणि ती एकमेकांशी 'नात्याच्या रेशमी धाग्यांनी ' जोडलेली आहेत. माझी आई ही या घराची कर्णधार आहे असे म्हणायला हरकत नाही. चाळीशी ओलांडलेल्या माझ्या आईचा या घरात प्रेमळ वावर आहे. माझ्या आजीचा आणि माझ्या आईचा एकमेकींवर पूर्ण विश्वास आहे व परस्परांमध्ये दाट जिव्हाळा आहे.

अशी ही माझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली, तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे, माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते. केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे, माझ्या आईचाच मोठा सहभाग आहे.

सुट्टीच्या दिवसांत आई घरातील सर्व मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवते. त्यातून स्वाभाविकच आमच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आईचे हस्ताक्षर उत्तम आहे. सुलेखन कसे करावे हे मला माझ्या आईनेच शिकवले. घरातील प्रत्येकाची आवडनिवड आईने लक्षात ठेवलेली आहे, त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर खूश असतो. नीटनेटकेपणा हा तिचा खास गुण आहे. त्यामुळे घरातल्या कुणालाही काही हवे असले की, त्याला माझ्या आईची आठवण येते आणि माझी आई त्याची नड तत्परतेने भागवते.

माझी आई उत्तम गृहिणी आहे. आल्यागेल्यांचे हसतमुखाने आतिथ्य कसे करावे, ते माझ्या आईकडुुन शिकावे. स्वंंयंंपाक करण्यात ती कुुशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला 'अन्नपूर्णा' असे संबोधून सतत कौतुक करत असतात. शेजारच्या सर्व स्त्रिया अडीनडीला माझ्या आईकडे धावत येतात व आई त्यांना शक्य ती सर्व मदत करते. सदा हसतमुख असणारी ही माझी आई आमच्या घरची 'लक्ष्मी' आहे, असे सारेजण म्हणतात ते उगाच नाही!

तुम्‍हाला हे lekhan (लेखन) कार्य कसे वाटले हे कमेंट करून सांगु शकता. हा निबंध 4th std to 10 std पर्यत उपयोगात येऊ शकतो. 


माझी आई निबंध मराठी क्रंमाक (essay on mother in marathi) ४ 273 शब्‍दात


कवी यशवंतांनी आईची महत्‍व सांगताना म्हटले आहे, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!' अगदी खरे आहे ते ! मातेचे प्रेम अतुलनीय आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे या जन्मदेपुढे व्यर्थ आहेत. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे. महाराष्ट्राचे स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते.



मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरवते. प्रसंगी अपत्याच्या वात्सल्यापोटी माता आपल्या प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज!



माता आपल्या लेकरासाठी काय करत नाही? ती त्याला जन्म देते. एवढेच नव्हे, तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनांचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते. ती त्याचे संगोपन करते, त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगन ती त्याचे कसमकोमल मन फुलवते. त्यावर सुसंस्कार घडवते. शिवबा, विनोबा, बापूजी यांसारख्या थोर व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक माता ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे."



 मातेचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करणे, ही काही अंशाने त्या ऋणांची फेड म्हणता येईल. खरे तर तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. काही कृतघ्न करंटे ही फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आसुसलेले असतात. तसे झाल्यास ते त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते.


मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. ते आपल्यावर सदैव कृपाप्रसादाची खैरात करत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतो, 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामधि नाही.' त्‍यामुळे majhi aai maza adarsh (माझी आई माझा आदर्श आहे )


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   आईचे माहात्‍म सांगाणारा हा निबंध शेअर करून तुम्‍ही आई या नावाला उच्‍च स्थान प्राप्‍त करून द्या 
.


निबंध 5 

सूर्यकिरणांच्या स्पर्शान कमळं उमलावीत तशीच मातेच्या वात्सल्य स्पर्शान बालकाची जीवनकळी उमलते. आकाशाहून अथांग अन् सागराहून विशाल असे जीवनाचे धडे ती बालकाला शिकविते. माता बालकाचे सर्वस्व आहे. पहिला स्पर्श, पहिली नजर यात बालक व माता दोघे गुंफले जातात. त्यांचं अनंत नातं सुरू होतं. जन्मानंतर संस्काराची शिदोरी माता बाळाला देते. जगात पावलो पावली येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्याची, ध्येय गाठण्याची चिकाटी ती बाळाला देते .अपयशातून परत यश गाठण्याचा मार्ग ती त्याला दाखविते. मज वाटते,

आई म्हणजे विश्वातलं सर्वोच्च सुख आहे. नयनाचा दिवा व तळहाताचा पाळणा करून बालकाचे संगोपन फक्त तीच करू शकते.  तिच्या प्रेमात भेदभाव नाही. रायगडावरील 'हिरकणी बुरूज' वात्सल्यप्रेममय आईचे प्रतीक आहे. अपत्यासाठी प्रसंगी प्राणाचेही मोल द्यायला आई तयार असते. कष्ट व त्याग तिच्या रक्तातच आहे. परोपकार , त्याग, सहनशीलता, संयम, अपार माया या बळावर ती मार्गक्रमण करते. 

'आई' ही दोनच अक्षरे. 'आ' म्हणजे 'आत्मा' आणि 'ई' म्हणजे 'ईश्वर'. आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाफ म्हणजे आई. मुलांना उत्तम संस्कार , उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य देण्यासाठी आई धडपडत असते. ती हळवी आहे, प्रसंगी वज्राहूनही कठीण आहे. गरजू, वृद्ध , दुःखी लोकांचा ती आधार आहे. बालकाचे सहस्त्र अपराध ती पोटात घालते व त्याला योग्य मार्गदर्शन करते.

काळ बदलत चालला आहे. 'चूल - मूल' या मर्यादेतून आता आई अधिक प्रगल्भ झाली आहे. ती स्वतः सुशिक्षित, सुसंस्कृत, युगंधरा झाली आहे. विज्ञान , वैद्यकीय क्षेत्रातील्या नवीन घडामोडींची ओळख तिला होत आहे. साहजिकच अधिक सुजाण माता उत्कृष्ट शिल्पकार ठरली आहे. बालकाचं मूर्तिमंत शिल्प घडविण्यात ती मग्न झाली आहे.


मुकेपणाने असंख्य काव्ये आई जगते. तिच्या अणूंचे मोल करताच येत नाही. तिला सुख - समाधान देणे हे अपत्याचे पहिले कर्तव्य आहे. जिजाऊंनी शिवबा घडविला. मातृप्रेम जपलेही शिवबांनी. जन्मदात्री व शिक्षणदात्री अशा आईची सर कोणालाच येत नाही. प्रेम , सुसंगती , मित्रत्व , मार्गदर्शन, आदर्श हे सारं आईकडूनच मिळतं.


आज या मातेला वृद्धपणी वृद्धाश्रमाचा मार्ग दाखविणारे महाभागही आहेत. जिने जन्म दिला, जिने दुनिया दिली , जिने जीवन दिले, जिने घर दिले, तिला 'बेघर' करू नका . 'न ऋण जन्मदेचे फिटे!' तिच्या दुधाची शपथ आहे प्रत्येकाला की तिच्या प्रेमाची कदर करा. या जीवनात तिचा आदर्श अवलंबून जीवनाचे मार्गक्रमण करा. 



निबंध 6 

जगातील सर्वात पवित्र व सर्वश्रेष्ठ नात्याला 'आई' म्हणून संबोधतात. 'आई' ह्या शब्दाला अत्यंत पवित्र शब्द म्हणून मान्यता आहे. आईची थोरवी कित्येक कवींनी आपल्या शब्दात व्यक्त केली. कित्येक लेखकांनी आईविषयी भरभरुन लिहले. आईची महती आहेच तेवढी की प्रत्येकाने आपला वेगळा अनुभव लिहावा. प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्व वेगळे आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखात पहिल्यांदा आठवणारे नाते हे आईचे असते. माता,माय,जननी, जन्मदा, जन्मदात्री,मा, अशी अनेक संबोधनेआईकरिता आहेत. तिची थोरवी पुढील काही ओळींनी स्पष्ट करण्याच्या प्रयत्न मी सुद्धा करु इच्छितो.


लेकरांची छत्रछाया असणारी आईच त्यांचा कायापालट करु शकते. परिवाराचा आनंद अबाधित ठेवण्यासाठी ती दिवस रात्र झटत असते. चंदनाचे लाकूड झिजून इतरांना जसे सुगंध देते त्याचप्रमाणे आई सुद्धा स्वतः झिजून परिवाराला आनंद देत असते. स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून परिवाराला आनंदी ठेवण्याचा ती प्रयत्न करते. परिवाराच्या सुखात आणि दु:खात दुःख मानणारी ती केवळ आईच असते.


वात्सल्य, प्रेम, ममता, माया आणि करुणेने भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आई. आई म्हणजे,
प्रेमाचा झरा , लहान थोरा ,पुरवी घरा, निरंतर। घरासाठी, घरातील सर्व सदस्यांसाठी सतत प्रेमाचा झरा सुरु ठेवणारी आई स्वत:ला हरवून कुटुंब सदस्यांची काळजी घेत असते. सर्वांच्या चुका क्षमा करणारी, इतरांचे ऐकून घेणारी आई. तिचे हृदय सागरापेक्षाही अथांग असते 

पहाटेपासून सुरु होणारी आई तुझी दिनचर्या रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवणारी आई तू कामाने थकून जातेस. परंतु कुटुंबातील सर्वांच्या गरजा भागविण्यात तू थकवा सुद्धा निमुटपणे सहन करतेस आणि या कामाच्या मोबदल्यात तुला कोणतीही अपेक्षा नसते. म्हणून हे आई,
“धन्य तुझी कृती, नि:स्वार्थी वृत्ती, जगात कीर्ती,सदासर्वदा। कर्तव्याची जाण,आरामाचे न भान ,जगी तुझा मान, युगानुयुगे।"

जगातील सर्व संपत्ती एकवटून आईच्या चरणी अर्पण केली तरी तिने केलेल्या उपकाराची परतफेड करणे शक्य नसते. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम हीच आईची संपत्ती असते. घराला घरपण आणणारी, कोणतीही अपेक्षा करीत नाही.


धन संपत्तीची तीला अपेक्षा नसते, फक्त प्रेमाची तिला भूक असते। घराला मंदिर बनविणारी आई, काट्यातून नंदनवन फुलविणारी आई वात्सल्याची खाण असणारी आई तुला माझे कोटी कोटी प्रणाम!

टीप : वरील निबंध माझी आई या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • beautiful marathi essay on mother

माझी आई मराठी निबंध | MAJHI AAI MARATHI NIBANDH

एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi 


एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi :"मला बोलू दया. माझा आवाज बंद करू नका. कारण मी आता शेवटचे क्षण मोजत आहे. आज सकाळचे ते भीषण क्षण मी विसरू शकत नाही. असा कोणता गुन्हा मी केला होता की मला हे एवढे शासन झाले! खरंच सांगते. अहो, मला अजन जगायचे होते. माझ्या सुपूत्रांची मला अजन सेवा करायची होती. पण या आडदांड जगाने मला ‘राम म्हणण्याची वेळ आणली हो! पुढे एस. टी. बस म्‍हणाली.

“तसे माझे वय काही फार झाले नव्हते. माझा जन्म होऊन पुरती पाच वर्षेही झाली नाहीत. हा जन्म, हे रूप घेण्यासाठीही मला अतोनात कष्ट साहावे लागले. लोखंडी घणाचे प्रहार व धगधगत्या अग्नीचे चटके; सारे मी सहन केले. कशासाठी? केवळ तुमच्यासाठी. माझ्या लालचुटूक रंगावर मी खूष होते. 'रस्ता तेथे एस्. टी.' हेच मुळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य. त्यामुळे या लहानशा आयुष्यातही मी महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळला. गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून धावले. खडबडीत दगडी रस्ते पार केले, उंच सरळ चढण चढले आणि तेवढीच उतरलेही. अनेक घाटांतून अवघड वळणे घेत घेत आयुष्य काढले.

st-bus-essay-in-marathi
st-bus-essay-in-marathi
"हे सारे मी कोणासाठी करीत होते? तर माझ्या गरीब देशबांधवांसाठी. श्रीमंतांजवळ स्वतःची वाहने असतात. मनात आले की ते केव्हाही कोठेही जाऊ शकतात. पण खेडोपाडी राहणारे अनेक गरीब लोक असतात, त्यांच्या प्रवासाची चिंता कोणी करावी? या लक्षावधी माणसांची सेवा करावी हेच माझे जीवनध्येय होते. एकदा एक गरीब खेडूत दुसऱ्या एका प्रवाशाला म्हणत होता, '


अरे आपण कुठे गरीब आहोता ही दोन-अडीच लाखांची लाल एस्. टी. आपलीच नव्हे का!' तेव्हा मला अगदी धन्य धन्य वाटलं. मी आणि माझ्या इतर शेकडो भगिनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाऊन पोहोचलो. त्यामुळे खेड्यांचा विकास होऊ लागला. ज्या खेड्यांचा बाहेरच्या जगाशी संबंधच येत नव्हता ती मागासलेली होती. तेथील मालाला बाजारपेठ दिसत नव्हती. हे सारे प्रश्न आमच्यामुळे सुटले. आपल्यामुळे माणसाचे जीवन सुसहय होत आहे हे पाहून कष्टाचे काही वाटत नव्हते.

"त्यावेळीही एक गोष्ट मनाला डाचत होती. हे प्रवासी इकडे तोंडाने 'आमची गाडी' म्हणायचे, पण गाडीची स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करायचे नाहीत. एस्. टी. आपलीच म्हणून जेथे बसायचे तेथेच घाण करायचे. सकाळी छानपैकी न्हाऊन माखून आलेल्या माझे रात्रीपर्यंत रूप पाहण्यासारखे व्हायचे. शेंगांची टरफले, केळ्यांच्या साली अशी गलिच्छ आभूषणे मला नित्य बहाल केली जायची.


 माझा उपयोग करणारे लोक माझी खुशाल मोडतोड करायचे. कुठलाही संघर्ष, संप उभा राहिला की आमच्यावर दगडांचा मारा. कधी कधी जाळपोळही सहन करावी लागे. मला चालविणारे चालकही अनेक. काही काही इतक्या निर्दयपणे माझ्याशी वागणूक करीत की, त्यामुळे माझी गात्रेच खिळखिळी होत. देखभाल, तेलपाणी यांबाबत तर निराशाच होती. तरी 'सेवा हाच माझा धर्म' असल्याने वर्षातील तीनशे दिवस तरी मी रस्त्यावर धावत असे."

“आज हाच रस्ता माझी मृत्युभूमी ठरला. मी रोजच्याप्रमाणे धावत होते. चालकही चांगला होता. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला बक्षीस मिळाले होते. पण एका बेजबाबदार ट्रकचालकाने आपला रस्ता सोडला आणि तो सरळ माझ्या अंगावरच चालून आला. माझे तुकडे तुकडे झाले दोन्ही गाड्यांचे चालक आणि कित्येक प्रवासी मृत्युमुखी पडले. कोणत्याही दुरुस्तीपलीकडे मी आता आहे. या क्षणी मला एकच प्रश्न ग्रासतो आहे, यात माझी चूक कोणती? माझ्या सेवाव्रताला हेच फळ का? कोण देईल माझ्या या प्रश्नांची उत्तरे?

टीप : वरील निबंध एस. टी. बसचे आत्मवृत्त या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते


  • Bus Essay in marathi

एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi


माझी समाजसेवा मराठी निबंध | Samaj Seva Essay In Marathi


माझी समाजसेवा मराठी निबंध लिहीताना आठवण येते या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.माझ्या शाळेतील विषयाची इयत्ता आठवीत आल्यापासून 'समाजसेवा' हा माझा शालेय अभ्यासातील एक विषय झाला. या विषयाच्या पहिल्या तासिकेतच गुरुजींनी समाजसेवेची आवश्यकता, तिचे स्वरूप यांबद्दल माहिती सांगून अनेक समाजसेवकांची चरित्रे ऐकविली. तेव्हापासून माझ्या मनात एक स्फुल्लिग पडले की, आपणही समाजसेवा करावी. 

पण समाजसेवा कशी करावी या प्रश्नाने मी बेचैन झालो. मनात हेतू ठेवला की माणूस त्याच्या सिद्धीसाठी यत्न करतो. त्यानुसार रस्त्यात कुणी आंधळा माणस रस्ता ओलांडताना दिसला की मी धावत जाऊन त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करतो. तसेच कुणी पल्ला हुडकत असला की मी त्याच्या सेवेस हजर होतो. यात्रेच्या गर्दीत कूणाची मुले हरवली तर त्यांच्यासाठी मी धावून जातो. इतकेच काय पण यंदा उन्हाळ्यात मी आमच्या अंगणात एक माठ ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांना माठातील थंडगार पाणी देताना मला कृतार्थता वाटते. पण एवढ्याने मला समाधान नव्हते.

याहूनही काही भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा होती. ती संधी मला आयतीच लाभली. यंदाचे वर्ष शासनाने 'प्रौढ शिक्षण योजनेचे वर्ष म्हणून जाहीर केले. देशात निरक्षरता फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि जोवर मतदार निरक्षर आहे. तोवर या लोकशाहीला काही अर्थ नाही. म्हणून शासनाने प्रौढ शिक्षण योजने'चा धडाडी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यातील काही कामगिरी आमच्या शाळेकडे आली आणि तेथून ती आमच्याकडे आली. विशेष लक्षणीय अशी समाजसेवा करावयास मिळणार म्हणून आम्ही विलक्षण आनंदित झालो होतो.

Samaj Seva Essay In Marathi

Samaj Seva Essay In Marathi
 
या कार्यासाठी आमच्याकडे सोपविण्यात आलेली झोपडपट्टी गुरुजींनी आम्हांला दाखविली. मग आम्ही चौघेजण तेथे 'पूर्वमाहिती गोळा करण्यासाठी गेलो. दुपारच्या वेळी गेलो तर तेथे कोणी भेटणार नाही, हे लक्षात घेऊन आम्ही तेथे सायंकाळी गेलो. त्यावेळी कष्टाची कामे करून ते लोक परतले होते. २० ते ५० च्या वयोमर्यादेतील किती माणसे निरक्षर आहेत, याची माहिती आम्हांला हवी होती; 

पण अतिशय साशंक होऊन कोणतीही माहिती सांगण्यास त्यांनी नकार दिला. तेव्हा आम्ही नोकरीचे आमिष त्यांच्यापुढे ठेवले. मग ते थोडे थोडे बोलू लागले. अशा दोन-चार वेळा भेटी झाल्यावर त्यांना आमच्याविषयी थोडा विश्वास वाटू लागला. मग एका सणाच्या निमित्ताने आम्ही तेथील मारुतीच्या देवळात एक सास्कृतिक कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमातील लोकनाट्यात एका निरक्षराची सावकाराकडून झालेली पिळवणूक व त्यात त्याची झालेली वाताहत दाखविलेली होती. लोकनाट्यातील या निरक्षराच्या जीवनाचे ते विदारक चित्र त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते. त्यामुळे त्यांना ते खूपच आवडले.

पुढे आम्ही नित्यनियमाने त्या वसाहतीत जाऊ लागलो. कधी गोष्टी सांग, कधी गाणी म्हणन दाखव, कधी कीर्तन करून दाखव अशा नित्य नवीन मार्गाने आम्ही त्यांना रंजवीत होतो. अलीकडे ते सारेजण कामावरून परतले की जेवणे उरकून सरळ देवळात येत. त्यांच्याबरोबर महिला देखील येत. मनोरंजनाबरोबर त्यांना शिक्षण देणे हा आमचा हेतू होता. 

कधी कधी आम्ही त्यांना विविध माहितीपर बोलपटही दाखवीत असू. ते जी श्रमाची, मोलमजुरीची कामे करीत, ती प्रगत देशात यंत्रावर कशी चालतात हे पाहिल्यावर त्यांना गमत वाटली; पण त्याच वेळी त्याच्यातील एकाने मला सवाल टाकला, “पण काय हो, ही कामे यंत्राने झाली तर आम्ही बेकार नाही का होणार?" अशा तहेने त्यांच्यात विचारमंथन होऊन, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला होता. आता मोठी मोठी अक्षरे लावून ते वाचू लागले होते.

बरोबर दोन महिन्यांनी आम्ही त्यांच्या हातांत पाट्या दिल्या. आता ती राठ बोटे अक्षरे वळवु लागली. त्यासाठी आम्हांला व त्यांना देखील खूप कष्ट पडले; पण शिक्षण असाध्य राहिले नाही. आज आमची ही झोपडपट्टी शंभर टक्के साक्षर झाली आहे. त्यांनी बँकेत आपली खाती उघडून ते नियमितपणे पैसेही शिल्लक टाकतात. “या पोरांनी आम्हांला नवं जग दाखवलं," असे ते कौतुकाने म्हणतात व आपण साक्षर झाल्यावर दुसऱ्या एकाला तरी साक्षर करणार असा संकल्प सोडतात. याहून अधिक काय साधावयाचे असते समाजसेवेतून!

टीप : वरील निबंध माझी समाजसेवा मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



  • मी केलेली समाजसेवा मराठी निबंध
  • मी केलेली समाजसेवा निबंध
  • माझा समाजसेवेचा एक अनुभव मराठी निबंध

निबंध  2

माझी समाजसेवा मराठी निबंध | Samaj Seva Essay In Marathi



गेले दहा दिवस शहरात सार्वजनिक गणेशोत्सव रंगात आला होता. एकूण वातावरणावरून लक्षात येत होते की, 'गणेश-विसर्जनाची' मिरवणूक नक्कीच रंगणार. अनंतचतुर्दशीनिमित्त शाळेला दोन दिवस सुट्टी होती. 


त्याआधी वर्गात सूचना आली की, ज्या विदयार्थि-विदयार्थिनींना सामाजिक कार्य करायची इच्छा आहे, त्यांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी तलावावर उपस्थित राहावे. ही संधी सोडायची नाही, असा विचार करून मी तलावावर गेले. तलावाजवळ काही समाजसेवक, समाजहितचिंतक उभे होते. 


त्यांनी आमची ओळख करून घेतली व आम्हांला आमच्या कार्याचे स्वरूप सांगितले. माझ्या हातात एक फलक दिला होता. त्यावर लिहिले होते की 'निर्माल्यकलशात निर्माल्य टाका'. चार वाजल्यापासून विसर्जनासाठी गणपती येऊ लागले. प्रत्येक मंगलमूर्तीबरोबर भक्तांनी वाहिलेले भरपूर निर्माल्य होते.


आम्ही विनंती केल्यावर लोक आपले निर्माल्य कलशात टाकत होते. काही लोक मात्र निर्माल्य पाण्यात टाकत होते. पोहायला येणारे काही स्वयंसेवक पाण्यात टाकलेले निर्माल्य लगेच बाहेर काढत होते. निर्माल्य-कलश भरला की चार स्वयंसेवक मिळून तो कलश ट्रकमध्ये रिकामा करीत होते. असे हे काम करताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.


काही तासांनंतर आम्हांला विश्रांती देऊन तेथे दुसरे स्वयंसेवक नेमण्यात आले. रात्र झाली. मिरवणुकीमुळे दमलेले सर्व शहर झोपी गेले. मग स्वयंसेवक आणि नगरपालिकेचे कामगार यांनी एकत्र येऊन शहर सफाईचे काम केले. रस्ते धुऊन स्वच्छ केले गेले.


थोडेसे खाल्ल्यावर आम्ही घराकडे
वळलो. समाजसेवा केल्याचे मला समाधान मिळाले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



[शब्दार्थ : विसर्जन- immersion of an idol. विसन. विसर्जन। संधीopportunity. त3. अवसर। फलक हेवने यावेai दूर.. किसी देवता पर चढ़ाया हुआ फूल। स्वयंसेवक- volunteers. स्वयंसेव.. स्वयंसेवक।]


माझी समाजसेवा मराठी निबंध | Samaj Seva Essay In Marathi

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध

Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh


दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध लिहीताना आठवण येते ती त्‍या वर्षी पडलेल्या दुष्‍काळाची,  त्‍या वर्षी राज्यातील पंधरा जिल्हयांत दुष्काळ जाहीर केला गेला होता. सातत्याने दुष्काळ पडण्याचे हे चौथे वर्ष होते. रखरखीत उन्हामुळे आणि पाण्याचा अंशही कोठे न राहिल्याने जमिनीला सर्वत्र भेगाच भेगा पडल्या होत्या. सगळीकडे दुष्काळी कामे सुरू केली गेली होती. त्या दुष्काळी कामांवरचा मुख्य अधिकारी म्हणून माझ्या वडिलांची नेमणूक झाली होती. त्यामुळे बाबांचा सतत दौरा चालू असे.


सुट्टीचे दिवस म्हणून मीही रिकामटेकडा होतो. सतत महिनाभर सुट्टी असल्याने दिवस अगदी कंटाळवाणे झाले होते. शेवटी एक दिवस बाबांच्या जीपमध्येच जाऊन बसलो. मला पाहून बाबा म्हणाले. “अरे, त कशाला येतोस? तेथे काहीही पाहण्यासारखे नाही. दुष्काळामळे सारा प्रदेश उजाड, भगभगीत झालेला आहे." पण आज मी ठरविलेच होते की आपण बाबांबरोबर जायचेच.

dushkal ek bhishan samasya marathi nibandh
dushkal ek bhishan samasya marathi nibandh

बाबा वाटेत दुष्काळाच्या तीव्रतेचे वर्णन करीत होते आणि जागोजाग त्याचे दर्शन घडतच होते. तृषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्ररश्मीकडे काकुळतीने पाहत होती. वाटेत लागणाऱ्या वस्त्यांतील हवालदिल माणसे, त्यांच्या हातापायांच्या झालेल्या काड्या, खपाटीला गेलेली पोटे, रिकामे गोठे दुष्काळाच्या लीला मूकपणे दाखवीत होते. एका ठिकाणी मोठे मोठे पक्ष घिरट्या घालताना दिसत होते. 

बाबा म्हणाले, “जनावर मेलेलं दिसतंय!" थोडे पुढे गेलो तर पक्ष्यांनी खाऊन उरलेल्या एका जनावराचा मोठा सांगाडा पडला होता. मनात आले, या अवर्षणरूपी असुरापुढे भेदभाव नाही. माणसे, जनावरे, पक्षी सारेच याला सारखे. माणसाला आपल्या विद्वत्तेचा केवढा गर्व; पण निसर्ग पुनः पुन्हा त्याला जाणीव करून देतो, “अरे तुझ्या जीवनाच्या साऱ्या नाड्या माझ्या हातात आहेत बघ!"

दुष्काळी काम म्हणून एका ठिकाणी रस्ता बांधण्याचे काम चालू होते. हजारो माणसे कामात गुंतलेली होती. त्यांतील काही खडी फोडण्याचे काम करीत होती. जीप थांबली आणि बाबा खाली उतरले; तशी दहा-बीस माणसे त्यांच्या पाया पडू लागली, क्षणभर मला प्रश्न पडला की अशी कोणती आगळीक झाली आहे या लोकांकडून? मग लक्षात आले की, ते बाबांकडे कामाची मागणी करीत आहेत. “साहेब, काम दया, पोटाला दया,” असे केविलवाण्या शब्दांत ते विनवीत होते. माणसांची ही दयनीय स्थिती पाहून माझे मन सुन्न झाले.

बाबा दुष्काळी कामाची पाहणी करीत होते. तेथील मुकादमाला आणि इतर अधिकाऱ्यांना कामाच्या प्रगतीबाबत विचारणा करीत होते. इतक्यात दूरवर काहीतरी गडबड झाली म्हणून आम्ही तेथे गेलो तर काम करणारी एक स्त्री बेशुद्ध होऊन पडली होती. ती स्त्री गरोदर असावी. तात्पुरत्या उपायाने ती शुद्धीवर येईना, तेव्हा तिला जवळच्या गावातील सरकारी दवाखान्यात न्यायचे ठरले. दुसरे काही वाहन नसल्यामुळे आमच्या जीपमधून न्यायचे ठरले. "हिचे नात्याचे कुणी आहे का येथे?" बाबांनी पुनःपुन्हा विचारले, पण कोणीही पुढे आले नाही. तेव्हा तेथील एक सामाजिक कार्यकर्ता जीपमध्ये बसला.

गाडी पुढे निघाली तेव्हा त्या साऱ्या दृश्याने मी अगदी हबकूनच गेलो होतो. पण खरा धक्का मला पुढेच बसला. दवाखाना आला तेव्हा त्या बाईला डॉक्टरच्या स्वाधीन करून आम्ही तेथील डाकबंगल्यावर गेलो तेव्हा तो समाजसेवक बाबांना म्हणाला, “दादासाहेब, तुम्हांला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुमच्या या कामावरचे मुकादम मजुरांना अत्यंत छळतात. 

त्यांना मिळणाऱ्या चार-पाच रुपये मजुरीतील प्रत्येकी एक-एक रुपया हे राक्षस कापून घेतात. मजुरांना देण्यात येणाऱ्या धान्यापैकी माप-माप काढून घेतात आणि हजारो रुपये कमावतात. पण हे गरीब लोक परिस्थितीने एवढे हवालदिल झाले आहेत की ते त्यांच्याविरुदध काही बोल शकत नाहीत. आता ही जी बाई बेशुद्ध पडली तिचा नवरा तेथे कामावर होता. पण रोज बुडेल म्हणून त्याने आपली ओळख दिली नाही वा तो बाईबरोबर आलाही नाही.”

हे सारे ऐकून माझे मन अगदी सुन्न झाले. वाटले, दुष्काळाने माणसाला केवढे हे निष्ठूर बनविले आहे!

टीप : वरील निबंध दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • दुष्काळ एक समस्या निबंध
  • दुष्काळ एक आपत्ती निबंध मराठी
  • दुष्काळ एक भीषण समस्या निबंध मराठी
  • पाण्याचा दुष्काळ निबंध मराठी
  • dushkal padla tar marathi nibandh
  • dushkal che parinam marathi nibandh

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध | Dushkal Ek Bhishan Samasya Marathi Nibandh